Why England Penalised For 5 Runs in IND vs ENG 1st Test: भारत पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतरही चांगल्या स्थितीतही आहे. भारताचा पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी ९१ धावांची भागीदारी रचत संघाला चांगली सुरूवात करून दिली. भारताने तिसऱ्या सेशनमध्ये २५० धावांचा टप्पा गाठला असून फक्त ३ विकेट गमावले आहेत. पण दुसऱ्या सेशनमध्ये इंग्लंडला ५ धावांची पेनल्टी बसली, यामागे नेमकं काय कारण आहे, जाणून घेऊया.
लीड्सच्या मैदानावरील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला अतिरिक्त ५ धावा देण्यात आल्या. जो रूटला तर विश्वासच बसत नव्हता की नेमकं काय झालं, तर बेन स्टोक्सही वैतागला होता. पण कोणत्या कारणामुळे भारताला अतिरिक्त ५ धावा मिळाल्या, जाणून घेऊया.
५१व्या षटकात ही घटना घडली. स्टोक्सने या षटकातील पाचवा चेंडू टाकला. जैस्वालने चेंडू खेळला आणि तो दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या हॅरी ब्रुकजवळ गेला. हॅरीने चेंडू लगेच यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला. चेंडू विकेटकिपरच्या डाव्या दिशेने थ्रो केला आणि तो चेंडू पकडू न शकल्याने मैदानावर ठेवलेल्या हेल्मेटवर जाऊन हा चेंडू आदळला आणि त्यामुळे इंग्लंडला ५ धावांचा दंड ठोठावला गेला. चेंडू हेल्मेटला लागताच, ब्रूकच्या चुकीमुळे भारताला पाच पेनल्टी धावा मिळाल्यावर रूट डोक्यावर हात ठेवून मैदानात बसला होता.
५ पेनल्टी धावा मिळण्याबाबत आयसीसीचा नियम काय सांगतो?
जेव्हा क्षेत्ररक्षक त्यांचं हेल्मेट घालत नाहीत, तेव्हा ते त्यांना फक्त विकेटकीपरच्या मागे आणि अगदी स्टंपच्या बरोबरीने जमिनीवर ठेवू शकतात. ते मैदानावर इतरत्र कुठेही ठेवू शकत नाहीत. नियमानुसार जर एखादा लीगल चेंडू कायदेशीररित्या ठेवलेल्या हेल्मेटला लागला तर तो डेड बॉल होतो. तर फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ पेनल्टी धावा देखील दिल्या जातील. जर तो नो बॉल किंवा वाईड असेल तर पंच नेहमीप्रमाणे सिग्नल देतील.
जैस्वालने शानदार शतक झळकावले आणि गिलने अर्धशतकी खेळी करत जैस्वालला साथ दिली. यासह भारताने टीब्रेकपर्यं २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली होती. जैस्वाल १०१ धावा करत बाद झाला. तर त्यापूर्वी राहुल ४२ धावा करत बाद झाला. तर पदार्पणवीर साई सुदर्शन खातंही उघडू शकला नाही.