Ajit Agarkar's Application for BCCI Selection Committee Chairman: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू अजित आगरकर बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीचा अध्यक्ष होण्यासाठी सज्ज झाला आहे. माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशननंतर राजीनामा दिल्यानंतर १७ फेब्रुवारीपासून हे पद रिक्त आहे. अजित आगरकर व्यतिरिक्त निवड समितीचा अध्यक्ष होण्याच्या रेसमध्ये शास्त्री, वेंगसरकर यांचीही नावे चर्चेत आहेत. अजित आगरकर याच्यासोबतच दिलीप वेंगसरकर आणि रवी शास्त्री या निवड समिती पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयने यावेळी ६० वर्षांची वयोमर्यादा शिथिल केली आहे, याचा अर्थ शास्त्री चार वर्षांचा कार्यकाळ सहज पूर्ण करू शकतात. हेच वेंगसरकर यांना लागू होत होते, जे २००५ सप्टेंबर ते २००८ या काळात आधी निवड समितीचे अध्यक्ष होते. बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदाचा कमाल कार्यकाळ चार वर्षांचा आहे. वेंगसरकर यांच्याकडे या पदाचा खूप अनुभव आहे. एम.एस. धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या सर्वांनी त्यांच्या कार्यकाळात पदार्पण केले. मात्र, या दोघांनी या पदासाठी अर्ज केला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआयने सर्व अर्जांसाठी ३० जून ही तारीख निश्चित केली आहे. हेही वाचा - Yashasvi Jaiswal: “जर कोणी माझ्या आई किंवा बहिणीबद्दल बोलले तर…”, स्लेजिंगवर यशस्वी जैस्वालच मोठं वक्तव्य बीसीसीआय मुख्य निवडकर्त्याच्या वार्षिक पगारात वाढ करणार - इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, बीसीसीआयने मुख्य निवडकर्त्याच्या वार्षिक वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पदासाठी निकष पूर्ण करणारे माजी खेळाडू अर्ज करण्यास नाखूष होते. कारण त्यांनी समालोचन आणि स्टुडिओ एक्सस्पर्ट यासारख्या कामातून भरपूर कमाई करतात. अजित आगरकर २००९ टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग - मुंबईचा माजी कर्णधार अजित आगरकरने भारतासाठी २६ कसोटी, १९१ वनडे आणि चार टी-२० सामने खेळले आहेत. तो २००७ साली टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता, ज्याचे नेतृत्व एमएस धोनीने केले होते. वरिष्ठ निवड समितीचे सध्याचे सदस्य सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला, श्रीधरन शरथ आणि शिव सुंदर दास आहेत, ज्यांनी फेब्रुवारीमध्ये शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. निवडकर्ता होण्यासाठी कोणते निकष आहेत? निवडकर्ता पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने किमान सात कसोटी सामने किंवा ३० प्रथम श्रेणी सामने किंवा १० एकदिवसीय सामने आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत. तसेच त्याने किमान पाच वर्षांपूर्वी खेळातून निवृत्ती घेतली असावी. जर एखादी व्यक्ती कोणत्याही क्रिकेट समितीचा पाच वर्षे सदस्य असेल, तर तो पुरुष निवड समितीचा सदस्य होण्यास पात्र असणार नाही. हेही वाचा - ENG vs AUS: “इंग्लंड आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या मर्यादेपलीकडे…”,स्टोक्स आणि मॅक्युलमच्या रणनीतीवर मार्क बुचरची सडकून टीका चेतन शर्माचे स्टिंग ऑपरेशन - झी न्यूजच्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माला भारतीय खेळाडू तंदुरुस्त राहण्यासाठी इंजेक्शन्स घेत असल्याचे सांगत असल्याचे ऐकण्यात आले होते. टी-२० विश्वचषकापासून भारताचे टी-२० मध्ये कर्णधार असलेला हार्दिक पांड्या त्याच्या घरी सतत येत होता, असा दावाही त्याने केला आहे. नोव्हेंबरमध्ये, टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा इंग्लंडकडून उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने संपूर्ण निवड समिती बदलली होती. यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये चेतन शर्माची पुन्हा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.