विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी खेळणारे पहिले दोन संघ निश्चित झाले आहेत. जयपूर येथे झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत हिमाचल प्रदेशने उत्तर प्रदेशचा पराभव केला. त्याचवेळी दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकचा पराभव करत तामिळनाडूने उपांत्य फेरीचे तिकीट पटकावले. तामिळनाडूच्या विजयाचा हिरो ठरला शाहरुख खान. त्याने कर्नाटकविरुद्ध ३९ चेंडूत ७९ धावा केल्या. शाहरुखने या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचे स्पर्धेतील हे दुसरे अर्धशतक आहे.

या सामन्यात कर्नाटकचा कर्णधार मनीष पांडेने नाणेफेक जिंकून आपले गोलंदाज थंड वातावरणाचा फायदा घेतील या विचाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्नाटकच्या कर्णधाराची विचारसरणी तामिळनाडूच्या फलंदाजांनी बिघडवली. २४ धावांच्या स्कोअरवर तामिळनाडूची पहिली विकेट पडली असली तरी, यानंतर त्यांच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली.

हेही वाचा – शास्त्री यांच्या विधानामुळे दुखावलो -अश्विन

सुरुवात नारायण जगदीशनने केली. त्याने १०२ धावा केल्या. यानंतर खेळण्यासाठी आलेल्या सर्व फलंदाजांनी कर्नाटकच्या गोलंदाजांची लाईन लेंथ खराब केली. आर साई किशोरने ६१, दिनेश कार्तिकने ४४ आणि बाबा इंद्रजीतने ३१ धावा केल्या. ४१व्या षटकात फलंदाजीसाठी उतरलेल्या शाहरुख खानचा इरादाच वेगळा होता. त्याने सुरुवातीला १४ चेंडूत १७ धावा केल्या. मात्र शेवटच्या ४ षटकांत झटपट धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे तामिळनाडूने कर्नाटकसमोर ३५४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्युत्तरात कर्नाटकचा संपूर्ण संघ ३९ षटकांत २०३ धावांत गारद झाला आणि तामिळनाडूने १५१ धावांनी विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तामिळनाडूकडून वॉशिंग्टन सुंदरने ३ आणि रघुपती सिलामबरासनने ४ बळी घेतले. याआधी शाहरुख खानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये कर्नाटकविरुद्ध मॅचविनिंग इनिंग खेळली होती. विजेतेपदाच्या लढतीत शेवटच्या चेंडूवर षटकार मारून त्याने तामिळनाडूला देशांतर्गत टी-२० क्रिकेट स्पर्धेचे चॅम्पियन बनवले.