How To Stop Oily Hair Naturally : केस धुतल्यानंतर काही दिवसातच टाळू तेलकट होणे ही एक सामान्य समस्या आपल्या पैकी अनेकांना आढळते. टाळूमधून जास्त प्रमाणात नैसर्गिक तेल, मळ, कोंडा, त्वचेचे कण अडकल्यामुळे टाळू चिकट व तेलकट दिसू लागतो आणि फॉलिकल्स बंद होतात. फॉलिकल्स बंद झाले की, खाज येणे, जळजळ होणे आणि शेवटी डोक्यातील कोंडा आणि बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होणे असे त्रास होऊ शकतात.

त्यामुळे टाळू स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत; जी तेलकट टाळूसाठी मदत करतात. काही जण शॅम्पू बदलतात तर काही जण तेल बदलून पाहतात. तेलकट टाळूसाठी शॅम्पू चांगला आहे की, तेल याबद्दल अनेकांना गैरसमज आहे. तर हाच गैरसमज तुम्हालाही दूर करायचा असेल तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…

शॅम्पूची क्षमता – स्कॅल्पमधील घाण, जास्त तेल काढून टाकण्यासाठी शॅम्पू बनवले जातात. तेलकट टाळूसाठी, क्लॅरिफायिंग किंवा बॅलन्सिंग शॅम्पू उपयोगी ठरतात. अशा शॅम्पूमध्ये सौम्य घटक असतात; जे टाळूतील जास्तीचं तेल कमी करतात, केस आणि टाळूतील नैसर्गिक ओलावा काढून टाकत नाहीत. त्यामुळे केस स्वच्छ, हलके आणि निरोगी राहतात.

टाळूसाठी तेल – तेल मुळांना पोषण देण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. पण, आधीच तेलकट असलेल्या टाळूवर तेल लावल्यास रोमछिद्रं बंद होऊन जास्त मळ साचतो. त्यामुळे तेल कोरड्या किंवा फ्लॅकी टाळूसाठी जास्त फायदेशीर ठरते; तेलकट टाळूसाठी नाही. स्वच्छ टाळूवर हलके तेल जसे की, जोजोबा तेल, आर्गन तेल किंवा द्राक्षाच्या बियांचे तेल यासारखे हलके तेल तुम्ही लावू शकता.

केस धुणे – शॅम्पूने वारंवार केस धुतल्यामुळे टाळूवर डिहायड्रेशन निर्माण होऊ शकते. यामुळे तुमच्या टाळूमध्ये जास्त तेल राहते. कमी वेळा केस धुतल्याने टाळूत तेल साचते. त्यामुळे आठवड्यातून २ ते ३ वेळा सौम्य शाम्पूने केस धुतल्याने टाळू स्वच्छ राहतो.

योग्य शॅम्पू – हलके आणि सल्फेट-फ्री शॅम्पू ज्यामध्ये टी ट्री ऑइल, सॅलिसिलिक ॲसिड किंवा क्ले सारख्या घटक असतात; ते टाळूतून येणारे तेल नियंत्रणात ठेवायला मदत करतात. त्यामुळे क्रीमयुक्त किंवा खूप मॉइश्चरायझिंग असणारे शॅम्पू लावणे टाळा. कारण – यामुळे केस जाड होतात आणि तेलकट केसांचा त्रास आणखीन वाढू शकतो.

तेल – केसांच्या लांबीला तेल लावल्याने कोरडेपणा आणि खरखरीत केसांपासून संरक्षण मिळू शकते. पण, तेलकट टाळूवर थेट तेलाने मालिश केल्याने चिकटपणा वाढू शकतो. त्यामुळे यासाठी तुम्ही शॅम्पू वापरावा. ही पद्धत अधिक प्रभावी ठरू शकते.

त्यामुळे तेलकट टाळूला खरी मदत शॅम्पूच करतो. असे शॅम्पू जे सौम्य पद्धतीने केस स्वच्छ करतात. तसेच केसांना पोषण देण्यासाठी तेल उपयुक्त असतं, पण खूप जास्त लावल्यास टाळू अधिक तेलकट होतो. म्हणून संतुलन महत्त्वाचं आहे. योग्य शॅम्पू निवडा, तेल कमी प्रमाणात वापरा आणि चांगली केसांची निगा राखण्याची सवय ठेवा. त्यामुळे टाळू आणि केस दोन्ही निरोगी राहतील.