रायरेश्वरच्या पायथ्यापासून ते महाबळेश्वरच्या माथ्यापर्यंत अखंड तंगडतोड करताना घामटं निघतं खरं, पण सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर वावरल्याचा जो अनुभव मिळतो, त्याला कशाचीच तोड नाही.

रायरेश्वराला पुणे जिल्ह्यतील महाबळेश्वर किंवा मिनी-महाबळेश्वर असेच संबोधले जाते. या दोन्हीमध्ये साम्यही भरपूर आहे. दोघांनाही लाभलेले विस्तृत पठार ही नैसर्गिक देणगी! ऐतिहासिक वारसाही बरोबरीचा. रायरेश्वरावर शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली तर श्रीक्षेत्र महाबळेश्वरला शिवबांनी आऊसाहेबांची अन् सोनोपंतांची सुवर्णतुला केली. फरक इतकाच की, महाबळेश्वर हे सदाहरित जंगलांनी संपन्न तर रायरेश्वरावर वनांची संख्या तुलनेने कमी. पण दोघांचेही महत्त्व तिळमात्रही कमी होत नाही. रायरेश्वराच्या कोंकणटोकावर म्हणजेच नाखिंद्यावर उभे राहून आसमंत न्याहाळता सुरू होतो सह्य़ाद्रीच्या अभेद्य रांगांचा उलगडत जाणारा पट. नाखिंद्यावरून दक्षिणेकडे वाळकी खोऱ्याच्या पलीकडे कोळेश्वर अन् त्याही पलीकडे महाबळेश्वराचा वनश्रीने सजलेला हिरवळ माथा. त्याचा पश्चिम कडा सरळ तुटलेला, तोच मढीमहाल – जिथे मुलगा गमावलेला आर्थर मॅलेट हा इंग्रज अधिकारी, मुलगा गेल्याच्या दु:खात येऊन बसायचा म्हणून या जागेला पडलेलं इंग्रजी हे नाव – आर्थर सीट!
बेत ठरला, रायरेश्वरच्या पायथ्यापासून ते महाबळेश्वरच्या माथ्यापर्यंत तंगडतोड करायची. हिरडस मावळातील अस्वलखिंडीतून कोकणात शिरायचं आणि खालून चढायला सुरुवात करून वरचा घाटमाथा अर्थात मढीमहाल जवळ करायचा, अट एकच – अखंड प्रवास फक्त पायगाडीचा!
शनिवारी पहाटेच नेहमीच्याच चार टाळक्यांनी, अर्थातच योगिता, प्रसाद, रेश्मा अन् मी घराचा उंबरठा ओलांडला आणि स्वारगेटला हजर झालो. पण काही कारणास्तव सातची महाड गाडी ताम्हिणीमार्गे जाणार म्हटल्यावर पावणेआठच्या गाडीची वाट पाहत बसलो. पण मघापासून एका माणसाचे आमच्याकडे लक्ष होते. दोन-तीन वेळा कुठे जायचंय, कुठे जायचंय असं विचारून गेला. म्हटलं वरंधा घाटाच्या अलीकडे कुदळी गावात जायचंय. म्हणाला, ‘चला’. आणि काका सॉलिडच मजेदार निघाले. सातारा रोडला कोंडे देशमुखांच्याकडचा वडा सँपल पोटात रिचवून गाडी भोरकडे मार्गस्थ झाली आणि गप्पांचा फड असा काही रंगला की कुदळी आलं तरी एकमेकांचा निरोप घेणं जिवावर आलं होतं. पण मजा आली. आम्ही गावात पोहोचलो तेव्हा रामनवमीची टळटळीत दुपार होती, आकाशी मात्र ढगांचा आणि नारायणाचा लपंडाव चाललेला. खालच्या कुदळीतून रायरेश्वरावर जाणारी वाट खुणावून गेली, अन् वरच्या कुदळीत रामरायाचे गुणगान करीत असलेला कन्र्या गाव जागे असल्याचे जाणवून गेला. चालायला सुरुवात केली तेव्हा, समोर अस्वलधोंड डावीकडच्या नाखिंदच्या पायथ्याशी दुपारची वामकुक्षी घेत शांत निजली होती. एकाला विचारलं, ‘काय ओ दादा अस्वलखिंड नाव कसं पडलं?’ ‘तिथं अस्वल मेलं होतं, अंगावर धोंडा पडून’, इति दादा. ‘पुढं पाणी मिळेल का वाटेत?’ ‘हो हाय की, वाटंच्या शेजारी वरच्या अंगाला पाण्याचा झरा हाय, जावा, लयी मस्त वाट हाय.’ ओढय़ाच्या शेजारीच थोडं कातळ चढून गेल्यावर उंबराखालचं गोड पाणी घशाखाली उतरलं तेव्हा तहानसुख काय असतं, कळलं! तिथेच दुपारचा पोटोबा झाला आणि खिंडीकडे मार्गस्थ झालो.
