Kapil Dev welcomes BCCI’s decision : बीसीसीआयने २०२३-२४ या वर्षासाठी जाहीर केलेल्या खेळाडूंच्या केंद्रीय कराराच्या यादीत विविध श्रेणींमध्ये एकूण ३० खेळाडूंचा समावेश केला आहे. गेल्या करारात समाविष्ट झालेल्या ७ खेळाडूंना यावेळी कोणत्याही श्रेणीत स्थान मिळालेले नसून, यावेळी ११ नवीन खेळाडूंचा करारात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने नवीन वार्षिक करारामध्ये श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या नावाचा समावेश केला नाही, ज्यामुळे अनेक माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

बीसीसीआयने अगदी योग्य निर्णय घेतला –

आता विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी बोर्डाच्या निर्णयाचे कौतुक केले. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीसारख्या प्रथम श्रेणी स्पर्धा वाचवण्यासाठी हे आवश्यक पाऊल असल्याचे सांगितले. बीसीसीआयने जारी केलेल्या नवीन वार्षिक केंद्रीय कराराबद्दल कपिल देव म्हणाले की, “होय, यामुळे काही खेळाडूंना त्रास होईल आणि काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही मोठे नाही. बोर्डाचा हा निर्णय अगदी योग्य आहे. देशांतर्गत क्रिकेट लक्षात घेऊन आवश्यक पावले उचलल्याबद्दल मी बीसीसीआयचे अभिनंदन करतो. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला पूर्णपणे सिद्ध केले, तर तो देशांतर्गत क्रिकेटला तितकेसे महत्त्व देत नाही आणि तिथे खेळणे थांबवतो, हे पाहून मला खूप वाईट वाटते. हा संदेश बोर्डाने सर्व खेळाडूंना खूप आधी द्यायला हवा होता.”

आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे –

विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव आपल्या वक्तव्यात पुढे म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करणाऱ्या खेळाडूंनी वेळ मिळेल, तेव्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या राज्यासाठी खेळावे. कारण यामुळे देशांतर्गत खेळाडूंनाही मोठा पाठिंबा मिळतो. यावर माझा नेहमीच विश्वास आहे.” वार्षिक खेळाडूंची केंद्रीय करार यादी जाहीर करण्यासोबतच बीसीसीआयने माजी खेळाडूंच्या पेन्शनमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल देव यांनीही या निर्णयाबद्दल मंडळाचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, “बीसीसीआयने खेळाडूंच्या पेन्शनच्या रकमेत वाढ केली आहे, ज्यांचे कुटुंब पेन्शनवर अवलंबून आहे, त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.”

हेही वाचा – NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल

कोणाला किती रुपये मिळणार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वेगवेगळ्या श्रेणीतल्या खेळाडूंना दरवर्षी ठराविक रक्कम मानधन म्हणून देतं. त्यानुसार ए+ श्रेणीतल्या खेळाडूंना दरवर्षी सात कोटी रुपये दिले जातात. ए श्रेणीतल्या खेळाडूंना पाच कोटी, बी श्रेणीतल्या खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि सी श्रेणीतल्या खेळाडूंना दरवर्षी एक कोटी रुपये दिले जातात. जे खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये नियमितपणे खेळत असतात त्यांचाच ए प्लस श्रेणीत समावेश केला जातो.