स्वास्थ्य संवाद
डॉ. राजेंद्र आगरकर – response.lokprabha@expressindia.com

पावसाळी हवेत सर्दी, फ्लू, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या विकारांच्या शक्यता वाढतातच, पण कावीळ, टायफाइड आणि लेप्टोस्पायरोसिस तर अधिक घातक असतात.

‘बंडय़ा पावसात बाहेर जायचं नाही भिजलास तर सर्दी होईल..’ पावसात भिजण्याचा आणि सर्दीचा संबंध आपल्या सगळ्यांसाठी आपल्या वयाएवढा जुना आहे. काळ बदलला तरी घरोघरी हाच संवाद ऐकू येतो. सर्दी म्हणजे नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, घसा खवखवणे, क्वचितप्रसंगी डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी वाहणे, किंचित ताप, अंगदुखी ही सर्दीची सर्वपरिचित लक्षणे आम्हाला पाठ आहेत. जगात सर्वात जास्त लोकांना हैराण करणारा आजार अशी सर्दीची ख्याती असली तरीही तिला आम्ही किरकोळ आजाराच्या रांगेतच बसवतो. सर्दीने बेजार झालेल्या बाळाला आई कसले तरी औषध चोपडते आणि दुसऱ्या दिवशी बाळ लांब श्वास घेऊन मी ठणठणीत बरा झालो अशी घोषणा करतो. ही जाहिरात बहुतेक जण फारच गांभीर्याने घेतात. सर्दीवर रामबाण अशी वल्गना करणारी शेकडो औषधे बाजारात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या उपचार पद्धतीच्या तज्ज्ञांनी सुचवलेली विविध औषधे लक्षणांची तीव्रता तात्पुरती कमी करण्यापलीकडे फारसं काही करू शकत नाही हे सर्वाना चांगलं ठाऊक आहे. तरीसुद्धा जाहिरातीला बळी पडण्याचा आमचा सोस काही संपत नाही.

सर्दी का होते? १९४१ साली शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की सर्दी झालेल्या व्यक्तीच्या नाकातून वाहणारा द्रव जिवाणूविरहित केल्यानंतरसुद्धा संसर्गजन्य आहे. १९५० ते १९६० च्या दरम्यान सर्दीला कारणीभूत अशा जवळपास १०० विषाणूंचा शोध लागला या विषाणूसमूहाला Rhinovirus म्हणतात.

सर्दीसारखीच पण तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेला (विशेषत: ताप) इन्फ्लुएंझा विषाणूमुळे होणारा आजार फ्लू नावाने ओळखला जातो. या आजाराची जरा जास्त दहशत आहे. १९१८ साली ‘स्पनिश फ्लू’ या फ्लूच्या साथीमुळे जवळपास पाच कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. आपल्या देशात काही भागात जून ते नोव्हेंबर या काळात फ्लूचा प्रादुर्भाव जाणवतो.

वैयक्तिक स्वच्छतेचे आणि सुरक्षिततेचे काही मूलभूत नियम पाळल्यास या आजारांचा प्रसार थांबवता येतो. िशकताना किंवा खोकताना विषाणू नाकातोंडातून बाहेर पडतात व हवेत पसरतात. हवेतील विषाणूंचा संसर्ग होऊन सर्दी होते. नाकातून वाहणारा द्रव किंवा शेंबूड हाताला लागल्यास त्यामुळे सुद्धा संसर्ग होऊ शकतो. अशा प्रकारे हाताला हात लागून संसर्ग होण्याची शक्यता समोरासमोर िशकल्यामुळे होणाऱ्या संसर्गापेक्षा जास्त असते.

  • शिंकताना आणि खोकताना रुमाल वापरा.
  • मुलाला सर्दी पडसं असल्यास त्याला शाळेत पाठवू नका.
  • लहान मुलांनी आणि वयस्कर मंडळींनी गर्दीच्या गजबजलेल्या भागात जाऊ नये.
  • सार्वजनिक वापराच्या वस्तू गरज नसल्यास हाताळू नये. हाताळल्यास हात साबणाने स्वच्छ धुवावे.
  • रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या सुरक्षिततेचीसुद्धा काळजी घेणे अत्यावश्यक असते. उदा. मास्क वापरणे. हात स्वच्छ धुतल्याशिवाय स्वत:च्या नाकाला, डोळ्यांना तोंडाला हात लावू नये.