आणि वाट त्या दादाने सांगितल्याप्रमाणे खरंच सुंदर होती. आजूबाजूला भरपूर झाडोरा, करवंदी, उंबर इत्यादी झाडांनी रान नुसतं तुंबलं होतं. किर्र जंगलात उन्हामुळे झालेली पानगळ पायाखाली तुडवत तीन भल्यामोठय़ा दगडांजवळ पोहोचलो आणि खिंडीत पोहोचल्याची खात्री पटली. बाहेर नारायणराव आग ओकत होते, आत मात्र झाडी सुखावणारी होती. जागचे हलावेसे वाटत नव्हते. आता पुढे उतार. झाडोऱ्यातून परत थोडे बाहेर पडलो तर उजव्या बाजूला मोठी दरी आ वासून होती, कदाचित कामथी नदीचे खोरे असावे. रायरेश्वर पाठराखण करीत होता, आता आभाळही भरून आले. चांगला अर्धा-एक तास पाऊस बरसत होता. हे म्हणजे भर उन्हात मिळालेले अनपेक्षित बक्षीसच होते. मंगळगड अजूनही डोळ्याला दिसला नाही, याचा अर्थ बरेच चालायचे आहे, कामथे मात्र दृष्टिक्षेपात आले. वाटेत झाडांवरच्या कैऱ्या मनसोक्त खाल्ल्या. कोरडे पडलेले धबधबे ओलांडून आणि पावसामुळे हवेत आलेला गारवा अनुभवत आम्ही एकदाचे कामथ्याच्या मुख्य वाटेला लागलो. गावात पोहोचलो तर गावातली पोरे आमच्याकडे टकामका बघत होती. ‘कुठून आलावं?’ एका मावशीबायने स्वत:हून चौकशी केली. तिच्या आग्रहाचा मान राखत तहान भागवली. वडघराकडे चालते झालो तेव्हा दिवाकर पश्चिमेकडे कलला होता. महादेव मुऱ्याला वाट अलीकडून, बोरघराकडूनच असल्याचे समजले अन् तिकडची वाट धरली. आज मुक्काम तिथल्या विहारात. कामथीच्या पलीकडे वडघरात रामनवमीचा उत्सव चालू होता, तिकडे ह.भ.प. महराजांचा टाळ-मृदंगच्या साथीत विठोबा चालला होता आणि इकडे धडपड चालली होती आमच्या पोटोबाच्या शांतीची! जेवणे आटोपून कीर्तन ऐकतच झोपी गेलो.
