विराट कोहीलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२० वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७८ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. भारताने विजयासाठी दिलेलं २०२ धावांचं आव्हान लंकेला पेलवलं नाही, श्रीलंकेचा संघ १२३ धावांपर्यंत मजल मारु शकला. पाहुण्या संघाकडून धनंजय डी-सिल्वाने ५७ तर अँजलो मॅथ्यूजने ३१ धावा करत भारतीय गोलंदाजांना झुंज दिली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिले ४ फलंदाज अवघ्या २६ धावांत माघारी परतले. यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि डी-सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. भारताकडून नवदीप सैनीने ३, शार्दुल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेतला. त्याआधी, सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांची अर्धशतक तर मधल्या फळीत विराट कोहली, शार्दुल ठाकूर आणि मनिष पांडे यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात २०१ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत त्याचा निर्णय चुकीचा ठरवला. श्रीलंकेकडून लक्षन संदकनने मधल्या षटकांमध्ये प्रभावी मारा करत ३ बळी घेतले. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी लंकन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. धवनने ५२ तर लोकेश राहुलने ५४ धावा केल्या. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. पंतला विश्रांती देऊन संघात संधी मिळालेल्या संजू सॅमसनला केवळ ६ धावा करता आल्या. यानंतर श्रेयस अय्यरही झटपट माघारी परतला. यानंतर विराट आणि मनिषने छोटेखानी भागीदारी करत भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र विराट चोरटी धाव काढताना माघारी परतल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला. मात्र मुंबईकर शार्दुल ठाकूरने मनिष पांडेच्या साथीने आक्रमक फटकेबाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. लंकेकडून संदकनने ३ तर लहिरु कुमारा आणि डी-सिल्वाने १-१ बळी घेतला.