प्रशांत केणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००७मध्ये एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने साखळी टप्प्यातच अनपेक्षित गाशा गुंडाळला आणि राहुल द्रविडने भारताचे कर्णधारपद सोडले. मग काही महिन्यांतच झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात नवा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारताला विजेतेपद मिळवून दिले. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे हे तत्कालीन दर्जेदार खेळाडू भारतीय संघात नव्हते. त्यावेळी नव्या असलेल्या या क्रिकेटच्या वेगवान प्रकारासाठी विशिष्ट खेळाडूंची निवड झाली होती. हेच या यशाचे महत्त्वाचे कारण होते. दुर्दैवाने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या त्यानंतरच्या १५ वर्षांच्या इतिहासात या यशाची पुनरावृत्ती भारताला कधीच करता आली नाही. गतवर्षी झालेल्या विश्वचषकात भारताला बाद फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यावर त्याच चुका पुन:पुन्हा करीत असल्याचे अधोरेखित होते.

नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताला जेमतेम दोन सामने जिंकता आले. विजय जितके दिमाखदार, तितकेच पराभवही खराब कामगिरी, संघनिवड यांचे वाभाडे काढणारे होते. ७ ते १५ या मधल्या षटकांमधील धिमी फलंदाजी, जसप्रीत बुमरा-मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत बोथट वेगवान मारा, रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे डावखुऱ्या फलंदाजाच्या अट्टहासापायी दिनेश कार्तिकला डावलून ऋषभ पंतला संधी अशी अनेक कारणे प्रकर्षांने समोर आली. ट्वेन्टी-२० प्रकारात निर्णायक ठरणाऱ्या १९व्या षटकात भुवनेश्वर कुमारने सामने गमावले आहेत.

गतवर्षीचा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धा या अमिरातीत म्हणजेच भारतीय उपखंडात झाल्या. यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या उसळणाऱ्या खेळपट्टय़ांवर खेळायचा आहे. परंतु बुमराच्या साथीला भुवनेश्वर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंडय़ा यांचा समावेश केला आहे. दुखापतीतून सावरलेले बुमरा आणि हर्षल पूर्णत: तंदुरुसत आहेत का? बुमरा आणि हर्षलकडे अखेरच्या हाणामारीच्या षटकांत प्रतिस्पर्ध्याना जखडून ठेवण्याची क्षमता आहे. बुमरा पॉवरप्लेमध्येही भेदक मारा करतो आणि बळीसुद्धा मिळवतो. पण परदेशात टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या अनुभवी मोहम्मद शमीला वगळले आहे. फलंदाजीचीही उत्तम क्षमता असलेल्या ट्वेन्टी-२० विशेषज्ञ दीपक चहरलाही संघाबाहेर ठेवले आहे. १५० किमी प्रति ताशी वेगाने सातत्याने चेंडू टाकणारा उमरान मलिकसुद्धा निवड समितीचे लक्ष वेधू शकला नाही. फिरकी माऱ्यात अनुभवी रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना स्थान दिले आहे. तशी अश्विनने गतविश्वचषकातही चांगली कामगिरी केली होती. परंतु संघनिवड करताना सहाव्या गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध राहील, याची काळजी घ्यायला हवी.

आशिया चषकात राहुल आणि रोहित यांनी काही वैयक्तिक खेळी साकारल्या. पण सलामीची जोडी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व प्रस्थापित करीत बहरताना आढळली नाही. राहुलला अपेक्षित सूर गवसलेला नाही. त्याचा स्ट्राइक रेट चिंताजनक आहे. नुकतेच शतक साकारणाऱ्या विराट कोहलीला पुन्हा त्याची लय सापडली आहे. सूर्यकुमार यादव ट्वेन्टी-२० प्रकारात चौफेर फटकेबाजी करीत आहे. राहुल, रोहित, कोहली आणि सूर्यकुमार हे फलंदाजीचे पहिले चार क्रमांक गतविश्वचषकाप्रमाणेच कायम आहेत. पण फलंदाजीच्या फळीतील क्रमांक लावल्यावर दीपक हुडाला थेट मधल्या फळीत संधी मिळते आहे. श्रेयस अय्यर, इशान किशन यांना निवड समितीने संघात स्थान दिलेले नाही. गतविश्वचषकातील अपयशानंतर राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील भारताने संघनिवडीचे अनेक आश्चर्यकारक प्रयोग करून पाहिले. पण या सर्व प्रयोगांनंतर निवडलेल्या विश्वचषक संघात त्याचे निष्कर्ष उतरलेले नाहीत.

उमरान, शमी संघात हवे होते!

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेसाठी तीन फिरकी गोलंदाजांऐवजी दोन घेऊन आणखी एका वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश करायला हवा होता. दीडशेहून अधिक वेगाने चेंडू टाकणाऱ्या युवा उमरानला योग्य वेळी संधी मिळायला हवी. वेगवान गोलंदाज २०-२५ वर्षांचा असताना टिच्चून गोलंदाजी करू शकतो. नंतर त्याचा वेग मंदावतो. शमीचा अनुभवसुद्धा भारताला उपयुक्त ठरला असता. ऑस्ट्रेलियातील मैदानांचा अनुभव असलेल्या शमीने ‘आयपीएल’मध्ये लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. फलंदाजीच्या फळीत शुभमन गिल किंवा श्रेयस यापैकी एखादा पर्याय उत्तम ठरला असता.

-दिलीप वेंगसरकर, माजी कर्णधार, माजी निवड समिती प्रमुख

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunday special odi world cup competition india captaincy ysh
First published on: 18-09-2022 at 00:02 IST