सकाळी ढगाळ वातावरणात महादेव मुऱ्याची दमवणूक करणारी चढण जरा दमानंच चालली होती. कामथीच्या खोऱ्यात वसलेली वडघर, बोरघर अन् कामथे हळूहळू जागे होत होती. पुढय़ात मंगळगडाचा पसाराही उलगडत होता. वरच्या पठारावर पोहोचलो तेव्हा वरंधा घाटाचा पहारेकरी कावळ्याने दर्शन दिलं आणि पाठीशी कोणी तरी ओळखीचं आहे, असं उगाच वाटून गेलं. उजवीकडच्या चांदला अन् गवळीवाडा अजूनही झोपेच्या अधीन भासत होतं. मुऱ्याच्या वेशीवर पोहोचलो तेव्हा एक ताई गंगाटाक्याच्या पाण्याने हंडा भरत होती. त्या झऱ्यातून पाण्याच्या प्रवाहावरून तर वाटत होतं, गावकऱ्यांचा अर्धा दिवस पाणी भरण्यातच जात असेल. इतके असूनही ताईने तिच्या अर्धवट भरलेल्या हंडय़ातून प्यायला पाणी दिलं. गावात आमचं दणक्यात स्वागत झालं. कुठून आलावं, कुटं चाल्लावं, चहा घ्या, पाणी प्या! नुसती सरबत्ती चालली होती. पण गाव खरंच प्रेमळ आणि सुंदर आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं हे महादेव मुरा अगदी चित्रातल्यासारखं, तेवढंच जिवंत वाटावं असं. बोलके गावकरी आणि आजूबाजूचा सह्याद्रीचा पसारा बघून एकदम उत्साह संचारल्यासारखं झालं. बऱ्याच वर्षांची ओळख असल्यासारखी एका मावशीने तर रेश्माच्या चक्क हातात हात घेऊन गप्पा मारायला सुरुवात केली. आणि आता मात्र एकेका डोंगरसख्यांची ओळख पटायला लागली. पहिल्यांदाच झालेल्या महाबळेश्वर अन् प्रतापगडाच्या दर्शनाने स्तिमित झालो. पार पल्याड कावळ्यापासून अलीकडचा कांगोरीचा मंगळमाथा, अस्वलधोंड, रायरेश्वराचं नाखिंद, महाबळेश्वराचा मढीमहाल, पायथ्याचा काळा कुळकुळीत चंद्रगड अर्थात ढवळगड, पार सावित्रीच्या खोऱ्यापलीकडचा प्रतापगड अन् त्याहीमागे मधू आणि मकरंद हे जुळे डोंगरसखे. व्वा! याला म्हणतात देखणा सह्यद्री! आणि अशा दिग्गजांच्या पहाऱ्यात निवांत पहुडलेलं महादेव मुरा हे आपुलकीने चौकशी करणारं डोंगरमाथ्यावरचं सुंदर गाव.
गावाच्या दुसऱ्या टोकावर महादेवाचे एक जुने मंदिर आहे, जवळच पाण्याचा झरा आहे. पाण्याचा एकमेव साठा असल्यामुळे जपून वापरणेच सोयीचे. बाकी झाडांच्या सावलीत दगडी चुलीवर शिजवलेली मॅगी अन् भुकेने व्याकूळलेले जीव! सकाळचा फक्कड नाश्ता झाला आणि महादेवाचा निरोप घेऊन मुरा उतरायला आम्ही सुरुवात केली. आता पोहोचायचं होतं चंद्रगडास. खालच्या खांडजपर्यंतची तीव्र उताराची वाट आणि वाट अर्धी संपलेली असताना खालच्या पठारावरून झालेल्या ढवळीच्या खोऱ्याचे अविस्मरणीय दर्शन अक्षरश: वेड लावून गेलं. आम्ही उभे इकडे कोंकणातल्या पिटुकल्या डोंगरावर अन् तिकडे तो ढवळीच्या पलीकडे हा असा उभाच्या उभा सह्य़कणा, एकदम खडा! आणि आजच आपण हा अवाढव्य कणा चढून जाणार आहोत, या कल्पनेनेच पाचावर धारण बसली. सह्य़रांगेच्या पायथ्याशी असलेली गावं जणू द्वारपालाच्या भूमिकेत रात्रंदिवस खपत असलेली, निवांत विसावलेली. आणि का नाही खपणार? त्यांचा तो एक मोठा आधारवडच ना! त्याच्याच अंगाखांद्यावरच्या निबिड अरण्यात जगणारे हे गावकरी, त्यातून मिळणारा रानमेवा अन् फळफळावळ याच्यावरच काही जणांची गुजराण! निसर्गाचा हा अमूल्य ठेवा जपणारी माणसं हीच, बाकीच्यांच्या