येत्या १६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक संघ नखशिखांत बदलले आहेत, तर काही संघांनी आपले हुकमी एक्के कायम राखत अन्य खेळाडू बदलले आहेत. म्हणूनच आयपीएलच्या सातव्या पर्वावर कोण सत्ता प्रस्थापित करणार ही क्रिकेटरसिकांना उत्सुकता आहे.

स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळे आयपीएलचा सहावा हंगाम डागाळला. त्यामुळे असंख्य वादांच्या खाचखळ्ग्यांनीच आयपीएलच्या सातव्या पर्वापर्यंतचा प्रवास व्यापलेला होता. मागील हंगामात राजस्थान रॉयल्सच्या काही खेळाडूंना मुंबईतून अटक झाली, मग चेन्नई सुपर किंग्जचा प्रशासकीय अधिकारी गुरुनाथ मयप्पन, विंदू दारा सिंग अशी अनेक मंडळी यात सापडली. गुंतलेल्या हितसंबंधांमुळे एन. श्रीनिवासन यांच्या सत्तेला हादरवण्याचे प्रयत्न झाले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरसुद्धा हाच अडसर आला. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांची खुर्ची रिक्त केली आणि आयपीएलची जबाबदारी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्याकडे सोपवली आहे. याचप्रमाणे मागील वर्षभरात सहाराशी झालेल्या वादामुळे पुणे वॉरियर्स संघाला आयपीएलमधून वगळण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात आयपीएलचा लिलाव झाला. अनेक संघ नखशिखांत बदलले, काही संघांनी आपले हुकमी एक्के कायम राखत अन्य खेळाडूंना बदलले. येत्या हंगामात सार्वत्रिक निवडणुकांचे आणखी एक आव्हान समोर होते. अखेर आयपीएलचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. आठ संघ आणि ६० सामन्यांच्या योजनेसह येत्या १६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सातव्या पर्वावर कोण सत्ता प्रस्थापित करणार ही क्रिकेटरसिकांना उत्सुकता आहे. यानिमित्ताने आयपीएलमधील संघांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप –

चेन्नई सुपर किंग्ज : वादाचे सर्वाधिक दडपण
मागील आयपीएलमध्ये सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ‘आयपीएलमधील महासत्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची प्रतिमा कमालीची डागाळली आहे. या संघाचा टिम प्रिन्सिपल गुरुनाथ मयप्पन तुरुंगात आहे, तर त्याचे सासरे श्रीनिवासन परस्परविरोधी हितसंबंधांचा संघर्ष या आव्हानाचा सामना करीत आहे. त्यामुळे त्यांचे अध्यक्षपद आणि आयसीसीचे कार्याध्यक्षपदही पणाला लागले आहे.
आतापर्यंतच्या सहापैकी पाच स्पर्धामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या या संघाच्या खात्यावर दोन विजेतेपदे आणि तीन उपविजेतेपदे जमा आहेत. धोनी आणि नशीब हे दोन मोठे घटक ‘सीएसके’च्या पाठीशी असतात. परंतु या आयपीएलला सामोरा जाताना या संघाचे मनोधर्य ढासळलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना पायउतार केले, तेव्हा इंडिया सीमेंट्सशी संबंधित मंडळींनाही दूर करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतर बांगलादेशमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळणाऱ्या धोनीने इंडिया सीमेंट्सचे उपाध्यक्षपद आणि चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडण्याची तयारी दर्शवली होती. मैदानाबाहेरील गोष्टींना बाजूला सोडल्यास आयपीएलच्या सातव्या मोसमासाठी त्यांना संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे.
महत्त्वाचे खेळाडू : महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, आर. अश्विन, मुरली विजय, रवींद्र जडेजा, मायकेल हसी, डर्क नेन्स.

