भारतीय जेष्ठ निसर्ग चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जलरंग चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी प्रेस क्लब मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांचे नातू केदार कामात यांनी याबाबतची माहिती दिली. हे प्रदर्शन 11 जून ते 17 जून 2019 रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 11 जूनला सायंकाळी ५:३० वाजता प्रख्यात व्यंग-चित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी "धवल रेषा" या गौरव ग्रंथाचे उदघाटनही राज यांच्या हस्ते केले जाईल. या पुस्तकात राज ठाकरे यांनी धोंड सरांचे अर्कचित्र काढून वेगळ्या पद्धतीने त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. तसेच या मध्ये धोंड सरांच्या विद्यार्थ्यांनी तसेच दिग्गज मान्यवरांनी अनेक आठवणी रुपी लेख लिहून, त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्याद्वारे धोंड सरांवरील प्रेम व्यक्त केले आहे. प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांचे नातू केदार कामत यावेळी म्हणाले, त्यांनी त्यांच्या आयुष्याची जवळपास ७० वर्षे या कलेसाठी दिली, वयाच्या ९२ वर्षापर्यंत ते जोमाने काम करत होते, व शेवटपर्यंत त्यांनी या कलेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. निसर्ग चित्रातील धवल रेषा काढण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. लुप्त होणारी ही जलरंग चित्रांची अप्रतिम कला पुन्हा एकदा जिवंत व्हावी, यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न असून त्यांच्या या चित्रांचा ठेवा आजच्या पिढीसाठी मार्गदर्शनपर राहील व त्यांच्या चाहत्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, की यासाठी त्यांच्या चाहत्यांची साथ आणि सरकारच्या मदतीचा हात आम्हाला मिळाला तर आम्ही त्यांच्या १११ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. ख्यातनाम चित्रकार प्रा. प्रभाकर कोलते प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले, यांच्यासारखे सर आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच होते, त्यांच्यासारखे सर आजच्या काळात मिळणे शक्य नाही. त्यांच्या बरोबर आमचे नाते केवळ सर आणि विद्यार्थ्यांचे नसून मैत्रीचे होते. सरांचा काळ हा लैंडस्केप आणि पोट्रेटचा होता, चित्र काढण्यासाठी कलर कोणते व कसे वापरायचे, कोणते कलर कसे एकत्र करायचे, कुठून सुरुवात करायची कुठे थांबायचे यात त्यांचा हातखंडा होता. तसेच ते म्हणाले आजच्या पिढीने चित्रकलेकडे व्यवसाय म्हणून न पाहता आवड या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. माझे चित्र काय आहे आणि मला काय पाहिजे यासाठी अंतर मनाचा शोध घेता आला पाहिजे. चित्रकला ही शिकवता येत नाही ती पाहून शिकता आली पाहिजे. प्रत्येक वेळी वेगळेपणा चित्रातून दिसला पाहिजे. आज जगात काय चालले आहे याचे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे यासाठी अफाट वाचन करायला पाहिजे असे ही ते म्हणाले. प्रा. प्रल्हाद अनंत धोंड सरांच्या चित्रकला प्रदर्शनामुळे आजच्या पिढीला त्यांचे चित्र पाहता येणार आहेत व त्यांची चित्र पाहताना आपल्या चित्रामध्ये काय फरक आहे आणि काय साम्य आहे हे पाहिले पाहिजे व त्यातून त्यांना पुढे जाण्याची वाट अवगत होईल असे ते म्हणाले. ११ नोव्हेंबर १९०८ रोजी प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांनी १९३४ साली कला पदविका प्राप्त केली व १९३७ साली झालेल्या आर्ट मास्टर परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर त्यांनी मुंबईतील सर जे जे स्कूल ऑफ आर्टसचे डीन व महाराष्ट्र राज्य सरकारचे कला संचालक म्हणून काम पाहिले.