फक्त गप्पा! नाही का? तेवढय़ात खालून येणाऱ्या एका बाबांनी आमची चौकशी केली. खांडजवरून बाबा निघाले होते महादेव मुऱ्याला. आम्ही तिकडूनच आलो. हे ऐकताच खूश झाले आणि स्वत:हून आजूबाजूचा परिसर सांगायला लागले. ‘हे बगा पोरांनो, त्यो तिकडे पल्याड, तानाजीचा गाव- उमरठ. तानाजीचा बरं का! त्याच्या पलीकडे उजव्या बाजूला गोवेल, परत या इकडे हे ढवळे, समोरचा चंदरगड, हे खोपडे, हे चांदण अन् हे अलीकडेच खांडज! आता तुम्हाला ढवळ्यात जायाचं तं खांडजला जायची गरज नाही, डावीकडील आमराईतली वाट दिसते का? तीच धरायची अन् ढवळी ओलांडून चंदरगडाच्या पायथ्याशी! अन् ह्य़े सह्याद्री! घाटानी चढून गेलो की माथ्यावर महाबळेश्वर.’ आणि अगदी चित्रकाराने चितारल्यासारखं ढवळेचं खोरं दिसत होतं! एका नजरेत न मावणारा खोऱ्याचा हा पसारा थक्क करून गेला. महादेव मुऱ्याचा डोंगर उतरून नदीत उतरलो तेव्हा चांगलीच दमछाक झाली आणि नदी कसली? नुसत्या गोल गोल छोटय़ा-मोठय़ा धोंडय़ांच्या राशी. बाकी पावसाचे चार महिने सोडले की कोंकणातल्या या नद्या ठणठण गोपाळ! कधी एके काळी ही नदी तुडुंब भरून वाहत असते, ही दगडधोंडय़ांची रास बघून विश्वसच नाही बसणार. आणि वरून आग ओकणारे नारायणराव अन् कोंकणातलं दमट वातावरण, त्या पंधरा मिनिटांच्या चालीत अक्षरश: करपून निघालो.
ढवळ्यात पोहोचलो तेव्हा घामाच्या धारा वाहत होत्या. गावातल्या एकमेव दुकानात डोकं गार केलं, ऊन चांगलंच तापायला लागलेलं, घडय़ाळात वाजले होते दुपारचे एक! साधारण सहा तासांची चढाई विचारात घेऊन महाबळेश्वरला पोहोचेपर्यंत अंधार नक्कीच होणार होता. चंद्रगडाकडे निघालो तेव्हा गावातल्या बायाबापडय़ा ख्यालीखुशाली विचारत नीट जायला सांगत. लयी उन्हं हाय, पुढच्या शेलारवाडीतून माणूस घ्या संगतीला. आदिवासी पाडा हाय, थीतं मिळल कुणीबी, असं सुचवत होत्या. शेलारवाडीतला अर्जुन दिमतीला घेऊन आम्ही घाटाकडे कूच केलं.
रणरणत्या उन्हात रापलेला काळा कुळकुळीत चंद्रगड धसकाच देऊन गेला. बोडक्या पठारावरून जंगलात शिरलो. निबिड अरण्यातली वाट तशी मळलेली, मात्र नवख्याला भीती दाखवणारं दाट जंगल. मोऱ्यांच्या जावळीचं इतिहासप्रसिद्ध जंगल. मोरे तसे हुशार. एकतर वाघाच्या जबडय़ात हात घालायची, जावळीच्या या खोऱ्यात शिरायची कुणाची हिंमत होणार ? आणि झालीच तर त्यांच्यावर पहारा ठेवायला हा चंद्रगड नेहमीच तत्पर असावा. नजीकच्या ढवळे गावातून निघाल्यावर दहा मिनिटात गडाचा पायथा गाठता येतो मोऱ्यांच्या पराRमाची गाथा ऐकवणारा हा ढवळगड आता निपचित पडला आहे, उन्ह-वाऱ्याचे वार झेलत. एकेकाळी शेखी मिरवत असेल हा आपल्या मालकाची, नाही ! आणि मालकाच्याच नावावरून पडलेलं स्वत:चं नाव. बाकी रान जबरदस्त माजलेलं, सूर्यकिरणांनाही आत सहज शिरण्याची मुभा नाही. रानमेव्याची नुसती चंगळ, दहा फुटांवर माणूस दिसणार नाही इतकी दाट झाडी, कोकमची उंच झाडे, पण रानांत क्षणभर विसाव्याची परवानगी नाही. एक म्हणजे ढवळ्या घाटाचा उभा चढ येंगुन अंधार व्हायच्या आत वर पोहोचणे आणि दुसरं कानाजवळ घोंघावणारं डासांचं रानटी आव्हान ! घामाने निथळताना पावलं उत्तरं द्यायला लागली होती.
