Rohit Sharma to Play Ranji Trophy? : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या १० कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माची बॅट शांतट होती. यानंतर रोहितने देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असा अनेक माजी खेळाडूंनी सल्ला दिला आहे. यानंतर आता रोहित शर्मा रणजी ट्रॉफीच्या मुंबई संघासह सराव करण्यासाठी पोहोचला आहे.
रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळणार?
आज म्हणजेच मंगळवारी (१४ जानेवारी) सकाळी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या रणजी ट्रॉफी सराव सत्रात भाग घेणार असल्याची माहिती भारतीय कर्णधार रोहित शर्माने मुंबई संघ व्यवस्थापनाला दिली होती. यासह रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमवर सकाळीच सरावासाठी पोहोचल्याचा व्हीडिओही रेव्ह स्पोर्ट्सने शेअर केला आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी रोहित शर्माने एमसीए-बीकेसी मैदानावर पुन्हा सराव सुरू केला आहे.
मुंबई संघ त्यांच्या पुढील रणजी करंडक साखळी फेरीसाठी सेंटर-विकेट सराव सत्र करणार आहे. मुंबईचा सामना जम्मू आणि कश्मीर संघाविरूद्ध असणार आहे. एमसीएच्या एका सूत्राने सांगितले की, रोहित शर्माने अद्याप रणजी सामन्यासाठी तो उपलब्ध असेल की नाही याबाबत माहिती दिलेली नाही. रणजी ट्रॉफी लीग सामने खेळायचे की नाही यावर तो विचार करत आहेत.
एमसीएच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “तो मुंबई रणजी करंडक संघासोबत सराव सत्रासाठी येणार आहे. तो जम्मू-काश्मीरविरुद्धचा पुढील रणजी सामना खेळणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. वेळ आल्यावर तो एमसीएला याबाबत माहिती देईल.” रोहित शर्मा मुंबई संघाकडून २०१५ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध अखेरचा रणजी सामना खेळला होता. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माची बॅट शांत होती. चार कसोटी सामन्यांमध्ये त्याने १०.९३ ची सरासरीने ३,९, १०, ३, ६ धावा केल्या. त्यानंतर सिडनी मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने विश्रांती घेतली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले होते की, सर्वांनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे. सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्यानंतर गंभीर म्हणाला होता, “प्रत्येकाने देशांतर्गत क्रिकेट खेळावे असे मला नेहमीच वाटते. देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व दिले पाहिजे. फक्त एकच सामना नाही, तर प्रत्येकाने उपलब्ध असल्यास आणि लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. हे अगदी सोपे आहे. जर तुम्ही देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व दिले नाही तर तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये हवे ते खेळाडू कधीच मिळणार नाहीत.
रणजी ट्रॉफीची उर्वरित फेरी २३ जानेवारीपासून सुरू होत असून विराट कोहलीही दिल्लीकडून रणजी सामना खेळतो की नाही याची सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. कोहली संघाकडून शेवटचा २०१२ मध्ये खेळला होता. बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यांनी आपल्या करारबद्ध खेळाडूंसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक केलेलं नाही.
CAPTAIN ROHIT SHARMA ARRIVED FOR PRACTICE. [RevSportz]
– Hitman will train with Mumbai Ranji team ? pic.twitter.com/gYZ8ABwt7wThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Johns. (@CricCrazyJohns) January 14, 2025
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय फलंदाज शुबमन गिल कर्नाटकविरुद्ध पंजाबकडून खेळताना दिसू शकतो. गिलचा ऑस्ट्रेलिया दौराही निराशाजनक होता, चांगली सुरुवात करूनही त्याला सातत्याने तशी कामगिरी करता आली नाही. तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याचा स्कोअर ३१, २८,१, २० आणि १३ होता.