भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी टी-२० विश्वचषक सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध ८ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक होते. अशा स्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने स्कॉटिश फलंदाजांना खेळपट्टीवर पाय ठेवू दिला नाही. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांत गारद झाला. यानंतर केएल राहुल आणि रोहित शर्माच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने ६.३ षटकांत ८ गडी राखून विजयी लक्ष्य गाठले. विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली. त्याने सामन्याबाबत आणि बर्थडे सेलिब्रेशनबाबतही मत दिले. आज विराटचा ३३ वा वाढदिवस आहे. सामन्यानंतर तो म्हणाला, ''ही कामगिरी अतिशय नेत्रदीपक होती. अशा कामगिरीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आजच्या सामन्याबद्दल मला फार काही बोलायला आवडणार नाही. कारण आपण कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळू शकतो, याची मला चांगली जाणीव आहे.'' नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना विराट म्हणाला, “छोट्या छोट्या गोष्टीही खूप महत्त्वाच्या असतात. पण चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला आमची लय सापडली आहे.'' टीम इंडियाच्या योजनेबाबत विराट म्हणाला, “आम्ही त्यांना १०० ते १२० धावांच्या दरम्यान रोखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलो जेणेकरून इतर संघांना पराभूत करण्याची संधी मिळेल. आम्ही ८ ते १० षटकांत लक्ष्याचा पाठलाग करण्याबाबत चर्चा केली. सहा किंवा साडेसात षटकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मैदानात उतरू शकत नाही. अशा परिस्थितीत तुमच्यावर अधिक दबाव असतो.'' हेही वाचा - T20 WC : केएल राहुलची बॅटिंग पाहून गर्लफ्रेंड अथिया घायाळ..! तुफानी अर्धशतकामुळं मिळालं ‘बर्थडे गिफ्ट’ विराट पुढे म्हणाला, ''जर तुम्ही आमचे सराव सामनेही बघितले तर आमचे खेळाडू अशी फलंदाजी करत होते. या प्रकारच्या क्रिकेटमध्ये दोन षटके सामन्याचा मार्ग बदलतात. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे याचा मला आनंद आहे.'' विजयानंतर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबाबत विराट म्हणाला, ''माझे आता वय झाले आहे. माझी पत्नी अनुष्का आणि मुलगी एकत्र आहेत. हेच सेलिब्रेशन खूप आहे. बायो-बबलमध्ये कुटुंबासोबत राहणे हा एक आशीर्वाद आहे.''