आता खरंच चालवत नव्हतं आणि थांबलो तर डांस थांबू देत नव्हते. थोडं खुलं रान बघून खाण्याचा ब्रेक झाला अन् डासांशी सामना करत परत चढाईला सुरुवात झाली. शेलारवाडीतल्या अर्जुनने निरोप घेतला आणि आम्हाला जंगलात सोडून परतला. दाट झाडीमुळे आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं, फक्त किर्र झाडी आणि डासांचा हैदोस. इतक्यात कुठलातरी पक्षी आपल्या कर्णकर्कश आवाजात घसा साफ करून जायचा, आणि कुठे एखाद मंजूळ गाणं कानावर पडायचं, पाचोळयात होणारा पावलांचा आवाज सोडला तर इथे होती फक्त रानाची जीवघेणी शांतता. कुठे आलोय, अजून किती चढायचंय, गेल्या दोन तासांत तर डोंगर पण नव्हता बघितला आणि आता तर वाट होती ऐंशीच्या कोनातली, वर चढत गेलेली. पहिल्यांदाच उजवीकडच्या डोंगराचं एक टोक समोर आलं आणि वाटच संपली, वाट चुकली. डावीकडे, उजवीकडे पायवाट संपली होती. लगेच डोळ्यांसमोर आली ती वाट शोधत जाणारी अन् कापरासारखी उडत जाणारी वेळ ! जो काय खेळ करायचा, तो फक्त पुढच्या सव्वा तासात. परत सगळे खाली उतरलो. त्याच वाटेला समांतर अजून दोन वाटा होत्या, एकाने मी आणि दुसरीने प्रसाद असे करत परत एकदा शोधाशोध सुरू झाली. पण रस्ता सापडायला तयार नाही. त्याच वेळी खालून योगिता अन् रेश्माचा ओरडा ऐकू आला, खालून वाट असल्याचा. सुदैवाने जास्त वेळ न दवडता अचूक वाटेला लागलो, गेल्या तीन तासांपासून चढ- चढ चढत जाणारी वाट आता कुठे डोंगराच्या पोटाला चिकटून आडवी झाली. चुकण्यामुळे एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे, अचूक वाट मिळालेल्या आनंदात पावलं आता धपाधप पडू लागली आणि बऱ्याच वेळानंतर चंद्रगडाचा नजारा समोर आला.
