हिवाळ्यात काय खावे याचे काही साधे निकष सांगता येतील. जे खाऊ ते ‘बृहण’ करणारे, म्हणजेच पोषण करणारे हवेत. या ऋतूत होणाऱ्या विकारांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरीत्या सहज मिळणारे व शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ हिवाळ्यात जरूर खावेत. अशा पदार्थाची काही उदाहरणे देत आहोत. गाजर : गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल. हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. ज्या लहान मुलांचे वजन कमी आहे त्यांना गाजर दुधाबरोबर शिजवून केलेला हलवा जरूर द्यावा, त्याने वजन वाढायला मदत होते. जव : जवाला ‘धान्यराज’ किंवा संस्कृतमध्ये ‘यव’ असेही संबोधले जाते. उत्तर भारतात थंडी खूप असते आणि तिथे हे धान्यही पुष्कळ प्रमाणात खातात. पण आपल्याकडे ते फारसे खाल्ले जात नाही. फार तर ‘बार्ली वॉटर’ किंवा ‘पफ बार्ली’ आपल्याला माहिती असते. जव हे बलकारी, गुरू व मधुर रसात्मक आहे. थंडीत ज्यांना सारखा सर्दी-खोकला होतो, नाक वाहते अशांना आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आहारात जवाचा समावेश करता येईल. बोरे : हिवाळ्यात बोरे मुबलक मिळतात. बोरे गुणांनी स्निग्ध, बृहण करणारी, पचायला जड (गुरू) व मधुर आहेत. हिवाळ्यात अनेकांना आव पडण्याचा किंवा आमांशाचा त्रास होतो. तो टाळण्यासाठीही बोरे चांगली. बोरे अग्निदीपन करणारी असून ती पित्त व कफ कमी करणारी व सारकदेखील आहेत. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी बोरे मदत करतात. लहान मुलांसाठी बोरे उत्तम टॉनिकसारखे काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूंचे टॉनिक असल्यासारखे घटक आहेत. लसूण : स्निग्ध गुणांचा, बृहण करणारा, उष्ण आणि मधुर गुणांचा लसूण हिवाळ्यासाठी उत्तम आहे. लसणीत कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला साठा असतो. त्वचेखालच्या लहान रक्तवाहिन्यांचे विस्तारण करून शरीराला उबदार वाटण्याचा अनुभव देणारा लसूण आहे. असा हा लसूण थंडीत विविध सूप्समध्ये वापरता येईल किंवा रोज एक लसूण पाकळी कच्चीच चावून खाल्ली तरी चालते. एक कप पाण्यात लसणीची एक पाकळी किंचित ठेचून घाला व पाणी उकळवून अर्धा कप होईपर्यंत आटवा. असा काढा गाळून दिवसात एकदाच कोमट असताना घेता येतो. अनेक स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर वारंवार मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होतो. अशा तक्रारींमध्ये जंतुघ्न असलेला लसूण आहारात ठेवल्यास फायदा होऊ शकतो. आणखी वाचा- शरीरात उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ हिवाळ्यात जरूर खावेत – मांसाहर करणाऱ्यांनी कोळंबी, ऑयस्टर, चिकन या पदार्थांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमध्ये झिंक हे मूलद्रव्य असतं. रोगकारक विषाणू-जीवाणूंवर हल्ला चढविण्यासाठी आपल्या पांढऱ्या पेशींना हे मूलद्रव्य पुरेशा प्रमाणात मिळणं आवश्यक आहे. – या शिवाय मशरूम, तृणधान्य, ओट्स, मोड आलेल्या कडधान्याचाही समावेश करावा. तावरी, कांद्याची पात, लसूण, रताळे, कोबी, सफरचंद आणि हिरव्या पालेभाज्या आवर्जून खा. – उन्हाळ्यामध्ये भरपूर घाम येऊन तहान लागत असल्याने आपण भरपूर पाणी पितोपण हिवाळ्यामध्ये हवेतील बाष्प कमी झाल्याने आणि थंड वातावरणामुळे घाम येत नाही. थेट तुमच्या त्वचेतून पाणी शोषले जाते, त्यामुळे तुम्हाला घाम येत नसला तरीही तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्यप्रमाणात राखणे महत्त्वाचे असते. म्हणूच या काळात भरपूर पाणी आणि भाज्यांचे सूप प्या.