पीटीआय, अॅडलेड : जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीपासून केवळ दोन पावले दूर असलेल्या भारतीय संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात तुल्यबळ इंग्लंडचा अडथळा पार करावा लागणार आहे. ‘आयसीसी’च्या गेल्या काही स्पर्धामध्ये भारतीय संघ बाद फेरीच्या सामन्यांत अडखळताना दिसला आहे. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ हा इतिहास बदलेल अशी भारतीय चाहत्यांना आशा आहे. तसेच पाकिस्तानच्या संघाने अंतिम फेरी गाठल्याने भारताला विजय मिळवण्याची अधिक प्रेरणा मिळाली असेल.
यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील ‘अव्वल १२’ फेरीत इंग्लंडच्या तुलनेत भारताने सरस कामगिरी केली. मात्र, बाद फेरीच्या सामन्याचे दडपण हे पूर्णपणे वेगळे असते. त्यातच भारत आणि इंग्लंड या जागतिक क्रिकेटमधील बलाढय़ संघांमध्ये एकहाती सामने जिंकवून देणाऱ्या खेळाडूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे दडपणाखाली, मोक्याच्या क्षणी जे खेळाडू आणि जो संघ सर्वोत्तम कामगिरी करेल, त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असेल.
इंग्लंडने मायदेशात झालेला २०१९चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्या संघातील बरेचसे खेळाडू सध्याच्या इंग्लंड संघाचा भाग आहेत. हा अनुभव त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. दुसरीकडे, भारतीय संघाला गेल्या काही वर्षांत ‘आयसीसी’च्या स्पर्धातील बाद फेरीत सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. २०१४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना, २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा सामना, २०१७च्या चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना, तसेच २०१५ आणि २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना, हे बाद फेरीचे सर्व सामने भारतीय संघाने गमावले. मात्र, यंदा ‘अव्वल १२’ फेरीतील चांगल्या कामगिरीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून अंतिम फेरीत प्रवेशाचे त्यांचे ध्येय असेल.
कोहली, सूर्यकुमारवर भिस्त
यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील ‘अव्वल १२’ फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाजांमध्ये भारताचा विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे अव्वल दोन स्थानांवर होते. एकीकडे कोहलीने संयम आणि आक्रमकता यांच्यात उत्तम समतोल साधताना पाच सामन्यांत तीन अर्धशतके साकारली. दुसरीकडे सूर्यकुमारने आपल्या कलात्मक आणि वैविध्यपूर्ण फटक्यांनी सर्वाना थक्क करून सोडले. भारताला कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीची चिंता आहे. नेदरलँड्सविरुद्धचे अर्धशतक वगळता रोहितला धावांसाठी झगडावे लागले आहे. केएल राहुलने गेल्या दोन सामन्यांत अर्धशतके करत सूर गवसल्याची ग्वाही दिली आहे. अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी हार्दिक पंडय़ावर असेल. यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात कोणाला पसंती मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
बटलर, स्टोक्सपासून धोका
कर्णधार जोस बटलर आणि बेन स्टोक्स या इंग्लंडच्या दोन प्रमुख खेळाडूंना या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यांत आपली सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. सलामीवीर बटलरने चार सामन्यांत ११९ धावा केल्या आहेत आणि त्याला केवळ एकदाच अर्धशतकी मजल मारता आली आहे. मात्र, भारताविरुद्ध तो आपला खेळ उंचावण्यासाठी उत्सुक असेल. तसेच स्टोक्सला चार सामन्यांत केवळ ५८ धावाच करता आल्या आहेत. परंतु महत्त्वाच्या सामन्यांत निर्णायक भूमिका बजावण्यात तो सक्षम आहे. या दोघांना सलामीवीर अॅलेक्स हेल्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांची साथ लाभेल. मात्र, जायबंदी डेव्हिड मलान या सामन्याला मुकण्याची शक्यता असल्याने फिल सॉल्टला संधी मिळू शकेल.
अश्विनची भूमिका महत्त्वाची
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. हा सामना यापूर्वीच्या दोन सामन्यांदरम्यान वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर होणार आहे. त्यामुळे फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. भारताने ‘अव्वल १२’ फेरीत ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा अक्षर पटेल या दोन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता उपांत्य फेरीतही हेच दोघे खेळल्यास त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. तसेच अक्षरच्या जागी यजुर्वेद्र चहलला खेळवण्याचाही भारत विचार करू शकेल. मात्र, त्यामुळे फलंदाजीची बाजू काहीशी कमकुवत होईल. वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग सांभाळणे अपेक्षित आहे.
करन, रशीदकडून अपेक्षा
वेगवान गोलंदाज सॅम करन (चार सामन्यांत १० बळी) आणि मार्क वूड (चार सामन्यांत ९ बळी) यांनी इंग्लंडकडून या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विशेषत: डावखुऱ्या करनला अखेरच्या षटकांतही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखण्यात यश आले आहे. त्याच्याकडून इंग्लंडला पुन्हा दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. वूडच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह आहेत. अॅडलेडच्या फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर लेग-स्पिनर आदिल रशीद आणि ऑफ-स्पिनर मोईन अली यांचे योगदान इंग्लंडसाठी निर्णायक ठरू शकेल. रशीदला या स्पर्धेत केवळ एक बळी मिळवता आला असून मोईनची बळींची पाटी कोरी आहे.
संघ
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक हुडा.
- इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, टायमल मिल्स, मार्क वूड.
एका सामन्यावरून गुणवत्ता ठरवणे अयोग्य -रोहित
अॅडलेड : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान दुसरा उपांत्य सामना होणार आहे. भारतीय संघासमोर प्रमुख फलंदाजांच्या कामगिरीतील सातत्याच्या अभावाचा प्रश्न आहे. मात्र, उपांत्य सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघातील सर्व खेळाडूंवर विश्वास दर्शवला. बाद फेरीचे सामने आव्हानात्मक असतात. या एका सामन्यातील अपयशाने खेळाडूंची गुणवत्ता ठरत नसते. एक खेळी कधीच गुणवत्तेची मोजपट्टी असू शकत नाही, असे रोखठोक मत रोहितने मांडले.
‘आयसीसी’च्या बाद फेरीतील सामन्यांत रोहितला फारशी चमक दाखवता आलेली नाही. २०१४ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत २९ धावा, २०१५च्या एकदिवसीय सामन्याच्या उपांत्य फेरीत ३४ धावा, २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत ४३ धावा रोहितने केल्या होत्या. ‘‘बाद फेरीतील एखाद्या अपयशाने फलंदाजाची गुणवत्ता ठरत नसते. मीच काय प्रत्येक खेळाडू या प्रवाहातून जात असतो,’’ असे रोहित म्हणाला.
- स्थळ : अॅडलेड ओव्हल
- वेळ : दु. १.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)