हळूहळू झाडी खुली होत गेली आणि एक एक स-सांगाती दर्शन द्यायला सुरुवात झाली. डोंगराला वळसा घालत आडव्या वाटेने एक दोनदा जीव पार गळ्यापर्यंत आणला होता. आता मंगळगडही दृष्टिपथात आला, अस्वलखिंड, नाखिंद सगळ्यांनी हळूहळू डोकावयाला सुरुवात केली. दुपारपासुन दुरावलेलं आकाशीचं छप्पर आता डोक्यावर आलं, ढगाळलेल्या नभात नारायणाचा कोप तेवढा जाणवत नव्हता. तसंही सांजवेळ जवळ आली होती. अजून एक आडवी मारून थोडं वर सरकलो तेव्हा दक्षिणेकडे प्रतापगड, महाराजांच्या प्रतापाची शेखी मिरवित होता. त्याच्या खालच्या अध्र्या डोंगरावर दाट हिरवाईने आपला मुक्काम ठोकला होता, किंबहुना तो तिथे नेहमीचाच ! अफजल बुरुज महाबळेश्वराकडे आ वासून उभा होता. अन् आंबेनळीच्या खालच्या अंगाला करपलेले रान खुणावत होतं. मध्ये सावित्रीची दरी डोळे फिरवून गेली. येथे पोहोचेपर्यंत सोबतीला बऱ्यापैकी झाडी होती. पण पुढे बोडक्या अन् घसरडय़ा वाटेवरून जीव मुठीत धरून चालायचे म्हणजे एकाग्रतेची कसोटी पाहण्यासारखं होतं, थोडं लक्ष चुकलंच तर क्षमा मागायलाही संधी न मिळावी. हजार एक फुटांचा सरळसोट फॉल होता. आणि आता मात्र चंद्रगड अक्षरश: एवढासा दिसत होता. कुठे तो ढवळे गावातून दिसणारा भेदक काळा कुळकुळीत डोंगर, आणि कुठे हे त्याचं लोभस- निरागस रूप! व्वा ! कमाल आहे खरंच निर्मात्याची. त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकत, पायांवर लक्ष केंद्रित करत कसेतरी दरीची भीषणता कमी करण्याचा प्रयत्न करीत होतो. हे सर्व चालू असताना वर थोडय़ा अंतरावर असलेल्या झाडावर छोटा भगवा फडफडताना दिसला तेव्हा कुठे जीव भांडय़ात पडला. गेल्या पाच तासांपासून मानवी अस्तित्व हरवलेलो आम्ही, त्या छोटय़ाशा भगव्याने एवढे हरखलो की काय सांगू, अफाट पसरलेल्या जावळीच्या या निबिड अरण्यातून वाट काढत आम्ही बहिरीच्या घुमटीजवळ पोहोचल्याची खात्री पटली. अजून एक जीवघेणी घसरडी चालून घुमटीजवळ पोहोचलो, तेव्हा घडय़ाळजी सव्वासहाच्या ठोक्यावर येऊन थांबले होते.
अंधार पडायला सुरुवात झाली होती. अजून कमीत कमी एका तासाची चढाई असावी मढीमहालपर्यंत, पण खात्री नव्हती. कदाचित जास्त वेळही लागू शकणार होता. आणि अंधारात मुक्काम अवघड अन् धोक्याच्या ठिकाणी करावा लागला तर अजून कठीण होऊन बसेल, या विचाराने घुमटीजवळच रात्र काढायची असं सर्वानुमते ठरलं आणि पाण्याची शोधमोहीम सुरू झाली. आणि लगेचच पाण्याचे टाकेही सापडले. याला जोरचं पाणी म्हणतात. घुमटीजवळून दोन वाटा फुटतात, डावीकडची खालून जाणारी वाट जोर गावी घेऊन जाते, तर वरची वाट मढीमहालला महाबळेश्वरकडे जाते, त्याच वाटेवर हे पाण्याचं टाकं आहे. मुक्काम करायला जागा वाईट नव्हती. पण एका अस्मानी संकटाची चाहूल अधेमधे लागत होती, अर्थातच आकाशात नभाचा लागलेला वेढा, हळूहळू तो अजूनच आवळला जात होता. त्यामुळे भीती होती पाऊस जर आला तर.. पण वरुणराजाची कृपा, थोडय़ाच वेळात ढगांचा वेढा शिथिल झाला आणि लुकलुकणाऱ्या चांदण्या नभांगणात अवतरायला सुरुवात झाली. एका बाजूला दोनेक हजार फुटांचा कडा, खाली जावळीचं खोरं अन् दुसऱ्या बाजूला जोर गावाकडे जाणारी जंगलवाट. आणि चारही बाजूंनी किर्र रान. रात्रभर चाललेली पाण्याच्या टाक्यावरची चाबुक-डुबुक वन्य जिवांचे अस्तित्व जाणवून गेली. मध्येच एखादा रानकोंबडा जंगलातल्या स्मशानशांततेला छेद द्यायचा. बहिरीच्या घुमटीजवळचा हा मुक्काम वाटला तेवढा सोपा नव्हता हे मात्र खरं.
