दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांचे जगणे कठीण होत आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांची दयनीय अवस्था झाली आहे. कडक उष्णतेमुळे नागरिक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. यामुळे आता स्वत:ची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: उन्हातून घरी आल्यानंतर अनेकदा शरीर गळून जाते, अंगात त्राण राहत नाही, खूप थकल्यासारखे वाटते. अशा वेळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊन उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवू शकता. तापमानाचा पारा वाढत असताना हवामान विभागानेही देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले जाते. मात्र काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडावेच लागते. पण अशा वेळी उन्हातून घरी परतल्यानंतर काही टिप्स फॉलो करून तुम्ही शरीर थंड ठेवू शकता. यासाठी दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलचे मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राजीव गुप्ता यांनी एका वेबसाइटला माहिती दिली आहे. औषध घेऊनही आजार बरा होत नाही? मग डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ चार गोष्टी लक्षात ठेवा अन्… उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स १) हायड्रेटेड रहा उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्या. तसेच कैरी पन्हे, सत्तू, ताक इत्यादी पेये तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. याशिवाय उन्हातून आल्यानंतर लगेच फ्रिजमधले थंड पाणी पिऊ नका. २) अंघोळ करा कडक उन्हामुळे अनेकांना खूप घाम येतो. घामामुळे आपल्या शरीरावर अनेक जंतूंचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत घरी आल्यानंतर अंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे फक्त शरीरच थंड होत नाही तर अनेक जंतूंपासूनही सुटका होते. पण लक्षात ठेवा, उन्हातून आल्यानंतर लगेच अंघोळ करू नका. ३) पंखा किंवा एअर कंडिशनरचा वापर करा उन्हातून घरी आल्यानंतर हात-पाय धुवून तुम्ही स्वत:ला थंड करण्यासाठी पंखा किंवा एअर कंडिशनर वापरू शकता. याचा वापर केल्याने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळेलच शिवाय तुमच्या शरीरातील थंडपणाही कायम राहील. ४) हलके आणि सैल कपडे घाला उन्हाळ्यात शरीरातील थंडावा टिकवून ठेवण्यासाठी सुती कापडे घाला. याशिवाय हलक्या रंगाचे आणि सैल कपडे तुमच्यासाठी चांगले ठरू शकतात. ५) थोडा वेळ विश्रांती घ्या, जास्त शारीरिक हालचाली करू नका उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर अनेकदा खूप थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत घरी आल्यानंतर कोणत्याही जास्त शारीरिक हालचाली करणे टाळण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितकी विश्रांती घ्या. उन्हाळ्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर घरी उपचार करणे टाळा. कारण यामुळे आजार वाढू शकतो आणि परिस्थिती आणखी बिघडू शकते. उन्हाळ्यात अतिथकव्यामुळे ताप, जुलाब, थकवा, अपचन, कावीळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय या ऋतूत शिळे अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा, जुलाब यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.