ब्रिस्टल : शफाली शर्मा (९६) आणि स्मृती मानधना (७८) यांच्या १६७ धावांच्या दमदार सलामीनंतर भारतीय महिला संघाची पडझड झाली. त्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या डावातील ९ बाद ३९६ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताची एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५ बाद १८७ अशी अवस्था झाली.  स्मृती-शफाली यांच्या दिमाखदार फलंदाजीनंतर पूनम राऊत (२), शिखा पांडे (०) आणि कर्णधार मिताली राज (२) यांनी निराशा केली. इंग्लंडने गुरुवारी १२७ धावांची भर घालून पहिला डाव घोषित केला. भारताकडून स्नेह राणाने चार व दीप्ती शर्माने तीन बळी घेतले.