Reliance Mango Orchard: पेट्रोलियम, दूरसंचार आणि इतर अनेक क्षेत्रांतील विस्तारित उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुकेश अंबानी यांनी कृषी क्षेत्रातही अनपेक्षित स्थान निर्माण केले आहे. पण, आशियातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबांनी हे देशातील सर्वांत मोठे आंबा बागायतदार आणि निर्यातदारही आहेत हे तु्म्हाला माहीत आहे का? जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ही जगातील सर्वांत मोठ्या आंबा निर्यातदार कंपन्यांपैकी एक आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्रातही अंबानी कुटुंबीयांचा दबदबा दिसून येत आहे.

६०० एकरांत पसरली बाग

गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या नावावर असलेल्या ६०० एकर क्षेत्रावर ही बाग आहे. या बागेत २०० पेक्षा अधिक जातींची १.३ लाख आंब्याची झाडे आहेत. त्यात देशी-विदेशी झाडांचा समावेश आहे. त्यातून कंपनीला कोट्यवधी रुपयांची कमाई होते.

लखीबाग अमराई, असे या बागेचे नाव आहे. हे नाव १६ व्या शतकातील मुघल सम्राट अकबराने स्थापन केलेल्या ऐतिहासिक लखीबाग या उद्यानाला श्रद्धांजली अर्पण करते.

हेही वाचा – राम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येत भीषण महापूर? रामपथावरील रस्ते, महामार्ग पाण्याखाली; पण व्हायरल Video मागचे सत्य काय? वाचा

व्यवसायाची मुहूर्तमेढ कशी?

रिलायन्सने उद्योगसमूहाने आंब्याच्या व्यवसायात प्रवेश केला नव्हता; परंतु तसे करण्यास भाग पडले. रिलायन्सची गुजरातमधील जामनगर येथे रिफायनरी आहे. त्यामुळे लोकांना तीव्र प्रदूषणाचा सामना करावा लागत होता. पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करण्यासाठी कंपनीने आजूबाजूच्या नापीक जमिनींचे विस्तीर्ण आंब्याच्या बागेत रूपांतर करण्याचा प्रकल्प सुरू केला. प्रदूषणाचा मुकाबला करण्यासह औद्योगिक परिसराभोवती एक शाश्वत हरित पट्टा निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. त्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी रिलायन्सने आंब्याच्या बागेची निर्मिती केली.

या बागेत केसर, अल्फोन्सो, रत्ना, सिंधू, नीलम व आम्रपाली यांसारख्या प्रसिद्ध भारतीय जातींसह फ्लोरिडा येथील टॉमी ॲटकिन्स, केंट व इस्रायलमधील लिली, कीट व माया या आंतरराष्ट्रीय जातींसह आंब्याच्या विविध प्रकारांच्या जातीही आहेत. या बागेतून वर्षाला अंदाजे ६०० टन प्रीमियम आंब्याचे उत्पादन केले जाते. त्यामुळे रिलायन्स ही आशियातील अग्रगण्य आंबा निर्यातदार कंपनी म्हणून उदयास आली आहे. हे आंबे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये निर्यात केले जातात.

या बागेतील वातावरण आंब्याच्या पिकासाठी फायदेशीर ठरावे म्हणून रिलायन्सने अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू केले. त्यामध्ये स्वच्छ पाणी पुरविणाऱ्या डिस्टिलेशन प्लांटचा समावेश होता. या प्रक्रियेमुळे प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. प्रगत कृषी तंत्र जसे की, पाणी साठवण, ठिबक सिंचन व एकाच वेळी खत देणे यांमुळे फळबागेची इष्टतम वाढ व शाश्वतता सुनिश्चित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक कृषी सक्षमीकरण

स्वतःच्या कार्यापलीकडे रिलायन्स जामनगरमध्ये सक्रियपणे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करीत आहे. त्यासाठी कंपनी स्थानिक शेतकऱ्यांना दरवर्षी एक लाख रोपांचे वाटप करते. नावीन्यपूर्ण कृषी पद्धतींवर प्रशिक्षण सत्र आयोजित करते. हा उपक्रम शाश्वत विकासासाठी रिलायन्सचा सर्वांगीण दृष्टिकोन आणि कृषी नवकल्पना चालविण्यात त्याची निर्णायक भूमिका अधोरेखित करतो.