यूएई येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत ४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात लढत झाली. या सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताला सामना गमवावा लागल्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर टीका केली गेली. त्याने झेल सोडल्यामुळेच पाकिस्तानचा विजय झाला, असा दावा समाजमाध्यमावर केला गेला. अर्शदीपला लक्ष्य केल्यानंतर भारतीय तसेच जगभरातील क्रिकेटपटूंनी त्याला पाठिंबा दिला. दरम्यान, क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेदेखील अर्शदीप सिंगची पाठराखण केली आहे.

हेही वाचा >>> …तरीही सुरेश रैना जगभरात खेळणार क्रिकेट, निवृत्तीच्या घोषणेनंतर नवी माहिती समोर, जाणून घ्या नेमकं कसं?

“प्रत्येक खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याच्यात असलेले सर्वोत्तम देता असतो. त्यामुळे खेळाडूंना सातत्याने पाठिंब्याची गरज असते. खेळामध्ये कधी विजय होतो तर कधी पराभवाला सामोरे जावे लागते. क्रिकेट तसेच अन्य खेळांना वैयक्तिक हल्ल्यांपासून दूर ठेवुया. अर्शदीप सिंग मेहनत करत राहा,” असे सचिन तेंडुलकर म्हणाला आहे.

हेही वाचा >>> आधी म्हणाला फक्त धोनीचा मेसेज आला, आता पुन्हा केलं मोठं विधान; विराटच्या नव्या पोस्टची चर्चा

दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अटीतटीची लढत होत असताना अर्शदीप सिंगने महत्त्वाचा झेल सोडला होता. त्यानंतर याच झेलमुळे भारताचा पराभव झाला, असा दावा सोशल मीडियावर केला गेला. याच कारणामुळे अर्शदीपला खलिस्तानी म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विराट कोहली, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग तसेच अन्य दिग्गज त्याला पाठिंबा देण्यासाठी समोर आले होते.