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या विकारांची शक्यता वाढते कारण साचलेल्या पाण्यात डासांची पैदास प्रचंड प्रमाणात होते आणि डासांच्या माध्यमातूनच या रोगांचा प्रसार होतो. घरात आणि घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.

दूषित पाण्यामुळे होणारे दोन महत्त्वाचे आजार म्हणजे कावीळ आणि विषमज्वर ऊर्फ टायफाइड

कावीळ :

भूक न लागणे, मळमळणे, अन्नावरची आणि धूम्रपानावरची वासना जाणे, उलटय़ा होणे, अशक्तपणा, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, पोटदुखी, विशेषत: पोटाच्या उजव्या व वरच्या भागात डोकेदुखी, सर्दी-पडसं, खोकला, इत्यादी लक्षणे या आजारात सुरुवातीला दिसतात. ही सगळी लक्षणे इतर आजारांतही आढळतात त्यामुळे काविळीची शंका रुग्णाला सर्वप्रथम येते ती लघवीचा बदललेला रंग पाहून. लघवी जर्द पिवळी किंवा तपकिरी होते. काही दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात. कावीळ दिसायला लागल्यानंतर मात्र सुरुवातीच्या लक्षणांची तीव्रता कमी होते.

विषमज्वर ऊर्फ टायफाईड :

ताप हे प्रमुख लक्षण, तापाबरोबरच डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, कधी कधी हगवण विशेषत: लहान मुलांमध्ये. तर काही जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. आपल्या देशात या आजाराचे रुग्ण बारमाही असतात. टायफाईडची लस उपलब्ध आहे. प्रत्येकाने ही लस नक्की घ्यावी. का कुणास ठाऊक पण या लसीबद्दल लोक फारच उदासीन आहेत ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

लेप्टोस्पायरोसिस :

लेप्टोस्पायरोसिस हे रोगनिदान काही आपल्या नेहमीच्या ऐकण्यातले नक्कीच नाही. परंतु आज मात्र ते सर्वतोमुखी झाले आहे. ही किमया अर्थातच प्रसारमाध्यमांच्या लोकजागरण मोहिमेने केली याविषयी शंका नाही. जवळजवळ सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत या विकाराची माहिती छापून येतेच त्यामुळे अनेक बळी घेणाऱ्या या रोगाबद्दल भीतीयुक्त कुतूहल जागृत न होते तरच नवल. म्हणूनच याबद्दल जरा सविस्तर चर्चा करू या.

आपल्याकडे एखाद्या रोगाची साथ आली की त्याविषयीच्या चर्चा, वादविवाद यांचीही साथ येते आणि साथीचा रोग आटोक्यात आला की या चर्चासत्रांची लाटही ओसरते. सगळे जण आपापल्या कामाला लागतात. सुरतसारखं एखादं अपवादात्मक उदाहरण सोडल्यास बहुतेक वेळा केलेल्या चर्चा खबरदारीच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाययोजना. पुनरावृत्ती टाळण्याकरिता सोडलेले संकल्प हे सारे काही विस्मरणाच्या पडद्याआड केव्हा लुप्त होते हे कळतसुद्धा नाही. या सगळया प्रकारामुळे कायमस्वरूपी उपाययोजना होतच नाही. लेप्टोस्पायरोसिस हा प्राणिजन्य गटात मोडणारा रोग आहे.

लेप्टोस्पायरोसिसची इतर नावे :

लेप्टोस्पायरोसिस हा रोग अनेक नावांनी ओळखला जातो. उदा. वेल्स डिसिज कॅनिकोला फीवर. सेवन डेज फीवर. मड फीवर, शुगर केन फीवर, राइस फील्ड वर्कर्स फीवर, हार्वेस्ट फीवर इत्यादी. रोगाच्या या विविध नावांपकी काही नावांवरून हा रोग कुणाला होण्याची शक्यता असते याचा अंदाज येतो.

