भाद्रपद महिना म्हंटल की आठवतो गणेशोत्सव. प्रत्येकजण या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तिची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. तसेच हा सण संपूर्ण देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जाणून घेऊयात गणपती बाप्पाच्या आगमनाची यंदाची तारीख. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार गणपतीचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांचे दुःख दूर होतेअसे मानले जाते. राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेकजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागलेले आहेत. या वर्षी गणेश चतुर्थीचा पवित्र सण शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे. ज्योतिषानुसार मध्यान्ह हा गणेश पूजेसाठी सर्वात योग्य काळ मानला जातो. गणेश चतुर्थी ही विविध नावांनी ओळखली जाते. गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे देखील संबोधले गेले आहे. काही पुराणांमध्ये ही तिथी महासिद्धिविनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा शिवा या नावांनीही उल्लेखली गेली आहे. गणेश भक्त आणि उपासकांत भाद्रपद चतुर्थी अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या गणेश पूजनाचे, नामस्मरणाचे, आराधनेचे लवकर फळ मिळते, असे सांगितले जाते. यंदा १० दिवस म्हणजे १९ सप्टेंबर २०२१ अनंत चतुर्थी पर्यंत गणशोत्सव असणार आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आलेला आहे. संपूर्ण राज्यभरात या दिवसाची गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांनपर्यंत अनेकजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागलेले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उत्सवात मोठा फरक दिसणार आहे. करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने काळजी घेत हा सण साजरा करावा.