टीम इंडियात यष्टीरक्षण कोणी करायचं हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, महेंद्रसिंह धोनीला संधी मिळाली नाही. निवड समितीने युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतवर विश्वास ठेवत त्याला संधी दिली. मात्र काही ठराविक अपवाद वगळता ऋषभ पंत प्रत्येक सामन्यात अपयशी ठरत आला आहे. नवीन वर्षात भारतीय संघाने प्रयोग करत लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची संधी दिली. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनीही गेल्या काही दिवसांत, पंतला अजुन मेहनतीची गरज असल्याचं विधान करत बदलाचे संकेत दिले. न्यूझीलंड दौऱ्यातही लोकेश राहुल भारतीय संघाचं यष्टीरक्षण करतोय. मात्र या परिस्थितीसाठी ऋषभ पंत कोणालाही दोष देऊ शकणार नाही, असं मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे.
“ऋषभ पंत गुणवान खेळाडू आहे. पण आता तो कोणालाही दोष देऊ शकणार नाही. त्याला त्याच्या कारकिर्दीचा निट विचार करावा लागणार आहे. आता फक्त आपला खेळ सुधारुन धावा करायच्या आणि टिकाकारांना खोटं ठरवायचं हा एकमेव पर्याय त्याच्याकडे उरला आहे. तुमच्यामध्ये जर क्षमता असेल तर इतरांना चुकीचं सिद्ध करणं ही तुमची जबाबदारी असते.” Firstpost संकेतस्थळाशी कपिल देव बोलत होते.
ऋषभ पंतची फलंदाजी आणि यष्टींमागची खराब कामगिरी हा गेल्या काही महिन्यांमधला चर्चेचा विषय ठरत आहे. ऋषभची खराब कामगिरी पाहता भारताने कसोटी क्रिकेटमध्ये पंतऐवजी वृद्धीमान साहाला पसंती दिली. त्यामुळे आगामी काळात ऋषभ पंत आपल्या खेळात कधी सुधारणा करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.