राजस्थान रॉयल्स: आव्हान प्रतिमा सुधारण्याचे
शेन वॉर्नने २००८मध्ये राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद जिंकून दिले होते, आता २०१४मध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनकडे त्यांचे नेतृत्व आहे. मागील वर्षी राहुल द्रविडने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधूनही निवृत्ती पत्करली. परंतु या पलीकडे पाहिल्यास या संघाकडे संशयास्पद नजरेनेच पाहिले जात आहे. १६ मे २०१३ रोजी राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली. त्यामुळे स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाचा पर्दाफाश झाला. पुणे वॉरियर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स या तीन संघांविरुद्धच्या सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचे समोर आले. त्यानंतर बीसीसीआयने या तिघांवर निलंबनाची कारवाई केली.
राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा हेसुद्धा यानिमित्ताने चर्चेत आहेत. त्यामुळे संघाची प्रतिमा सुधारण्याचे मोठे आव्हान या खेळाडूंवर असेल.
महत्त्वाचे खेळाडू : शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे, जेम्स फॉल्कनर, संजू सॅमसन, प्रवीण तांबे.

मुंबई इंडियन्स : दुनिया हिला देंगे?
मागील हंगाम मुंबई इंडियन्ससाठी संस्मरणीय ठरला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाचा परीस्पर्श लाभलेल्या या संघाने प्रथमच आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली आणि मग दुसऱ्या चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. खरे तर रिकी पाँटिंगकडे मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. मात्र संघाला रिकीपेक्षा रोहितच्या यशावर अधिक भरवसा वाटला. पण गेले सहा हंगाम मुंबई इंडियन्सवर विलक्षण प्रेम करणाऱ्या सचिन तेंडुलकरला संघाने जेतेपदांसह सार्थ निरोप दिला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम दाखवणारा कोरे अँडरसन आणि अनुभवी खेळाडू माइक हसीच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्सचा संघ अधिक मजबूत झाला आहे. याचप्रमाणे अनिल कुंबळे, जॉन राइट अशी मार्गदर्शकांची फळी त्यांच्याकडे आहे.
महत्त्वाचे खेळाडू : रोहित शर्मा, लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, मायकेल हसी, कोरे अँडरसन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फलंदाजांची दहशत
ख्रिस गेल, विराट कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स यांच्यासारख्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या फलंदाजांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची आयपीएलमध्ये दहशत आहे. मल्ल्या पिता-पुत्रांच्या स्टेडियममधील ‘प्रणयलीलां’ची चर्चा ही या संघाची आणखी एक खासियत. आयपीएलचा बादशाह असे बिरुद मिरवणाऱ्या गेलच्या फलंदाजीने क्रिकेटरसिक मदहोश होतात. या हंगामाच्या आधी झालेल्या लिलावामध्ये बंगळुरू संघाने युवराज सिंगला सर्वाधिक १४ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. परंतु हा युवराज सध्या धावांसाठी झगडत असल्याचे चित्र ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाहायला मिळाले. २००९ आणि २०११मध्ये जेतेपदाने हुलकावणी दिलेल्या बंगळुरूला यंदाच्या हंगामात मात्र जेतेपदाची अपेक्षा आहे. कर्णधार विराट कोहली बेफाम फॉर्मात आहे, ही त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्ट ठरेल.
महत्त्वाचे खेळाडू : ख्रिस गेल, विराट कोहली, ए बी डी’व्हिलियर्स, मुथय्या मुरलीधरन, युवराज सिंग.

कोलकाता नाइट रायडर्स : पुन्हा.. जीतबो रे!
कोलकाता नाइट रायडर्स हा संघ मागील सहा हंगामांमध्ये प्रामुख्याने वादांसाठीच ओळखला जात आहे. सिनेअभिनेता शाहरूख खान या प्रत्येक वादात केंद्रस्थानी आहे. वानखेडे स्टेडियमवरील महानाटय़ावर अजूनही ‘किंग खान’ची स्वगते असतात. २०१२मध्ये कोलकाताने चेन्नईला हरवून अनपेक्षितरीत्या विजेतेपद मिळवून दिले होते. तेव्हापासून कोलकात्याचे या संघावरील प्रेम खूप वाढले आहे. सुनील नरिनसारखा जादूई फिरकी गोलंदाज आणि जॅक कॅलिससारखा जगातील सर्वोत्तम मर्यादित षटकांचा खेळाडू हे दोघे जण कोलकाता संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. त्याव्यतिरिक्त गौतम गंभीर, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा आणि पीयूष चावला हे खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत आहेत.
महत्त्वाचे खेळाडू : गौतम गंभीर, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, सुनील नरिन, जॅक कॅलिस.

