१९ नोव्हेंबर २०२३ भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडे वर्ल्डकप फायनल कोणीच विसरू शकत नाही. वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये भारताने सर्व सामने जिंकले होते, पण अंतिम सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. भारताच्या विजयाची वाट पाहत असलेल्या सर्वच चाहत्यांसाठी आणि संपूर्ण भारतीय संघासाठी हा खूप मोठा धक्का होता. पण रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघाने मात्र पुढील टी-२० विश्वचषकात या पराभवाचा बदला घेत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले होते.

टी-२० विश्वचषक २०२४ चा विजेता भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत जेतेपद पटकावलं होतं. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत वादळी कामगिरी केली होती. भारतीय संघाचा गट टप्प्यात सामना कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरूद्ध झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने कांंगारू संघाचा पराभव करत या संघाला स्पर्धेबाहेर केलं होतं.

रोहित शर्माने या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई करत मॅचविनिंग ९२ धावांची खेळी केली होती. यादरम्यान रोहित शर्माच्या डोक्यात काय चालू होतं आणि भारताने ऑस्ट्रेलियाकडून कसा बदला घेतला, ड्रेसिंग रूममध्ये कसं वातावरण होतं. यावर रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

रोहित शर्मा प्रश्न विचारण्यात आला की वनडे वर्ल्डकपमधील पराभवानंतर टी-२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामन्यात विजय मिळवण्यासाठी एक वेगळंच प्रोत्साहन आणि ऊर्जा होती का… यावर रोहित म्हणाला, “आम्हाला माहित होतं की आम्ही जर हा सामना जिंकलो तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होईल. हेच आम्हा सर्वांचं मोठं मोटिव्हेशन होतं. क्रिकेटचा सामना हा गेल्यावेळी काय झालं होतं आणि आता आम्हाला त्यांना धडा शिकवायचा आहे, हा विचार करून खेळला जात नाही. त्या संघाविरूद्ध तुम्हाला चांगली कामगिरी करायची असते पण यापूर्वी काय झालं होतं यावरून काही नसतं.”

“राग सर्वांच्या मनात असतो, डोक्यात कुठेतरी ती गोष्ट असते. यांनी आमचा तो १९ नोव्हेंबरचा दिवस खराब केला होता. फक्त आमचाच नाही संपूर्ण देशाचा. त्यामुळे आता आपण पण त्यांना काहीतरी आपण गिफ्ट दिलं पाहिजे. हा ड्रेसिंग रूममध्ये आमच्या आमच्यात या चर्चा सुरू असतात. मजा मस्ती सुरू असते की यांना स्पर्धेबाहेरूनच काढूया. मजा येईल. पण जेव्हा टॉसनंतर सामना सुरू होतो तेव्हा तुम्ही तुमचं १०० टक्के देऊन चांगली कामगिरी कशी कराल, यावर लक्ष असतं…”, असं रोहित पुढे म्हणाला.

“जेव्हा मी फलंदाजी करतोय तेव्हा मी हा विचार करत नाही की, चल मी आता यांना स्पर्धेबाहेर करतो. असं नाही होतं. मला त्यांच्याविरूद्ध चांगलीच कामगिरी करायची आहे. मी त्यांच्यासमोर कशी चांगली फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारू शकतो, हेच डोक्यात होतं.” रोहित शर्माची मुलाखत सुरू होती तिथे बाजूच्या स्क्रीनवर रोहितची ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळी दाखवली जात होती. अनंत त्यागी त्याला प्रश्न विचारत होता, तितक्यात रोहित त्याला म्हणाला, “मजा येतेय पाहायला, थांब मला बघू दे जरा.”

रोहित शर्माने मिचेल स्टार्कच्या एका षटकात २८ धावा कुटल्या होत्या, ज्यात ६ षटकार आणि एक चौकार होता. त्या खेळीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “माझा प्लॅन होता, सर्वच गोलंदाजांविरूद्ध आक्रमक फलंदाजी करू. मिचेल स्टार्क मला माहितीये, इतके वर्ष मी त्याच्याविरूद्ध खेळलो आहे. माझे काही प्लॅन मी त्याच्याविरूद्ध तयार केले होते. मला दोन्ही बाजूला फटके मारायचे होते. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खूप स्मार्ट आहेत. त्यांना माहितीये फलंदाज कुठे फटके खेळायचा प्रयत्न करतोय. हवा तिथे जास्त आहे तर तिथे फटके खेळेल. त्यामुळे मला दोन्ही बाजूला फटके खेळायचे होते.”

“मी दोन्ही बाजूला फटके खेळण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून त्यांना वाटेल की हा दोन्ही साईडला खेळतोय. त्यामुळे काय होतं की, कर्णधार आणि गोलंदाज यांना चर्चा करणं, गोलंदाजी करणं, फिल्ड सेट करणं अवघड जातं. नक्की चेंडू कुठे टाकू हे मुश्किल होतं. मी जर ऑफसाईडला फटका खेळतोय तर त्याला वाईड चेंडू टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे गोलंदाज तुम्हाला बाद करायला नाही बघत आहे. मी अर्धी लढाई इथेच जिंकलो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. टी-२० नंतर कसोटी क्रिकेटलाही रोहितने अलविदा केलं. आता रोहित फक्त वनडे सामना खेळताना दिसणार आहे.