शनिवार आमची शाळा अर्धा दिवस असायची. त्या दिवशी शनिवार होता. शाळेची वेळ साडेअकरा ते अडीच. पण त्या दिवशी शाळा दहा मिनिटे लवकर सोडण्यात आली. कारण अडीच वाजता एक क्रिकेट सामना सुरू होणार होता. एखाद्या क्रिकेट सामन्यासाठी शाळेची वेळ अधिकृतरीत्या बदलणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे, पण तसा निर्णय घेतला गेला. कारण अडीच वाजता सुरू होणारा सामना साधासुधा नव्हता, तो होता विश्वकप १९९६चा उपान्त्यपूर्व सामना. आणि प्रतिस्पर्धी होते भारत वि. पाकिस्तान!!!

आम्ही धावत घरी आलो. आपली पहिली बॅटिंग होती. सचिन आणि सिद्धूनी सावध सुरुवात केली. त्यांचा जम बसला असा वाटता क्षणीच सचिन आउट झाला. छातीतली धडधड वाढली. मधल्या फळीने डाव सावरला, पण आपली धावगती कमीच होती. ४१ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अझरुद्दिन आउट झाला. रशीद लतीफने घेतलेला तो झेल अप्रतिम होता. आपली धावसंख्या होती २००. अजय जडेजा क्रिजवर होता. जास्तीत जास्त २५० पर्यंत जाऊ असं वाटायला लागलं. पण जडेजा पाकिस्तानी गोलंदाजांवर तुटून पडला. विशेषत: वकार युनूसवर. श्रीनाथ कुंबळेच्या साथीने जडेजाने शेवटच्या तीन षटकात ५० धावा कुटल्या. त्यात जडेजाचा योगदान होतं २५ चेंडूत ४५ धावा. या एका इनिंगमध्ये अजय जडेजा त्याची अख्खी कारकीर्द खेळून गेला. आपण पाकिस्तानसमोर २८७ धावांचं लक्ष्य ठेवलं. त्या काळात ही मोठी धावसंख्या मानली जायची. विजय दृष्टिपथात दिसू लागला. पण पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाल्यावर चित्र पालटलं. आमिर सोहेल आणि सईद अन्वर आपल्या गोलंदाजांचा समाचार घेऊ लागले. त्यांच्या धडाक्या समोर २८७ धावा कमी वाटत होत्या. एका चेंडूवर आमिर सोहेलने वेंकटेश प्रसादला चौकार मारला. आणि प्रसादकडे बघून, ‘हीच तुझी लायकी’ अशा आशयाचं काहीतरी बोलला. मैदानावरच वातावरण एकदम बदललं. तिथला तणाव घरबसल्या टीव्हीवर बघतानासुद्धा जाणवत होतं. प्रसादने डोकं शांत ठेवून पुढचा चेंडू टाकण्यासाठी धाव घेतली. आमिर सोहेलने रागाच्या भरात वेडीवाकडी बॅट फिरवली. आणि चेंडू त्याची उजवी यष्टी उडवून पुढे गेला. अख्खं स्टेडिअम आनंदाने बेभान झालं. प्रसादने क्रिकेटच्या भाषेत आमिर सोहेलला प्रत्युत्तर दिलं होतं. सणसणीत चपराकच होती ती. क्रिकेटच्या मैदानावर मी अनुभवलेली ही सगळ्यात नाटय़मय घटना आहे. जडेजासारखंच त्या एका क्षणात प्रसाद त्याचं अख्खं आयुष्य जगला. सामना पुढे सुरू झाला. सलीम मलिक, ईजाझ अहमद भारतीय माऱ्याला समर्थपणे खेळू लागले. पण अनिल कुंबळेने सलीम मलिकचा काटा काढला. वेंकटपती राजूने ईजाझ अहमदला दूर केले. नंतर रशीद लतीफने हाणामारी सुरू केली. एकवेळ सामना हातचा जातो की काय असं वाटू लागलं. यथावकाश तोसुद्धा बाद झाला. श्रीनाथ-कुंबळेने भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. आणि आम्ही सगळे आनंदाने उडय़ा मारू लागलो.
साधारण आठ वर्षांनी आणखी असाच एक दिवस उजाडला. सच्चा क्रिकेटप्रेमी हा दिवस कधीही विसरणार नाही. बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू होती. पण आम्हाला टेन्शन वेगळ्याच गोष्टीचं होतं. त्या दिवशी २००३ विश्वकपचा भारत-पाकिस्तान सामना होता. आधीचे चार सामने जिंकून आपण आधीच पुढच्या फेरीत पोहोचलो होतो. त्यामुळे सामना हरलो तरी आव्हान शाबूत राहणार होतं. पण पाकिस्तानकडून हार! शक्यच नाही. सामना जिंकण्याविषयी आम्ही निर्धास्त होतो. आम्ही वाट पाहत होती ती सचिन- शोएबच्या युद्धाची! काही जुने हिशोब चुकते करायचे होते. सामना सुरू झाला. पाकिस्तानने पहिली बॅटिंग घेऊन २७२ धावांचे आव्हान ठेवले. आपली बॅटिंग सुरू झाली. वसीम अक्रमचा मान राखून पहिली ओव्हर सचिन- सेहवागने शांततेत खेळून काढली. शोएब अख्तर गोलंदाजीला आला. सगळी ताकद वापरून त्याने सचिनवर हल्ला केला. पण अगदी खरं सांगायचं तर सचिनने अंगावरचं झुरळ झटकावं तसं त्याच्या ऑफ साइडच्या चेंडूला मैदानाबाहेर भिरकावलं. नंतर त्याच ओव्हरमध्ये तीन सणसणीत फटके मारले. सचिन ठरवून मारतोय असं वाटत होतं. सचिनचं हे रूप वेगळंच होतं. हेन्री ओलांगानी एकदा सचिनचं हे रूप अनुभवलं होतं. आता शोएबची पाळी होती. एका ओव्हरमध्येच शोएब उद्ध्वस्त झाला. नंतर सचिनने कोणालाच सोडलं नाही. अक्रम- वकारसारखे दिग्गज हतबल झाले होते. ९८ धावा काढून सचिन बाद झाला. पण तोपर्यंत त्याने पाकिस्तानचा कोथळा बाहेर काढला होता. शतक न झाल्याची हुरहुर वाटत नव्हती. कारण सचिन त्याची सर्वोत्कृष्ट खेळी खेळून गेला होता. युवराज- द्रविडने उरलेल्या धावा लीलया काढल्या. आणि परत एकदा आपण विश्वकपमध्ये पाकिस्तानला हरवले.
विश्वकप २०१५ मधला भारत-पाकिस्तान सामना झाला. यावेळी सचिन, राहुल, सौरव, अनिल नव्हते. त्यांची जागा आता नव्या शिलेदारांनी घेतली आहे. पण तेसुद्धा आपल्याच मातीतले आहेत. अपेक्षेप्रमाणेच आपण तो सामना जिंकला. कारण पाकिस्तानविरुद्ध जिंकणे ही आपली परंपरा आहे.