Chennai Coromandel Express Accident : ओडिशात झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातावरून अवघ्या जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, हजाराहून अधिक प्रवासी जखमी आहे. या अपघातात मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ट्रेनमध्ये झोपेत असलेल्या प्रवाशांवर काळाने घातल्याने क्षणार्धात अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबांना आता हलाखीचे दिवस कंठावे लागतील. परंतु, त्यांच्या मुलांना अधिक त्रास सहन करावा लागू नये याकरता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा >> अपघाताची सीबीआय चौकशी; रेल्वे मंडळाची शिफारस, सुरक्षा यंत्रणेत फेरफार केल्याचा संशय  

ओडिशातील तीन ट्रेन एकमेकांना धडकल्याचा एक फोटो ट्वीट करत विरेंद्र सेहवाग म्हणतो की, “हा फोटो आपल्याला दीर्घकाळ त्रास देईल. या दु:खाच्या प्रसंगी, या दुःखद अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणं एवढंच मी करू शकतो. मी अशा मुलांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डिंग सुविधेत मोफत शिक्षण देईन.”

वीरेंद्र सेहवाग पीडित कुटुंबातील मुलांना त्याच्या शाळेतून मोफत शिक्षण देणार आहे. तसेच बचाव कार्यात आघाडीवर राहिलेल्या सर्व शूर स्त्री-पुरुषांना आणि स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या वैद्यकीय पथकाला आणि स्वयंसेवकांना सलाम. यामध्ये आम्ही एकत्र आहोत, असंही सेहवाग म्हणाला.

हेही वाचा >> Odisha Train Accident: रेल्वे अपघातग्रस्तांचे खरे देवदूत; मदतकार्याच्या अविश्वसनीय कथा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओडिशात नेमकं काय घडलं?

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ओडिशा येथे भीषण अपघात झाला. सिग्नल यंत्रणेतील त्रुटीमुळे दोन रेल्वे एकाच रुळांवर आल्याने मोठा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धकल्याने दोन्ही गाड्यांचे डबे रुळांवरून घसरले. दरम्यान, डाऊन मार्गाने धावणाऱ्या हावडा एक्स्प्रेसला या अपघाताचा धक्का बसल्याने ही एक्स्प्रेसचे डबेही रुळांवरून घसरले. परिणामी तीन रेल्वेंची धकड होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून हजारहून अधिक प्रवासी जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. यामध्ये मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाल्याने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशातील दानशूर पुढे येत पीडित कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.