Team India World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक २०२३च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. आता चाहत्यांना तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. वर्ल्ड कप २०२३च्या उपांत्य फेरीत भारताने ७० धावांनी विजय मिळवला. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. मोहम्मद शमीने ७ विकेट्स घेतल्या.

एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास –

भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी करत इतिहास रचला होता. यानंतर २००३ मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. तिथे सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने त्यांचा १२५ धावांनी पराभव केला होता. यानंतर टीम इंडियाने २०११च्या फायनलमध्ये पोहोचून जेतेपद पटकावले. आता ती पुन्हा चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. हा सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. त्यासाठी टीम इंडिया अहमदाबादमध्ये पोहचली आहे.

१९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला

भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावा केल्या होत्या. या सामन्यात श्रीकांतने सर्वाधिक ५७ चेंडूत ३८ धावा केल्या होत्या. त्याने ७ चौकार आणि एक षटकार मारला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ १४० धावा करून सर्वबाद झाला. भारताकडून मोहिंदर अमरनाथ आणि मदन लाल यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. बलविंदर संधूने २ आणि कपिल देवने एक विकेट घेतली होती.

२००३च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला

२०२३च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया २३४ धावांवर सर्वबाद झाली होती. भारताला १२५ धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात रिकी पाँटिंगने १४० धावांची शानदार खेळी केली होती. भारताकडून वीरेंद्र सेहवागने सर्वाधिक ८२ धावा केल्या होत्या.

हेही वाचा: IND vs NZ: न्यूझीलंडवरील विजयानंतर रोहित शर्माचे संघातील खेळाडूंबाबत सूचक विधान; म्हणाला, “टीम इंडिया क्षेत्ररक्षणात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०११च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव झाला होता

२०११मध्ये भारताने दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ६ गडी गमावून २७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४ विकेट्स गमावून सामना जिंकला. भारताकडून गौतम गंभीरने ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. महेंद्रसिंग धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या. झहीर खान आणि युवराज सिंगने २-२ विकेट्स घेतल्या आणि हरभजन सिंगला एक विकेट मिळाली होती.