भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषकाच्या लढतीपूर्वी, अनुभवी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरला आधीच इशारा दिला आहे. भारत आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामना जिंकणार आहे, असे हरभजनने म्हटले.

स्टार स्पोर्ट्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हरभजन म्हणाला, “मी शोएब अख्तरला सांगितले, पाकिस्तान का खेळतोय? तुम्ही आम्हाला वॉकओव्हर द्या, तुम्ही खेळाल, तुम्ही पुन्हा पराभूत व्हाल, तुम्ही अस्वस्थ व्हाल. आमची टीम खूप मजबूत आहे आणि आम्ही तुम्हाला सहज पराभूत करू.”

हेही वाचा – T20 World Cup : भारताविरुद्धच्या सामन्याला ९ दिवस उरले असताना पाकिस्तानला बसला ‘मोठा’ धक्का!

एकदिवसीय किंवा टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला एकदाही पराभूत केले नाही. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम ७-० आणि टी-२० मध्ये ५-० असा आहे. आगामी वर्ल्डकपमध्ये २४ ऑक्टोबरला दोन्ही संघ आमनेसामने असतील.

२००७ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासह दोन्ही संघांमध्ये अनेक संस्मरणीय टी-२० सामने खेळले गेले. २००७मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्डकप सुरू होत आहे.