मोबाईल हरवणे म्हणजे हल्ली अनेकांना अपंग झाल्यासारखे वाटते. कधी प्रवासात किंवा इतर कुठे हा मोबाईल चोरीला जातो तर कधी आपणच तो कुठेतरी विसरतो. एकतर आपला सगळा डेटा गेल्यामुळे आणि महागाचा मोबाईल गहाळ झाल्यामुळे आपल्याला सुरुवातीला धक्का बसलेला असतो. मग पोलिसांकडे तक्रार करणे आणि मोबाईल सापडविण्याचा प्रयत्न कऱणे असे उपाय केले जातात. मग तेही यशस्वी न झाल्यास आपण शोधाशोधी करण्याचा नाद सोडून देतो आणि नवीन मोबाईल घेण्याचा विचार करतो. पण मोबाईल शोधण्यासाठी नेमकी काहीतरी यंत्रणा असायला हवी यावर मागच्या काही काळापासून विचार सुरु होता. हाच आता प्रत्यक्षात आला असून आता एका डायलवर तुमचा हरवलेला मोबाईल तुम्हाला मिळू शकणार आहे. भारत सरकारकडून एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यामार्फत हरवलेला मोबाईल मिळण्याबरोबरच त्या फोनचा वापर करुन कोणी गैरफायदा घेऊ नये याची खात्री करणे सोपे होणार आहे. सरकारकडून एक सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टर तयार करण्यात आलं आहे. त्यानुसार, हरवेलेल्या फोनचा आयएमईआय नंबर आणि मोबाईलशी निगडीत सर्व माहिती मिळू शकेल. तक्रारीनंतर हा फोन कोणत्याही नेटवर्कवर काम करणार नाही. मात्र पोलीस विशिष्ट यंत्रणेद्वारे फोनच्या लोकेशनपर्यंत पोहचू शकतील. दूरसंचार विभागाकडून येत्या काही दिवसांत ही सुविधा सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सुविधा महाराष्ट्र सर्कलमध्ये लागू करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण देशभरात ही सुविधा लागू केली जाईल. त्यामुळे, तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर तुम्हाला केवळ 14422 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. हा हेल्पलाईन क्रमांक सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे. या क्रमांकावर तुम्ही तुमची तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला सतत पोलीस स्टेशनमध्ये जावे लागणार नाही. सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टरमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, सीम क्रमांक तसंच आयएमईआय क्रमांकाची नोंद असेल. हे रजिस्टर सर्व राज्यांतील पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.