Rohit Sharma angry on Yashasvi and Sarfaraz : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात टीम इंडियाने भरपूर धावा केल्या आणि ४३४ धावांनी सर्वात मोठा विजय नोंदवला. या सामन्यादरम्यान अशा काही गोष्टी घडल्या, ज्या नेहमी लक्षात राहतील. यशस्वी जैस्वालने सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले. सर्फराझ खानने पदार्पण करत दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. या सगळ्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा सामन्याच्या दुसऱ्या डावात जैस्वाल आणि सर्फराझवर संतापल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रोहित का संतापला होता? जाणून घेऊया.

यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४३० धावा करून डाव घोषित केला. डाव घोषित करण्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसला. जेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ४१२ धावा होती आणि सामना ड्रिंक ब्रेकसाठी थांबवण्यात आला होता. त्यावेळी काहीसा गोंधळ उडालेला पाहिला मिळाला. झाले असे की, यशस्वी जैस्वाल आणि सर्फराझला वाटले की कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला आहे. त्यामुळे या दोघांनी मैदानातून परतण्यास सुरुवात केली.

रोहित शर्माने उचलला होता बूट –

यानंतर यशस्वी आणि सर्फराझ मैदानातून परतायला लागले पाहून रोहित शर्माला राग आला. तो ड्रेसिंग रूममध्ये नुकताच बूट घालायला उठला होता. यानंतर हातात बूट घेऊन तो ड्रेसिंग रूममधून हातवारे करुन असे म्हणत असल्याचे दिसत होते की, डाव अजून घोषित केला नाही, त्यामुळे माघारी फिरा आणि फलंदाजी करा. त्यानंतर जैस्वाल आणि सर्फराझ पुन्हा फलंदाजीला गेले. त्यामुळे बेन स्टोक्ससह सर्व इंग्लंडचे खेळाडू मैदानाबाहेर यायला लागलेले, पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी परत गेले. त्यानंतर १८ धावा झाल्यानंतर रोहित शर्माने ४ गडी बाद ४३० धावांवर डाव घोषित केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs ENG : ‘त्याला पाहून मला युवा सचिन तेंडुलकरची आठवण येते’, रवी शास्त्रीकडून भारतीय फलंदाजाचे कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकोटमध्ये सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ४४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताने ४ बाद ४३० धावा करून दुसरा डाव घोषित केला. एकूण आघाडी ५५६ धावांची झाली. यानंतर ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १२२ धावांवर आटोपला. मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.