सनरायजर्स हैदराबाद : मोठय़ा अपेक्षा
डेक्कन चार्जर्सची हकालपट्टी झाल्यानंतर गेल्या हंगामात सनरायजर्स हैदराबाद या नव्या संघाची नांदी झाली. टॉम मुडी, के. श्रीकांत, व्हीव्हीएस लक्ष्मण, वकार युनूस, आदी मार्गदर्शकांच्या बळावर हैदराबादने आपल्या पहिल्याच हंगामात चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली. त्यामुळे या संघाकडून मोठय़ा अपेक्षा करण्यात येत आहेत. शिखर धवनकडे या संघाचे नेतृत्व आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज डेल स्टेनवर त्यांच्या गोलंदाजीची धुरा आहे. याचप्रमाणे फिरकी गोलंदाज अमित मिश्रा सध्या अतिशय फॉर्मात आहे. त्यामुळे या संघाने धक्कादायक कामगिरी केल्यास अजिबात आश्चर्य वाटू नये.
महत्त्वाचे खेळाडू : शिखर धवन, डेल स्टेन, डेव्हिड वॉर्नर, अमित मिश्रा, डॅरेन सॅमी, आरोन फिंच.

किंग्ज इलेव्हन पंजाब : नशिबाशी लढा
प्रीती झिंटाचे चित्रपट एकीकडे यशासाठी झगडत असताना तिच्या संघाची परिस्थितीसुद्धा नेमकी तशीच होती. पहिल्यावहिल्या हंगामात तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारणाऱ्या संघाला त्यानंतर तितकी मोठी उंची कधीच गाठता आली नाही. यंदा नशिबाशी लढा देणाऱ्या वीरेंद्र सेहवागकडे किंग्ज इलेव्हनची मदार असेल. यंदाच्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा ट्वेन्टी-२० कर्णधार जॉर्ज बेलीकडे त्यांनी कर्णधारपद सोपवले आहे. याचप्रमाणे बेली, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल जॉन्सन या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंवर यंदा किंग्ज इलेव्हन पंजाबचे आणि प्रीती झिंटाचे भवितव्य अवलंबून आहे.
महत्त्वाचे खेळाडू : वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, थिसारा परेरा.

दिल्ली डेअरडेव्हिस: संघ बदलला.. यश मिळेल?
आयपीएलच्या आतापर्यंतच्या सहा हंगामांमध्ये सर्वाधिक बेभरवशाचा संघ म्हणून दिल्ली डेअरडेव्हिल्सने ओळख जपली. आयपीएल-७च्या लिलावाआधी त्यांनी आपला एकही खेळाडू संघात कायम न ठेवल्यामुळे त्यांना सर्व (तीन) राइट-टू-मॅच कार्डस मिळाली. आतापर्यंत दोनदा तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारणाऱ्या या संघाने अद्याप एकदाही आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली नाही. नेमक्या याच कारणासाठी त्यांनी संघात आमूलाग्र बदल केला. ट्वेन्टी-२० क्रिकेट गाजवणारा अनुभवी इंग्लिश खेळाडू केव्हिन पीटरसन त्यांच्याकडे असल्यामुळे हा संघ अधिक मजबूत भासत आहे. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर असतानाही दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नशीब कधीच उजळले नाही. परंतु आता बदललेला संघ त्यांचे नशीब बदलेल का, हीच उत्सुकता क्रिकेटरसिकांना आहे.
महत्त्वाचे खेळाडू : दिनेश कार्तिक, केव्हिन पीटरसन, रॉस टेलर, मुरली विजय.