वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे खाऊ नका ते खाऊ नका कायम सांगितले जाते. मात्र काय खाणे चांगले हे मात्र समजत नाही. त्यामुळे वाढलेले वजन कमी करणे हे लठ्ठ लोकांसमोरचे आव्हान बनते. वजन वाढण्याची अनेक कारणे असतील तरी आहार हे त्यातील एक सामान्य कारण आहे. लठ्ठपणामुळे हृदयाच्या तक्रारी, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. पण एखाद्या सोप्या उपायानेही वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. ब्रेकफास्टला काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला किंवा अचानक कोणी पाहुणे आले की पोहे हा महाराष्ट्रातील ठरलेला पदार्थ आहे. बनवायला सोपे आणि चविष्ट अशी ही पाककृती त्यामुळेच प्रसिद्ध आहे. पण वजन कमी होण्यासही पोहे उपयुक्त असतात हे आपल्यातील अनेकांना माहित नसेल. पोह्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेटस, प्रोटीन, फायबर, व्हीटॅमिन्स आणि आयर्न यामुळे पोहे खाणे हा वजन घटविण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो. हे सर्व घटक केवळ वजन कमी करण्यासाठीच उपयुक्त ठरतात असे नाही तर शरीराला आवश्यक असणारे बरेच फायदे त्यातून मिळतात. मात्र पोह्यामध्ये बटाटा घातल्यास त्यातील कॅलरी मूल्य वाढत असल्याने ते टाळावे. या पदार्थांपैकी पोह्यांविषयी जाणून घ्याचं झालं तर पोहे खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे पोहे खाण्याचे नेमके फायदे काय हे जाणून घेऊयात. १. वजन कमी होते- पोह्यांमध्ये कॅलरीजची मात्रा कमी असते. त्यामुळे पोहे खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. एक मोठी वाटी पोह्यांमध्ये केवळ २०६ कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी पोह्याचं सेवन करणं फायदेशीर आहे. २. पोषकघटकांचा समावेश- सुपरफूड म्हणूनदेखील पोह्यांकडे पाहिलं जातं. एक मोठी वाटी पोह्यांमध्ये ७५ टक्के कार्बोहायड्रेट, ८ टक्के प्रोटिन, आर्यनस पोटॅशियम, व्हिटामिन ए,सी आणि डी यांचं पुरेपूर प्रमाण असतं.. पोह्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळण्यास मदत होते. पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहायड्रेट आणि २३ टक्के चरबीयुक्त पदार्थ असतात. त्यामुळे तुम्ही ब्रेकफास्टला पोहे खात असाल तर तुमचे वजन कमी होण्यास त्याचा उपयोग होतो आणि तुमच्या शरीरावर अनावश्यक चरबी वाढत नाही. ३. शारीरिक उर्जा वाढते – दिवसभर काम केल्यामुळे प्रचंड शारीरिक थकवा जाणवतो. परंतु सकाळी नाश्त्याला पोहे खालल्यास दिवसभरात येणारा ताण कमी होते. पोहे खाल्ल्यामुळे शरीरातील काम करण्याची ऊर्जा वाढते. त्यामुळे पोह्यांसोबत सोयाबीन, सुकामेवा, अंडी हे पदार्थ खावेत. ४. भूकेवर नियंत्रण – पोहे पचायला हलके असल्यामुळे पोट पटकन भरतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. ५. पचनक्रिया सुधारते खाल्लेल्या अन्नाचे पचन होणे आवश्यक असते. पोहे हे सहज पचतात आणि पचनशक्ती वाढविण्यासही मदत करतात. खाल्लेल्या अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन झाल्यास वजन आटोक्यात राहण्यास मदत होते ६. रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत फायबर आणि आयर्न या घटकांमुळे रक्तातील साखर वाढण्यास अटकाव होतो. तसेच शरीरातील साखरेची पातळी वाढण्यावरही या घटकांमुळे नियंत्रण येते. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.