Sourav Ganguly’s Reaction on Rohit’s Leadership : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबाबत मोठा खुलासा केला आहे. कर्णधार म्हणून त्याने रोहित शर्माचे खूप कौतुक केले आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले होते आणि त्यामुळेच त्याच्या कर्णधारपदावर कधीही शंका आली नाही. २०२१ मध्ये विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

जानेवारी २०२२ मध्ये विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. यानंतर रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्माला अचानक एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधार नियुक्त करण्यात आले. यानंतर त्याच्याकडे कसोटी संघाची कमानही सोपवण्यात आली होती. आयपीएलमधील कर्णधारपदाच्या अनुभवामुळे रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे.

रोहित शर्मामध्ये मला ती प्रतिभा दिसली होती – सौरव गांगुली

रेवस्पोर्टझशीशी संवाद साधताना सौरव गांगुलीने रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “विश्वचषकात त्याने भारतीय संघाचे किती उत्कृष्ट नेतृत्व केले होते. त्याने भारताला अंतिम फेरीत नेले. माझ्या मते, अंतिम सामन्यातील पराभवापर्यंत भारत २०२३ च्या विश्वचषकातील सर्वोत्तम संघ होता. त्यामुळे माझ्या मते रोहित शर्मा एक उत्कृष्ट कर्णधार आहे.”

हेही वाचा – MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल

मी त्याच्यातील प्रतिभा पाहिली होती –

सौरव गांगुली पुढे म्हणाला, “त्याने अनेक आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याने आजवर ज्या प्रकारे कर्णधारपद भूषवले आहे, त्याचे मला आश्चर्य वाटत नाही. मी जेव्हा बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा तो संघाचा कर्णधार होता. मी त्याला कर्णधार या कारणासाठी बनवले होते, कारण मी त्याच्यातील प्रतिभा पाहिली होती.” रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचला होता.

हेही वाचा – Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी अतिशय उत्कृष्ट राहिली आहे. रोहित शर्माने तिन्ही फॉरमॅटसह १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या काळात रोहित शर्माने टीम इंडियाला ७० टक्क्यांहून अधिक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.

Story img Loader