World Cup 2019 : नुकताच IPL चा १२ वा हंगाम संपला. मुंबईने अतिशय रोचक अशा सामन्यात चेन्नईला एका धावेने पराभूत केले आणि चौथ्यांदा स्पर्धेचे विजतेपद जिंकले. आता साऱ्या क्रिकेटप्रेमींना आतुरता आहे ती एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची… ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार असून या स्पर्धेची भारताने १५ एप्रिललाच संघ जाहीर केला आहे. या संघात अंबाती रायडू आणि ऋषभ पंत या दोन अपेक्षित नावांना वगळण्यात आले आणि त्या जागी विजय शंकर व दिनेश कार्तिक या नावांची वर्णी लागली. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर नेमका कोणता फलंदाज खेळायला येणार? याबाबतचा तिढा अजूनही तसाच असल्याचे दिसून आहे.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ”आमचा संघ लवचिक आहे. संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. सर्व खेळाडू हे उत्तम कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे टीम इंडियाकडे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी हवे तेवढे पर्याय उपलब्ध आहेत”, असे मत शास्त्री यांनी क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

१५ खेळाडूंच्या संघात सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. तुमच्या १५ खेळाडूंकडून काय अपेक्षा असतात… सहसा त्या खेळाडूंनी कधीही खेळायला आणि कामगिरी करण्यासाठी तयार असायला हवे, असे मला वाटते. उदाहरणार्थ जर एखाद्या वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली, तर त्या गोलंदाजाला थेट संघातून बाहेर करण्यात येईल. त्याला विश्रांती देण्यात येईल आणि त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला सांगत स्थान देण्यात येईल, असेही शास्त्री म्हणाले.

केदार जाधवची दुखापत आणि कुलदीप यादवचा फॉर्म याबाबत मी जास्त चिंता करत नाही. जेव्हा २२ मे रोजी आमचे विमान इंग्लंडसाठी उड्डाण करेल, तेव्हा त्या विमानात जे १५ खेळाडू असतील, त्याबाबत विचसार केला जाईल. आतापासूनच आम्ही कोणतीही योजना आखणार नाही. जेव्हा विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते, त्यावेळी आपण त्या स्पर्धेच्या लयीनुसार स्वतःला तयार करतो. मधला ४ वर्षांचा कालावधी हा याच परिस्थितीसाठी खेळाडूंना सज्ज करत असतो, असे शास्त्री यांनी नमूद केले.