भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल क्लब एटीके मोहन बागानच्या संचालक मंडळावरून पायउतार झाला आहे. उद्योगपती संजीव गोयंका यांचे मोहन बागान संघात स्वामित्व आहे. गोयंका यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लखनऊ फ्रेंचायझीसाठी यशस्वीपणे बोली लावल्यानंतर हितसंबंधांचा संघर्ष उद्भवू शकतो. वाद वाढत गेल्याने गांगुलीने आधीच मोहन बागान संघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

न्यूज १८च्या वृत्तानुसार, २०१४ मध्ये आयएसएल सुरू झाल्यापासून गांगुली ऍटलेटिको-कोलकाताचा भाग होता. क्लबचे नंतर एटीके (आमर तोमर कोलकाता) असे नामकरण करण्यात आले आणि नंतर मोहन बागान या क्लबमध्ये तो विलीन झाला. गोयंका यांच्या आरपी-एसजी ग्रुपने सोमवारी आयपीएलचा लखनऊ संघ तब्बल ७०९० कोटी रुपयांना विकत घेतला.

आयसीसीच्या एका वरिष्ठ सूत्राने गुरुवारी सांगितले, “होय, सौरव गांगुलीने आधीच एटीके मोहन बागान व्यवस्थापनाला पत्र पाठवून कळवले आहे, की तो क्लबच्या संचालक मंडळाचा भाग होऊ शकणार नाही.” याचे कारण म्हणजे आरपी-संजीव गोएंका ग्रुप आता आयपीएल संघाचा मालक आहे. त्यामुळे हे हितसंबंधांच्या संघर्षाचे प्रकरण असू शकते.

हेही वाचा – IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबादला दिला ‘धक्का’; म्हणाला, “मी आता…”

“आयपीएलची बोली पूर्ण झाल्यानंतर ही एक औपचारिकता होती आणि गांगुलीने आवश्यक काम केले,” असे सूत्राने सांगितले. गोयंका यांची बोली यशस्वी होईपर्यंत हितसंबंधांचा संघर्ष नव्हता, कारण ते आयपीएलचा भाग नव्हते. गोयंका म्हणाले होते, ”मला वाटते की तो (एटीके) मोहन बागानमधून पूर्णपणे बाहेर पडेल. सौरवला याबद्दल फक्त घोषणा करायची आहे.”