हवामान बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर लगेचच दिसून येतो. अशातच पावसाळा आणि त्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात आजारांचे प्रमाण वाढते. इतकंच नाही तर इतर जुनाट आणि गंभीर आजारही या हंगामात अधिक त्रासदायक ठरू शकतात. अनेक अभ्यासांमध्ये असे सांगण्यात आले आहे की हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. विशेषतः ज्या रुग्णांचा कोलेस्ट्रॉल बॉर्डर लाइनवर आहे अशांसाठी हा ऋतू अधिक धोकादायक सिद्ध होऊ शकतो.

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयासंबंधित तक्रारी अधिक जाणवतात. हिवाळ्यात जसजसे तापमान कमी होऊ लागते तसे शरीरातील तापमान कायम ठेवण्यासाठी हृदयाला अतिरिक्त मेहनत करावी लागते. हिवाळा सुरु होताच तापमान खाली येते. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनण्याचा धोका वाढतो. तसेच, रक्तदाबामध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढू लागते.

हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळेस याचा त्रास जास्त जाणवू शकतो. काही संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी रक्तदाब जास्त असतो. तसेच, यावेळेस शरीरातील हार्मोन्सदेखील असंतुलित असतात. सकाळी रक्तप्रवाह सुरळीत ठेवणारे हार्मोन्स कमी प्रमाणात सोडले जातात, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका जास्त असतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना वाढते.

हेही वाचा : Photos : सामान्य वाटणाऱ्या डाळींचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? गंभीर आजाराशीही देतात जबरदस्त लढा

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका का वाढतो?

हार्ट इन्स्टिट्यूटमधील क्लिनिकल आणि प्रिव्हेंशन कार्डिओलॉजीचे संचालक डॉ. मनीष बन्सल म्हणतात की हिवाळ्यात तापमान घटल्यामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव आकुंचन पावू लागतात. यावेळी रक्तवाहिन्याही अरुंद होऊ लागतात. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हृदय या अवयवांना मोठ्या प्रमाणावर रक्ताचा पुरवठा करते. मात्र यामुळे त्वचा आणि इतर अवयवांना कमी रक्त पुरवठा होतो.

रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे शरीराच्या बाहेरील भागात रक्ताचा प्रवाह कमी होतो. या प्रक्रियेत हृदय खूप वेगाने धडधडायला लागते. रक्ताच्या धमन्या अरुंद होऊ लागल्याने, शरीराच्या सर्व अवयवांना रक्त पोहोचवण्यासाठी हृदय मोठ्या दाबाने पंप करते. त्यामुळे हृदयाचे ठोके जलद होतात आणि रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यावर त्यांच्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याची संभावना अधिक असते. रक्त गोठल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ लागतो. त्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचणेही थांबते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

कोणत्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते?

धूम्रपान करणारे, जास्त वजन किंवा स्थूल असणारे, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, जास्त मद्यपान करणारे, ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे अशा लोकांना या ऋतूत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

हेही वाचा : Blood Pressure : वाढत्या वयानुसार पुरुषांचा रक्तदाब किती असावा? पाहा संपूर्ण यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिवाळ्यात खालील गोष्टी लक्षात ठेवा

  • उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा. रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या औषधांचे सेवन करा.
  • या ऋतूत अति थंड ठिकाणी जाणे टाळा आणि उबदार कपडे घाला.
  • मिठाचे अतिसेवन टाळावे.
  • अस्वास्थ्यकर अन्नाचे सेवन आणि जास्त खाणे टाळा. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.
  • नियमित आणि मर्यादित स्वरूपात व्यायाम करा.
  • या ऋतूत जास्त व्यायाम करू नका, अन्यथा हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)