सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा आयुष्मान भारत योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढावा, तसेच या योजनेची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी व्हावी या हेतूने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) ही आरोग्य क्षेत्रातील शिखर संस्था भारतीय आरोग्यसुरक्षा महासंघाशी (एनएटीएचईएएलटी) समन्वय साधणार आहे. या दोन्ही संघटनांच्या अधिकाऱ्यांची नुकतीच नवी दिल्लीत बैठक झाली. त्यामध्ये आरोग्य महासंघाकडे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण व राज्य सरकारांनी जर तज्ज्ञांचा सल्ला किंवा अन्य काही माहिती मागवली तर ती देण्याबाबत एक यंत्रणा विकसित करणार आहे. दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे या योजनेशी संबंधित एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. देशात आरोग्य क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात खासगी गुंतवणूक यावी तसेच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने महासंघाचे योगदान महत्त्वाचे असेल, असे आयुष्मान भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण यांनी स्पष्ट केले. आयुष्मान भारत योजनेंतर्गत जर उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर सरकारी अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी एकत्र काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यासाठी खासगी क्षेत्राचा मोठा सहभाग गरजेचा असल्याचे मत महासंघाचे अध्यक्ष दलजिंत सिंह यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने २३ सप्टेंबरला आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला सुरुवात केली. आतापर्यंत देशभरात दहा लाख रुग्णांनी या योजनेंतर्गत मोफत उपचार घेतले आहेत.