सकाळी उठल्या उठल्या डोक्यात आलेला एक नेहमीचाच प्रश्न! एवढय़ा जीवघेण्या वाटेने तेव्हाचा व्यापार चालत असे? इथे माणसास धड चालता येत नाही, तिथे डोक्यावर बोचके घेऊन कोण माथ्यावर विकायला घेऊन जात असेल आणि काय? विचार करायला गेलो तर कल्पनेपलीकडचे वाटते, पण घुमटीजवळच असलेले जोरचे पाणी इथले या सगळ्यांची साक्ष देण्याचा प्रयत्न करते. बाकी बहिरीचा उत्सवही जोरात साजरा होत असावा. एका मोठय़ा दगडी आडोशाला विराजमान झालेल्या देवी-देवतांच्या मूर्ती तेवढंच मन प्रसन्न करून जातात. घुमटीचा निरोप घेऊन पुढील वाटेला ट्रेकस्थ झालो. पाण्याच्या टाक्याजवळून किल्ले राजगडाचा बालेकिल्ला दिसल्यावर, पुणे हाकेच्या अंतरावर असल्याचा भास झाला. गाढवाच्या माळावरील भगवा बघितल्यावर ट्रेकचा अजून एक टप्पा पार केल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. पण गगनाला भिडलेला समोरचा मढीमहालचा कडा बघून भीतीची एक लकेर उमटून गेली. दृश्य सुंदर होतं की भयप्रद? तुटलेल्या कडय़ाखाली महाबळेश्वरीच उगम पावलेल्या सावित्रीचं अथांग खोरं अक्षरश: डोळे दिपवून गेलं. हीच नदी पुढे बाणकोटच्या खाडीमध्ये रूपांतरित होऊन सागरास जाऊन मिळते. आता उजव्या बाजूला कडा अन् डाव्या बाजूला जंगल असे करत निमुळत्या वाटेवरून पुढय़ात दिसणाऱ्या मढीमहालाचं अंतर कमी करत होतो. वाट उघडय़ा रानमाळावरची असल्याने उन्हाची तीव्रता थोडीफार जाणवायला लागली. मात्र आर्थर सीटवरील बांधून काढलेल्या सिमेंटच्या माळावर पर्यटकांची उडालेली झुंबड दिसली तेव्हा आपण जवळ पोहोचल्याची खात्री पटली. या आनंदातच आम्ही पटापट चढण्याचा प्रयत्न करीत होतो. पण पाय जपून टाकावा लागत होता. कारण एकतर उतार आणि वाट म्हणजे घसाराच. तोल गेला तर माणूस कुठे जाऊन पडेल सांगता यायचं नाही. शेवटचा पंधरा फुटांचा कातळ टप्पा चढून वर पोहोचलो तेव्हा महालावरील पर्यटकांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली. कुठून आलात? कसे आलात? तुम्ही चौघेच आणि या मुलीपण! त्यांच्या तोंडून कौतुक नुसतं ओसंडून वाहत होतं. आमच्या गळ्यात हार-तुरे पडायचेच बाकी होते.
मढीमहालवर पोहोचल्यावर मागे वळून पश्चिमेकडे लक्ष गेलं तेव्हा खरंच काही तरी मिळवल्याचा आनंद झाला. कोंकणातल्या ढवळे अन् कामथे या दोन नद्यांची खोरी ओलांडून, पुणे- रायगड- सातारा या तीनही जिल्ह्य़ांची सरहद्द पायगाडीने तुडवण्याची मजाच वेगळी आहे. येथून दिसणारा सह्य़ाद्रीचा हा पसारा, अप्रतिमच. खूप दिवसांनी असा तंगडतोड ट्रेक पायाखालून गेला होता, विशेष म्हणजे एका दिवसात आपण सह्य़ाद्रीची एवढी मोठी उंची (जवळपास पावणेचार हजार फूट) गाठून माथ्यावर पोहोचतो. त्यातही बहिरीच्या घुमटीजवळ मुक्काम घडला तर या ट्रेकसारखी मजा नाही.
संदीप वडस्कर – response.lokprabha@expressindia.com