लेप्टोस्पायरोसिस या जिवाणूमुळे हा रोग होतो. या जिवाणूचे दोन मुख्य व अनेक उपप्रकार आहेत. या जिवाणूला जगण्यासाठी व वाढ होण्यासाठी विशिष्ट वातावरणाची गरज असली तरी साचलेल्या पाण्यात वा डबक्यात बराच काळ तग धरण्याची ताकद त्यांच्यात असते. समुद्राच्या पाण्यात खारटपणामुळे त्यांचा टिकाव लागत नाही. पाण्यातील क्लोरिनमुळेसुद्धा हे जिवाणू नष्ट होतात.

संसर्ग झालेल्या प्राण्याच्या मूत्रिपडात या जिवाणूचे वास्तव्य असते. मूत्रावाटे हे जिवाणू शरीराबाहेर पडतात. शरीराबाहेर पडलेले जिवाणू डबक्यात वा चिखलात बराच काळ जिवंत राहतात. इथे जिवाणूच्या संपर्कात आलेल्या प्राण्याला वा माणसाला संसर्ग होऊ शकतो. माणसाच्या शरीरावर जखम वा ओरखडा असल्यास त्यावाटे हे जिवाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. माणसांच्या वस्तीत राहणारे प्राणी तसेच जंगलात राहणारे प्राणी आपसात या रोगाची देवाणघेवाण करतात. ग्रामीण भागातील लोकांचा दोन्ही प्रकारच्या प्राण्यांशी संपर्क येतो व त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. माणसाला झालेला रोग मात्र संसर्गजन्य नसतो. शेतकरी. गटाराची स्वच्छता करणारे कामगार. जंगलात भटकणारे शिकारी यांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

रोगाची सुरुवात :

लक्षणे : लेप्टोस्पायरोसिस या रोगाच्या लक्षणांची सुरुवात जिवाणूशी संपर्क आल्यापासून साधारणपणे एक ते दोन आठवडय़ात होते. काही वेळा हा कालावधी दोन दिवस एवढा कमी किंवा २० दिवसांपर्यंत असू शकतो. या कालावधीचा व रोगाच्या तीव्रतेचा संबंध नसतो. ताप, प्रचंड डोकेदुखी व अंगदुखी ही प्राथमिक लक्षणे साधारणपणे ९५ टक्के रुग्णांमध्ये आढळतात. अंगदुखीमुळे रुग्णाला उभे राहणे अशक्य होते. त्याच्या खालोखाल डोळे लाल होणे. मळमळ. पोटदुखी. उलटय़ा व कावीळ ही लक्षणे आढळतात. फ्लूसारखी किरकोळ लक्षणेसुद्धा काही रुग्णांमध्ये दिसतात. बऱ्याच रुग्णांमध्ये लक्षणांची सुरुवात अचानकपणे होते. आजाराच्या अशा सुरुवातीला ‘ब्रुुटल बिगििनग’ असे म्हणतात. ताप साधारणपणे थंडी वाजून येतो व ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत असतो. ताप, असह्य़ डोकेदुखी व अंगदुखी ही निदानासाठी महत्त्वाची मानली जातात. या विकारात काही रुग्णांमध्ये लसिकाग्रंथी सुजतात व यकृताला सूज येते. काही रुग्णांमध्ये मेिनजायटिसची लक्षणे कमी-अधिक प्रमाणात आढळतात. आजाराचा कालावधी सर्वसाधारणपणे चार ते नऊ दिवसांचा असतो. १५ टक्के रुग्णांमध्ये मात्र आजाराचा कालावधी नऊ दिवसांपेक्षा जास्त लांबतो. अपवादात्मक रुग्णांमध्ये हा कालावधी सात-आठ आठवडे लांबल्याची नोंद आहे.

पाच टक्के रुग्णांमध्ये रोगाची तीव्रता फार जास्त असते. अशा रुग्णांमध्ये बहुतेक वेळा कावीळ. आजारपणाच्या पाचव्या ते नवव्या दिवसाच्या दरम्यान दिसू लागते. रक्तस्राव होणे. मूत्रिपड निकामी होणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू लागतात यालाच ‘वेल्स सिण्ड्रोम’ असे म्हणतात. लघवीचे प्रमाण अतिशय कमी होणे ही गंभीर अवस्थेची नांदी समजतात.

