Rishabh Pant Umpire Controversy in IND vs ENG 1st Test Day 3: भारत वि. इंग्लंड पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. तिसऱ्या दिवशी भारताने २ विकेट्स घेतले आहेत. परंतु खेळपट्टी ही फलंदाजीसाठी मदत करणारी आहे. इंग्लंडचे नवे फलंदाज सहजतेने या खेळपट्टीवर धावा करत आहेत. यादरम्यान ऋषभ पंत पंचांशी बोलताना त्यांच्या उत्तराने सहमत नसल्याने त्याने थेट चेंडू फेकून दिला, ज्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल ऋषभ पंतला दंड होऊ शकतो. फक्त नाराजीच नव्हे रविवारी पहिल्या सत्रात भारताच्या उपकर्णधाराने चेंडू बदलण्याची विनंती पंचांनी नाकारल्यानंतर पंतने पंच पॉल रीफेल यांच्यासमोरच अशी प्रतिक्रिया दिली की ते देखील चकित झाले. नकार दिलेल्या विनंतीवर पंत निराश होत चेंडू जमिनीवर फेकला.

ऋषभ पंतने पंचांबरोबर का घातला वाद?

भारत वि. इंग्लंड यांच्यात पहिल्याच कसोटीत अटीतटीची टक्कर पाहायला मिळत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. खरंतर, भारतीय संघ आणि पंचांमध्ये चेंडूवरून चर्चा सुरू असलेली पाहायला मिळाली. भारतीय खेळाडू, विशेषतः ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज, चेंडूची स्थिती पाहून नाराज दिसले आणि त्यांनी पंचांना तो बदलण्याची विनंती केली, परंतु पंचांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.

चेंडूबाबतची ही चर्चा इथेच थांबली नाही. दोन षटकांनंतर, ६३ व्या षटकात, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही चेंडूच्या आकाराबाबत प्रश्न उपस्थित केले आणि पंचांना तो बदलण्याची विनंती केली. पंचांनी पुन्हा एकदा गेजने चेंडू तपासला आणि यावेळीही नियमांनुसार चेंडू योग्य असल्याचे आढळून आले. ज्यामुळे पंचांनी चेंडू बदलण्यास नकार दिला. यावेळी जसप्रीत बुमराह देखील पंचांशी बोलताना दिसला, परंतु पंचांनी आपला निर्णय बदलला नाही. या घटनेचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाला कधी मिळाला नवीन चेंडू?

काही षटकांनंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंची ही मागणी मान्य करण्यात आली. पंचांनी पुन्हा एकदा खेळाडूंच्या विनंतीनुसार चेंडू तपासला आणि चेंडूचा आकार बदलेला दिसल्याने, पंचांनी ७४ व्या षटकानंतर चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. नवीन चेंडू मिळण्याच्या ६ षटकांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला. कसोटी क्रिकेटमध्ये, प्रत्येक संघाला ८० षटकं टाकल्यानंतर एक नवीन चेंडू दिला जातो.