गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या टॅरिफ दरवाढीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला झाल्याचं दिसतंय. ट्रायच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2019 मध्ये बीएसएनएलने देशातील इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या तुलनेत सर्वाधिक ग्राहक मिळवले. नवीन ग्राहकांच्या बाबतीत बीएसएनएलनंतर दुसऱ्या क्रमांकावर रिलायंस जिओचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे लाँच झाल्यापासून पहिल्यांदाच जिओला 5 दशलक्षपेक्षा कमी नवे ग्राहक मिळालेत.

बीएसएनएलसोबत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 4.2 लाख नवीन ग्राहक जोडले गेले. तर याच महिन्यात जिओकडे मात्र केवळ 82 हजार 308 नवीन ग्राहक आले. दुसरीकडे व्होडाफोन-आयडियापासून सर्वाधिक ग्राहक दूर गेले. त्यानंतर भारती एअरटेल आणि एमटीएनएलला सर्वाधिक फटका बसला. रिलायंस जिओने सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय बाजारात एंट्री घेतली. तेव्हापासून जवळपास प्रत्येक महिन्यात किमान पाच दशलक्ष नवीन ग्राहक जिओकडे येत होते. पण गेल्यावर्षी झालेली टॅरिफ दरवाढ आणि IUC दरांचा फटका जिओला बसला आणि त्यांच्या ग्राहक संख्येत कमालीची घट झालीये. डिसेंबरमध्ये केवळ 82 हजार 308 नवीन ग्राहक मिळाले असतानाही जिओची टेलिकॉम मार्केटमधील सर्वाधिक हिस्सेदारी (32.14%) कायम आहे. दुसरीकडे BSNLने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 4 लाख 27 हजार 089 नवीन ग्राहक जोडले आणि पहिल्यांदाच याबाबतीत जिओवर मात केली. 10.26% इतकी बीएसएनएलची टेलिकॉम मार्केटमधील हिस्सेदारी आहे. डिसेंबर 2019 च्या सुरूवातीला आघाडीच्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केली होती. पण बीएसएनएलने आपले दर वाढवले नव्हते. त्याचाच त्यांना फायदा झाल्याचं दिसतंय.

व्होडाफोन-आयडियाचे किती ग्राहक दुरावले?
व्होडाफोन-आयडियापासून सर्वाधिक ग्राहक दुरावले. डिसेंबर 2019 मध्ये कंपनीचे 3.6 मिलियन ग्राहक दूर झाले. तर , नोव्हेंबरमध्ये कंपनीने 30 मिलियनपेक्षा अधिक ग्राहक गमावले होते. दुसरीकडे एअरटेलनेही डिसेंबरमध्ये 11 हजार ग्राहक गमावले.

कोणाची किती हिस्सेदारी? –
जिओ मार्केट शेअर : 32.14 टक्के
व्होडाफोन-आयडिया मार्केट शेअर : 28.89 टक्के
भारती एअरटेल मार्केट शेअर : 28.43 टक्के
बीएसएनएल मार्केट शेअर : 10.26 टक्के