एक्स्प्रेस वृत्त
मुंबई : भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) सर्व स्पर्धांपासून तूर्तास दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुरुषांची आशिया चषक स्पर्धा आणि महिलांची उदयोन्मुख संघांची आशिया चषक स्पर्धेचाही समावेश आहे.महिलांची स्पर्धा पुढील महिन्यात श्रीलंकेत, तर पुरुष संघांतील आशिया चषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये नियोजित आहे. ‘एसीसी’चे अध्यक्षपद सध्या पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी सांभाळत आहेत. नक्वीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचेही (पीसीबी) प्रमुख आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची कोंडी करण्याच्या दृष्टीने ‘एसीसी’च्या स्पर्धांवर बहिष्कार घालण्याचा ‘बीसीसीआय’ने निर्णय घेतल्याचे समजते.
‘‘ज्या संघटनेच्या अध्यक्षपदी पाकिस्तानी मंत्री आहे, त्या संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत भारतीय संघाने खेळणे उचित ठरणार नाही. संपूर्ण देशाची ही भावना आहे. उदयोन्मुख महिला आशिया चषक स्पर्धेत आमचा संघ खेळणार नसल्याचे आम्ही ‘एसीसी’ला कळविले आहे. तसेच नजीकच्या काळातील अन्य स्पर्धांसाठीही हा निर्णय कायम राहील. आम्ही केंद्र सरकारच्या सतत संपर्कात आहोत,’’ असे ‘बीसीसीआय’मधील सूत्राने सांगितले.
‘बीसीसीआय’च्या या भूमिकेमुळे भारतीय पुरुष संघाच्या आशिया चषकातील सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये भारतातच नियोजित असून यजमान भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या ‘एसीसी’च्या पूर्ण सदस्यांचा स्पर्धेत सहभाग आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या स्पर्धेचे आयोजन धोक्यात आले आहे.
भारताविना स्पर्धा अशक्य
आशिया चषक स्पर्धा भारताविना खेळविणे शक्य नसल्याचा ‘बीसीसीआय’ला विश्वास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठ्या स्पर्धांना लाभणारे प्रायोजक हे प्रामुख्याने भारतातूनच असतात. तसेच भारतीय चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये उपस्थित राहतात. शिवाय भारत-पाकिस्तान सामना हा कोणत्याही आंतरराष्ट्रीय आणि खंडीय क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आकर्षण असतो. त्यामुळे भारतीय संघ त्यात खेळत नसल्यास प्रसारणकर्त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार हे निश्चित असते.
गतवर्षी सोनी पिचर्स नेटवर्क्स इंडियाने (एसपीएनआय) पुढील आठ वर्षांसाठी आशिया चषकाचे प्रसारण हक्क मिळविण्याकरिता तब्बल १७ कोटी अमेरिकन डॉलर मोजले होते. त्यामुळे यंदा आशिया चषक न झाल्यास या करारातही बदल करावा लागू शकेल.
गतस्पर्धेवरही परिणाम
● भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांचा गेल्या आशिया चषक स्पर्धेवरही (२०२३) परिणाम झाला होता. त्या वेळी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते.
● भारतीय संघाला पाकिस्तानात पाठविण्यास ‘बीसीसीआय’ने नकार दिला. अखेर ‘पीसीबी’ने नमते घेतले. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) भारताचे सामने श्रीलंकेत आयोजित केले. भारतीय संघाने श्रीलंकेला नमवत जेतेपद पटकावले.
● विशेष म्हणजे, २०२३ मध्ये ‘बीसीसीआय’चे सचिव आणि ‘एसीसी’चे अध्यक्ष जय शहा होते. शहा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष आहेत.
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांनंतर त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणे योग्य ठरणार नाही. ‘आशिया चषक’ स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होत असेल, तर पाकिस्तान संघाबरोबर सामना खेळू नये. केंद्राने पाकिस्तानबरोबर सर्व संबंध तोडले आहेत. ‘बीसीसीआय’ सरकारपेक्षा मोठे नाही. – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.