ICC Women’s World Cup 2025 Semi Final: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. २९ आणि ३० ऑक्टोबरला सेमीफायनलचे सामने खेळवले जातील. पहिला सेमीफायनल सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाईल. तर दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. पण दुसऱ्या सेमीफायनलवर पावसाचं सावट आहे, त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार, जाणून घेऊया.

विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावरील २६ ऑक्टोबरला झालेला भारत आणि बांगलादेश यांच्यातील गट फेरीतील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता गट टप्प्यातील सामना रद्द झाल्यानंतर जर उपांत्य फेरीतही पाऊस पडला तर काय होईल, जाणून घेऊया.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना ३० ऑक्टोबरला नवी मुंबईतील डी वाय स्टेडियममध्ये खेळवला जाईल. त्या दिवशी नवी मुंबईतील हवामान पाहिलं तर २० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे जर ३० ऑक्टोबरला सामना पूर्ण होऊन निकाल लागू शकला नाही, तर हा उपांत्य सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.

विश्वचषक २०२५च्या उपांत्य फेरीतील दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर ३० ऑक्टोबरला पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. पण जर राखीव दिवशीही सामन्याचा निकाल लागला नाही गुणतालिकेत सर्वाधिक गुण मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल आणि जर अशी परिस्थिती उद्भवली तर भारतासाठी हा मोठा धक्का असेल.

ऑस्ट्रेलिया हा महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेतील अपराजित संघ आहे, त्यांनी गट टप्प्यात एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने गट टप्प्यात सात सामने खेळले, त्यापैकी सहा सामने जिंकले, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. तर भारतीय संघाने ७ पैकी ३ सामने जिंकले आणि तीन सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला.