विश्वासूंनी पाठ फिरवल्यावर स्वार्थ साधण्यासाठी भेटीचा घाट
आपल्या गटातील विश्वासू व्यक्तींनीच पाठ फिरवल्यावर हतबल झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्यकारी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी नागपूरला भेटून साद घातली. या वेळी आपला उमेदवार उभा करायचा की पवार उभे राहिल्यावर त्यांना पाठिंबा देऊन आपला स्वार्थ साधण्यासाठी श्रीनिवासन यांनी पवार यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.
याबाबत श्रीनिवासन यांनी सांगितले की, ‘‘तुम्ही जे तर्कवितर्क लढवत आहात, तेच माझ्या मनात आहेत.’’
श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकल्यावर त्यांच्याविरोधात पवार यांनी पहिल्यांदा आवाज उठवला होता. श्रीनिवासन आणि पवार हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जातात, पण राजकारणात कुणी कुणाचाच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असे म्हटले जाते. त्यामुळे जर या दोन दिग्गज धुरिणांमध्ये मनोमीलन झाले तर बीसीसीआयची निवडणूक होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पवार यांची भेट घेण्यापूर्वी श्रीनिवासन यांनी बीसीसीआयमधील आपल्या विश्वासू व्यक्तींची भेट घेऊन साऱ्या गोष्टींचा अंदाज घेतला होता. श्रीनिवासन यांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नेमके काय करायचे, यावर ६-७ संघटकांनी चर्चा केल्याचे समजते.

पवार यांचा मार्ग मोकळा?
श्रीनिवासन आणि भाजपच्या नेत्यांच्या पाठिंबा मिळाल्यास पवार यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कारण त्यानंतर संपूर्ण पूर्व, दक्षिण आणि पश्चिम विभाग पवारांच्या बाजूने असेल आणि त्यांना अध्यक्षपदासाठी लागणारी आवश्यक मते मिळू शकतात. अशा परिस्थितीमध्ये पवार अन्य कुणाला उभे न करता स्वत: उभे राहतील.

पवार यांच्याकडे चार निश्चित मते
शरद पवार यांच्याकडे सध्याच्या घडीला चार निश्चित मते आहेत. पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर विदर्भ, महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या संघटनांवरही पवारांचा वचक आहे.

पवार काय करू शकतील
पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) मोठय़ा नेत्यांना गळ घातली तर अनुराग ठाकूर यांना पवारांच्या बाजूने जावे लागेल. कारण ठाकूर हे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत.

बीसीसीआयमध्ये मतभेद -पवार
नागपूर : बीसीसीआयमध्ये मतभेदाचे वातावरण असून ते कमी करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून एन. श्रीनिवासन यांनी आपली भेट घेतली, असे एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयसीसीचे कार्याध्यक्ष अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या बुधवारच्या गुप्तभेटीबाबत स्पष्टीकरण दिले. या भेटीबद्दल पवार म्हणाले की, ‘‘दालमिया यांच्या अंत्यदर्शनासाठी कोलकात्याला गेलो असताना तेथे माझी आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर त्यांनी मला नागपुरात भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या बैठकीत बीबीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली नाही. सहकाऱ्यांचे याबद्दलचे मत जाणून घेणे आवश्यक आहे.
पवार पुढे म्हणाले की, ‘‘श्रीनिवासन अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. सध्या बीसीसीआयमध्ये मतभेदाचे वातावरण आहे. ते कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संघटना सुरळीत चालावी, असे कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे. मी किंवा शशांक मनोहर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना संघटनेत चांगले वातावरण होते.’’

श्रीनिवासन यांची पवार भेट का?
आपल्याकडे १० मते असल्याचे श्रीनिवासन यांना वाटत होते, पण सध्याच्या घडीला आपल्याकडे सहा मते असल्याचे त्यांना वाटत आहे. त्यांच्या घरी झालेल्या बैठकीला पूर्व विभागाचा एकच संघटक उपस्थित होता. दक्षिण विभागाची चारही मते त्यांना मिळतील, पण पूर्व विभागातील सहाच्या सहा मते आपल्याला मिळतील याबाबत श्रीनिवासन यांना शाश्वती नाही. कारण पूर्व विभागात अमिताभ चौधरी यांच्यापेक्षा अनुराग ठाकूर यांच्या शब्दाला वजन असल्याचे म्हटले जाते आणि ठाकूर यांनी बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पूर्व विभागाने जरी चौधरी यांचा प्रस्ताव ठेवला तरी ते सारेच त्यांना मतदान करतील, अशी शाश्वती त्यांना देता येत नाही. त्यामुळे आपण उमेदवार उभा केल्यास तो निवडणू येण्याची शाश्वती नाही, त्यामुळे तुम्हाला पाठिंबा देतो, पण माझे हित सांभाळा हे सांगण्यासाठी श्रीनिवासन यांनी पवार यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.

पूर्व विभागात काय चाललंय
पूर्व विभागातील ओदिशाचे अशिरबाद बेहरा यांचा श्रीनिवासन यांना पाठिंबा आहे. आसामच्या गौतम रॉय यांनी अजूनही आपले मत व्यक्त केलेले नाही. बंगालच्या संघटनेने दालमिया यांच्या शोकसभेनंतर आपला निर्णय जाहीर करणार, असे सांगितले आहे. झारखंडचे अमिताभ चौधरी हे अध्यक्षपदासाठी उभे राहणार आहेत. त्रिपुराचे सौरव दासगुप्ता हे अनुराग ठाकूर यांचे निकटवर्तीय समजले जातात. नॅशनल क्रिकेट क्लब हे दालमिया यांचे मित्र के. पी. कजारिया यांच्या हातामध्ये असून त्यांनी आपला निर्णय अजूनही घेतलेला नाही.

अनुराग ठाकूर यांची बाजी?
पूर्व विभागाच्या संघटकांचे मन वळवण्यात सध्याच्या घडीला बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यशस्वी झाल्याचे दिसत आहे. कारण एन. श्रीनिवासन यांना आपल्याला पूर्व विभागातील सर्व म्हणजे सहा मते मिळतील, अशी खात्री होती. पण त्यांच्या बाजूने सध्याच्या घडीला फक्त दोनच मते असून चार मते फोडण्यात ठाकूर यशस्वी ठरल्याचे म्हटले जात आहे.