महिला टी २० स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात भारतानं इंग्लंडला ९ धावांनी पराभूत केलं. या विजयासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे. भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी १४९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र इंग्लंडचा संघ १४० धावा करू शकला. या सामन्यात भारताला इंग्लंडचे तीन फलंदाज धावचीत करण्यात यश आलं. नॅट स्किवर, हिथर नाइट आणि सोफिया डंकले धावचीत होऊन तंबूत परतले. इंग्लंडकडून टॅम्सिन आणि हिथर या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. मात्र दीप्ती शर्मानं टॅम्सिनला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला आणि विजय सोपा झाला.

इंग्लंडचा डाव

इंग्लंडकडून आघाडीला फलंदाजीसाठी आलेल्या टम्सिननं चांगलीच खेळी केली. तिने ५० चेंडूत ५९ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकारांचा समावेश आहे. इंग्लंड संघाची धावसंख्या १३ असताना डॅन्नी व्याटच्या रुपाने पहिला गडी बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या ३२ असताना नॅट स्किवर धावचीत झाली. ती केवळ एक धाव करून बाद झाली. त्यानंतर संघाची धावसंख्या १०६ असताना टम्सिन पायचीत झाली. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजीला गळती लागली. एक एक करत फलंदाज तंबूत परतले. नाइट, डंकले, जोन्स, ब्रंट, विलियर्स झटपट बाद झाले.

भारताचा डाव

पहिल्या विकेटसाठी शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी चांगली खेळी केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी ७० धावांची भागिदारी केली. मात्र फ्रेया डेविजच्या गोलंदाजीवर फटका मारताना मानधनाचा झेल मॅडी विलियर्सच्या हातात गेला आणि बाद झाली. तिने १६ चेंडूत ४८ धावा केल्या. त्यानंतर संघाची धावसंख्या ७२ असताना शफाली वर्मा बाद झाली. तिचं अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. तिने ३८ चेंडूत ४८ धावा केल्या. या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मानं संघाची बाजू सावरली. मात्र संघाची धावसंख्या ११२ असताना हरमनप्रीत बाद झाली. तिने २५ चेंडूत ३१ धावा केल्या. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर रिचा घोष आली आणि अवघ्या ८ धावा करून तंबूत परतली. २० षटकांचा खेळ संपला तेव्हा दीप्ती शर्मा नाबाद २४, तर स्नेह राणा नाबाद ८ या धावसंख्येवर होते.