देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमती कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात देशातील आठ शहरांमध्ये रहिवासी मालमत्तेच्या किंमतीत १ ते ९ टक्क्यांची घट झालीये. नाईट फ्रँक इंडियाच्या (Knight Frank India) एका अहवालातून ही माहिती समोर आलीये.

अहमदाबाद सर्वात स्वस्त तर मुंबई सर्वात महाग:

रिपोर्टनुसार, ग्राहकांकडून मागणी कमी झाल्यामुळे रहिवासी घरांच्या किंमतीत मोठी घट झालीये. देशात अहमदाबाद घर खरेदीसाठी सर्वात स्वस्त मार्केट बनले आहे. तर मुंबई सगळ्यात महागडे मार्केट ठरले आहे. अहमदाबादशिवाय चेन्नई आणि पुणे मुंबईच्या तुलनेने स्वस्त आहेत. दरम्यान, घरांच्या किंमतीमधील घसरण आणि गृह कर्जावरील व्याजदराने दोन दशकांतील गाठलेला नीचांक यामुळे देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये घर खरेदी करणे सोपे झाल्याचे नाईट फ्रँक इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

मुंबई-पुण्यात विक्री वाढली :

मुंबईत रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवरील नफ्याचे गुणोत्तर जवळपास 61 टक्के आहे. त्यामुळे साहजिकच येथील जागांचे दरही चढे आहेत. तुलनेत अहमदाबाद, पुणे, चेन्नईमध्ये स्वस्तात गुंतवणूक करता येते. मात्र, गेल्या दशकाच्या तुलनेत या दशकात मुंबईतील जागांचे दर घटल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्कातील तीन टक्के सवलत आणि बहुतांश विकासकांनी उरलेल्या दोन टक्क्यांचा भार उचलल्यामुळे 2020 च्या अखेरच्या चार महिन्यांमध्ये मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत मोठी वाढ झालीये.