पावसाळ्याच्या दिवसांत तुमची हाडांची समस्या जास्तच बळावल्याचं तुमच्या कधी लक्षात आलं आहे का? मग आज ह्यावर उपाय पाहूया. अपोलो स्पेक्ट्रा करोल बाग, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अश्विनी मैचंद यांनी असं म्हटलं आहे कि, “बदलतं हवामान आणि सांधेदुखी हे परस्परांशी संबंधित आहेत. थंड हवामान आपल्या सांध्यांना अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतं. आर्द्रतेच्या पातळीत झालेला बदल, वातावरणाचा दाब, तापमानात अचानक झालेला बदल आणि पर्जन्यमान या कारणांमुळे मान्सून सुरू होताच अनेकांना सांधेदुखी, स्नायू कडक होणं आणि दुखापतीचा त्रास सुरु होतो. याचं कारण असं कि, उच्च आर्द्रता पातळी शरीरातील रक्त जाड करू शकते, रक्तवाहिन्यांमध्ये रक्तदाब वाढवू शकते आणि रक्ताभिसरण करण्यासाठी एखाद्याच्या शरीराला अधिक कष्ट घ्यायला लावू शकते.”

पावसाळ्यात सांधेदुखी का बळावते?

डॉ. अश्विनी पुढे म्हणतात कि, “आर्द्र दिवसांमुळे डिहायड्रेशन देखील होऊ शकतं. ज्यामुळे, सांध्याभोवती असलेलं द्रव्यपदार्थाचं प्रमाण कमी होतं आणि वेदना वाढू शकते. यासोबतच या सर्व घटकांमुळे संधिवात वेदना देखील वाढू शकतात. यामुळे अनेक लोक विशेषतः वयवर्षे ६० च्या पुढची मंडळी सर्रास सांधेदुखी आणि स्नायू कडक होण्याची तक्रार करतात आणि घाबरतात. मात्र, घाबरण्याऐवजी किंवा आपल्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यावर योग्य उपचार घेणं आणि मार्ग काढणं अधिक आवश्यक आहे.” दरम्यान, आता आपण याच उपायांबाबत जाणून घेणार आहोत.

गरम किंवा थंड शेक देणं

गरम किंवा थंड शेक देणं हा दुखापतग्रस्त स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. गरम किंवा थंड देणं हा आपली सांधेदुखी कमी करण्यास मदत करू शकतं. सांध्यावर तेल लावा आणि त्या भागावर हळूवारपणे मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण देखील वाढेल. कोल्ड कॉम्प्रेस देखील पावसाळ्यात कोणतीही इजा किंवा अस्वस्थतेचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

AC नको

हाडांच्या समस्या असलेल्या लोकांसाठी एअर कंडिशनरची बिलकुल योग्य नाही. कारण त्यामुळे वेदना आणखी वाढू शकतात.

शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा

दुखरे सांधे आणि कडक स्नायूंसाठी व्यायाम हे वरदान ठरू शकतं. म्हणूनच, मॉर्निंग वॉक, मसल स्ट्रेचिंग, योगासनं, पायाचे व्यायाम, पिलेट्स, पार्कर, एरोबिक्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा सायकल चालवणं यांसारखे व्यायाम विसरू नका जेणेकरून तुमचे सांधे चांगल्या स्थितीत राहतील. पण, हे व्यायाम अति प्रमाणात करणं टाळा. कारण, त्याचे उलट परिणाम होऊन तुमच्या सांध्यांना हानी पोहोचू शकते. तुमच्यासाठी कोणते व्यायाम योग्य ठरू शकतात ते समजून घेण्यासाठी एखाद्या फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणं उत्तम ठरेल. वेदना वाढवू शकतात असे व्यायाम शक्यतो टाळावेत.

संतुलित आहार घ्या

सांधेदुखी असणाऱ्यांसाठी व्हिटॅमिन ई वरदान ठरू शकतं. व्हिटॅमिन ई वेदना आणि जळजळ कमी करण्यास देखील मदत करू शकते. ड्रायफ्रूट्स, एवोकॅडो, बेरीज, हिरव्या भाज्या, बीन्स आणि मासे हि व्हिटॅमिन ई चे काही चांगले स्रोत आहेत. फळे, संपूर्ण धान्य, बदाम आणि अक्रोडचा समावेश करायला विसरू नका. लोणचं, मिठाई, मिष्टान्न, केक, पेस्ट्री, कृत्रिम गोड आणि फ्लेवर्स, कोला, सोडा, लोणचे, प्रक्रिया केलेली उत्पादनं, तेलकट आणि कॅनमध्ये असलेले अन्नपदार्थ टाळा जे तुमचं दुखणं वाढवू शकतं. गरमा-गरम सूप देखील शरीरातील जळजळ कमी होते. भरपूर पाणी पिण्यामुळे आपल्याला हायड्रेटेड राहण्यास, सांध्याची लवचिकता सुधारण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत होते.

अगदी कॅल्शियम आणि प्रथिनंयुक्त आहार देखील आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करू शकतो. अंबाडी, तीळ, सूर्यफूल बियाणं, पनीर आणि अंडी खाण्यास विसरू नका. पावसाळ्यात तुम्हाला जे पदार्थ खावे लागतात किंवा तुमच्या आहारातून काढून टाकावेत त्याबाबत तुम्ही एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्यावा. “व्हिटॅमिन डी आणि बी १२ च्या कमतरतेमुळे सुन्नपणा किंवा मुंग्या येणं आणि सांधेदुखी देखील होऊ शकते. म्हणून, आपल्या डॉक्टरांशी बोला आणि वेळेवर स्वतःचं मूल्यांकन करा. स्वतःला जास्त त्रास होईल असं काही नका आणि चांगली विश्रांती घ्या”, डॉ मैचंद म्हणाले.