पावसाळा हा लहान-थोरांच्या आवडीचा ऋतू. या दिवसामध्ये सर्वत्र हिरवळ दाटलेली असते. त्यासोबतच हवेमध्येदेखील गारवा आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे अनेकांना या दिवसांमध्ये काही शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. मात्र हे आजार किंवा या शारीरिक व्याधी होण्यापूर्वीच जर आपण आहारात योग्य पदार्थांचा समावेश केला तर पुढे होणाऱ्या संभाव्य आजार टाळता येऊ शकतात.

१.आलं-
चायनीजमध्ये करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आलं याचा हमखास वापर करण्यात येतो. खासकरुन पदार्थांची चव वाढविणारा हा पदार्थ आरोग्यासाठी तितकाच गुणकारी आहे. आल्याचा नियमित वापर केला तर पोटाचे विकार होत नाही. तसंच पोट साफ होण्यासही मदत होते. पावसाळा आला की अनेक घरांमध्ये गृहिणी चहामध्ये आलं टाकतात. यामुळे चहाला सुंदर अशी चव येते. आल्याचं सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. त्यासोबतच शरीरातील वातही निघून जातो. सर्दी खोकला साठी सुद्धा आलं उपयुक्त आहे.

२. गवती चहा –
पावसाळा म्हटलं की बाजारपेठा गवती चहाच्या वासाने दरवळून निघतात. गवती चहा सर्वसाधारण गवताप्रमाणेच दिसतो. परंतु त्याची पाने ही मोठी आणि हाताला थोडीशी चरचरीत लागतात. पावसाळ्यामध्ये गवती चहाची पानं चहात टाकून तो उकळला जातो.गवती चहाने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी की आपल्याला या दिवसांमध्ये उपयुक्त असते. गवती चहामध्ये अँटिऑक्सिडंट्सचा पण भरपूर प्रमाणात समावेश असतो. गवती चहा, आलं व दालचिनी वापरून आपल्याला गवती चहाचा काढा ही बनवता येऊ शकतो.

३.दालचिनी –
गरम मसाल्याचा पदार्थांमध्ये मानाचं स्थान असलेली दालचिनी ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सर्दी झाल्यास दालचिनीचं सेवन लाभदायक ठरतं. दालचिनी पावडर मधामध्ये एकजीव करून ते सकाळ, दुपार आणि रात्री चाटावे, सर्दीला हा रामबाण उपाय आहे. तसेच जर खोकला झाला असेल, तर दालचिनी पावडर १ चमचा व मिरपूड अर्धा चमचा घेऊन हे मिश्रण कोमट पाण्यात एकत्रित करून दिवसभातून २ वेळा प्यावे.

४. लिंबू –
लिंबाचे अनेक फायदे आहेत. विशेष करुन पावसाळ्यामध्ये आहारात लिंबाचा समावेश आवर्जुन केला पाहिजे. लिंबूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता असते. त्यामुळे या दिवसामध्ये लिंबू सरबताचे सेवन करावे, लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. त्यासोबतच त्याच्या सेवनामुळे पोटाचे कार्य सुरळीत चालते.

५. हळद –
हळद ही खूप अत्यंत गुणकारी आहे. खोकल्या झाल्यास एक कप कोमट दुधामध्ये एक चमचा हळद आणि चिमुटभर सुंठ पावडर टाकून ते प्यावे. हळद ही ही रक्त शुद्धीत करते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा नियंत्रित ठेवते.

६ लसूण –
या दिवसांत हृदयविकार/हृदय झटका येण्याची शक्यता खूप जास्त असते. हृदय विकार असलेल्या रुग्णांनी रोज ५-६ कच्या लसणाच्या पाकळ्या सॅलडमध्ये खाल्ल्या तर त्याचा चांगला फायदा होतो.

७. तुळस –
पावसाळ्यात तुळस आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवत असते. रोज ५ तुळशीचे पानं खाल्याने आपले शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. तुळशीचा काढा पावसाळ्यातील सर्दी, खोकल्यावर खुप उपयुक्त आहे.