गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांप्रती कृतज्ञता म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करतात. तसेच आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. चला तर मग जाणून घ्या शिक्षक दिनाचा इतिहास आणि महत्त्व.

शिक्षक दिनाचा इतिहास

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एक उत्तम शिक्षक होते ज्यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षे अध्यापनाच्या व्यवसायात वाहिले. ते विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांच्या योगदानासाठी आणि भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. म्हणूनच शिक्षकांविषयी विचार करणारे आहेत. एकदा त्यांचे विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना सांगितले की ते त्यांचा वाढदिवस साजरा करू इच्छितात. त्यावर त्यांनी सांगितले होते, ‘माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिवस म्हणून साजरा झाला तर मला अभिमान वाटेल.’ हा दिवस १९६२ सालापासून शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्वतप्रचुर, व्यासंगी होते. त्यांना तब्बल २७ वेळा नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षक दिनाचे महत्त्व

विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।, असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेच आहे. यावरून शिक्षणाची महती अधोरेखित होते. शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा हा मोलाचा असतो. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.