आपल्याकडे सार्वजानिक स्वच्छता ही जनतेची नाही, तर  शासनाची जबाबदारी आहे अशी आपली ठाम समजूत असल्यामुळे घरातील घाण रस्त्याच्या कडेला भिरकावून देताना आपल्या मनाला अपराधीपणाची भावना शिवतसुद्धा नाही. जनतेच्या या बेफिकीर वृत्तीप्रमाणेच महानगरपालिकेचे अधिकृत उकिरडे व कचरा नियोजनाचा अभाव हे प्रश्नसुद्धा अमरत्वाचा शाप घेऊन आलेले. या उकिरडय़ावर उंदीर, मांजर व कुत्रा गुण्यागोिवदाने एकाच पंगतीला जेवताना पाहून परस्पर वैरभाव कमीत कमी या पातळीवर लयास गेल्याचे जाणवते. क्वचित प्रसंगी जास्त मंडळी एकत्र आल्यास त्यांच्यात थोडीफार भांडणे होतात. पण खाद्यपदार्थाची टंचाई हा प्रश्न फक्त मानवांपुरताच मर्यादित असल्यामुळे त्यांची भांडणे फार काळ टिकत नाहीत. प्राण्यांना मलमूत्र विसर्जनासाठी कुठलीच ‘सुलभ’ व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे उकिरडय़ाच्या आसपास आणि त्यांचा संचार असलेल्या सर्व ठिकाणी लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू असू शकतात. उंदरांच्या संख्येच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार आपल्याकडे माणशी एक या प्रमाणात उंदीर आहेत.

उंदीर, कुत्रा व मांजर या प्राण्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी उपाययोजना करायची झाल्यास त्यांना उकिरडय़ाच्या स्वरूपात उपलब्ध असलेले अन्नपदार्थाचे साठे नाहीसे व्हायला पाहिजे.

रोगनियंत्रणाच्या संदर्भात उपाययोजना आखताना हे काम कुठल्याही महानगरपालिकेला जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय अशक्य आहे हे आपण मान्य केले पाहिजे. रोगनियंत्रण उपाययोजनेत सार्वजानिक स्वच्छतेच्या कार्यक्रमाला अग्रक्रम तर द्यायला हवाच परंतु हे कार्यक्रम परिणामकारक होण्यासाठी  हवी सार्वजानिक स्वच्छतेसंबंधीचे निकष काटेकोरपणे पाळणारी यंत्रणा. जनतेच्या सक्रिय सहभागासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागरणाची आणि लोकशिक्षणाची मोहीम तसंच सार्वजानिक स्वच्छता लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्यामुळे त्या संबंधीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची कायद्यात सोय हवी.

असे त्रिसूत्री कार्यक्रम राबविल्यास कायमस्वरूपी उपाययोजना करता येईल. हे आपल्याला साध्य झाले तर लेप्टोस्पायरोसिसच नव्हे तर इतर अनेक आरोग्यविषयक समस्या सुटतील.

अशी घ्या काळजी…

संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत प्रतिबंधक उपाययोजना सर्वाधिक महत्त्वाची असते. रोगावर लस उपलब्ध असल्यास त्याला अग्रक्रम द्यायला हवा. टायफाईडची लस सर्वत्र उपलब्ध आहे. लसीकरणाचा खर्च आजारपणाच्या एक दिवसाच्या खर्चाएवढा असतो आणि लस आपल्याला तीन वर्षांसाठी संरक्षण देते. तरीसुद्धा ही लस म्हणावी तेवढी लोकप्रिय नाही. सर्व शाळा, कॉलेज, खाजगी/सरकारी कार्यालयांमध्ये जनतेने पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावे असे मला आग्रहाने सांगावेसे वाटते. लेप्टोस्पायरोसिससाठी प्रभावी प्रतिबंधक उपाययोजना म्हणजे सार्वजनिक स्वच्छता. रस्त्याच्या कडेला असलेल्या अधिकृत कचराकुंडीचा पसारा रस्त्यावर पसरणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पायाला जखम वा ओरखडा आल्यास रस्त्यावर साचलेल्या पाण्यापासून दूर राहणे अत्यावश्यक आहे. घाबरू नका, काळजी घ्या.
सौजन्य – लोकप्रभा