करोना व्हायरसमुळे रेल्वे मंत्रालयाने 31 मार्चपर्यंत देशातील सर्व ट्रेन रद्द केल्यात. दिल्ली, कोलकात्यातील मेट्रो आणि मुंबईची लोकलही बंद करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन रद्द केल्याने रेल्वे तिकीट घरांवर तिकीटाच्या परताव्यासाठी गर्दी जमण्याची शक्यता ओळखून रेल्वे मंत्रालयाने तिकीट रद्द करण्याचे आणि परताव्याचे नियम सोपे केले आहेत.
भारतीय रेल्वेने ज्या प्रवाशांनी 21 मार्च ते 21 जून या दरम्यान प्रवासासाठी तिकीट आरक्षित केले होते अशा प्रवाशांच्या तिकीट परतावाच्या नियमांमध्ये बदल केलेत. ट्रेनचं तिकीट रद्द करण्यासाठी त्या प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर यावं लागणार नाही, ते ऑनलाइन पद्धतीने ई-तिकीट रद्द करु शकता, असे रेल्वेने सांगितले. याशिवाय, 21 मार्च ते 21 जून या दरम्यान ट्रेन रद्द झाल्यास प्रवासाच्या तारखेच्या तीन महिन्यांमध्ये तिकीट काउंटरवर तिकीट दाखवून परतावा मिळेल असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. सामान्यपणे ही मर्यादा केवळ 3 दिवस किंवा 72 तासांची असते. यासोबतच रेल्वेने प्रवाशांना दिलासा देताना तिकीट रद्द केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळेल, असेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, करोना व्हायरसच्या देशातील दिवसेंदिवस वाढत्या फैलावामुळे काल(दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लोकांना जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं, त्याला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पण, त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी “करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेलं लॉकडाउन अनेकजण गांभीर्याने घेत नसल्याचं दिसूत येत आहे. ही चिंतेची बाब आहे. करोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाउन गांभीर्यानं घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका”, असं आवाहन केलं आहे.