टीम इंडियाचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी भारताला एक गुरुमंत्र दिला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये आज रंगणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया तीन फिरकीपटूंसोबत खेळू शकते, असे गावसकरांनी म्हटले आहे. हा सामना अबुधाबीमध्ये आयोजित केला जाईल. हार्दिकने गोलंदाजी केली, तर टीम इंडिया तीन फिरकीपटूंसोबत जाऊ शकते, असे गावसकरांनी सांगितले.

अशा परिस्थितीत वरुण चक्रवर्तीच्या जागी रवीचंद्रन अश्विनला आणले जाऊ शकते. आणि राहुल चहर हा देखील चांगला पर्याय असू शकतो. टीम इंडिया आपल्या मागील दोन सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती या दोन फिरकीपटूंसह उतरली आहे. पण दोघेही अयशस्वी ठरले. भारताचा पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स आणि न्यूझीलंडविरुद्ध ८ विकेट्सने पराभव झाला. अशा स्थितीत तीन फिरकीपटूंसोबत जाण्यात काहीही नुकसान नाही, असे गावसकर यांचे मत आहे.

इंडिया टुडेशी बोलताना गावसकर म्हणाले, ”तीन फिरकीपटूंसोबत जाण्यात काही नुकसान नाही. शार्दुल ठाकूर किंवा मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीपेक्षा जास्त नुकसान नाही. टीम इंडिया दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. कारण हार्दिक पंड्याने दोन षटकेही टाकली तर. त्यामुळे त्यानुसार संघात तीन वेगवान गोलंदाज असतील.”

हेही वाचा – ‘बाबर’युगाचा प्रारंभ..! विराट, रोहितला दणका देत पाकिस्तानाच्या कर्णधारानं…

”आर. अश्विन हा अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. अफगाणिस्तानमध्ये अनेक मिस्ट्री स्पिनर्स आहेत. तुम्ही मुजीबकडे बघा. असे अनेक फिरकीपटू आहेत ज्यांचा प्लेइंग इलेव्हनमध्येही समावेश नाही. त्यामुळे अशा स्थितीत वरुण चक्रवर्तीला खेळणे अफगाणिस्तानला अवघड जाणार नाही. अश्विनसारख्या अव्वल दर्जाच्या गोलंदाजाकडे मी नक्कीच बघेन. यानंतर दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून राहुल चहरचाही समावेश होऊ शकतो. जडेजा आधीच तिथे आहे”, असेही गावसकरांनी म्हटले.

भारताने आत्तापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताला अजून खाते उघडायचे आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानने तीन सामन्यात दोन विजय मिळवले आहेत.