एकीकडे मोबाइल-इंटरनेट या अत्याधुनिक साधनांचा वापर करायचा आणि दुसरीकडे एखाद्या बुवा-बाबाच्या भजनी लागायचे ही वृत्ती सर्वसामान्य माणसांनी सोडली पाहिजे. कारण विज्ञानाभिमुख दृष्टिकोन रुजवणे, टिकवणे ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे.

गेले वर्ष हे भारतीय वैज्ञानिकांच्या दृष्टीने अनेक अर्थानी महत्त्वाचे वर्ष होते. खूप वर्षांनंतर एका वैज्ञानिकाला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला, भारताचे मंगळयान यशस्वीरीत्या मंगळाभोवती घिरटय़ा घालू लागले आणि गेल्या १५ वर्षे विकसित होत असलेला क्रायोजेनिक इंजिन प्रकल्प पूर्णत्वास जाऊन त्याचा वापर केलेल्या जीएसएलव्ही मार्क-३चे उड्डाण यशस्वी झाले. या निमित्ताने सामान्य माणसांमध्ये विज्ञान व वैज्ञानिक यांच्यासंदर्भात कुतूहल नक्कीच चाळवले गेले आहे. मात्र विज्ञान म्हणजे काय, त्याचा आपल्याशी काय संबंध किंवा भारताच्या वैज्ञानिक जडणघडणीत आपला वाटा कोणता याबाबत सामान्य माणूस आजही अनभिज्ञ आहे.
विज्ञान म्हणजे कोणत्याही विषयशाखेचा मुळापासून किंवा कारणमीमांसेसह केलेला अभ्यास. मग त्यात भौतिक, रसायन किंवा जीवशास्त्रासारखी शास्त्रे येतात. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल यांसारखी सामाजिक शास्त्रे येतात आणि भाषाशास्त्र, मानववंशशास्त्रासारखे मानवाशी जवळचा संबंध असणारे विषयही येतात. एखाद्या शास्त्रास विज्ञान केव्हा म्हणावे यासाठी काही कसोटय़ा सर्वमान्य आहेत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे स्पष्टीकरण त्या विज्ञानास देता आले पाहिजे. त्याचबरोबर त्या घटनांची कारणमीमांसाही समजावून सांगता आली पाहिजे. मात्र हेही पुरेसे नाही. एखादा नवीन सिद्धांत मांडताना या सिद्धांतानुसार कोणता प्रयोग केल्यास, काय निकाल मिळेल हेदेखील आधीच सांगता आले पाहिजे. या शेवटच्या निकषास falsifiabilty असे म्हणतात. म्हणजेच जर नवीन सिद्धांताने केलेले हे भाकीत चुकले तर आपला सिद्धांत चुकीचा आहे हे मान्य करण्याची तयारी वैज्ञानिकांची असते. एखादी विषय शाखा हे निकष मान्य करत नसेल तर तिला शास्त्र म्हणता येत नाही.

14
आज विज्ञानाचा वापर आपल्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात होत असतो. आपली वाहतुकीची साधने, फोन, संगणक, टी.व्ही., आपली घरे, घरातील उपकरणे, आपले कपडे या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे. आपल्याला अतिशय सोप्या वाटणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ तवा, बैलगाडी, पंखा यातूनही अनेक वैज्ञानिक तत्त्वे डोकावत असतात. याच अंकात प्रा. हेमचंद्र प्रधानांनी विज्ञानाचे हे अनेकविध उपयोग उलगडून दाखवले आहेत. मात्र विज्ञानाचा अभ्यास हा फक्त नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीपुरताच असतो का? प्रख्यात गिर्यारोहक जॉर्ज   15मॅलरी याला एकदा असा प्रश्न विचारला गेला की, विविध खंडातील उंच शिखरे सर करावीत असे तुला का वाटले? मॅलरीने एका वाक्यात उत्तर दिले, ‘‘ती तिथे आहेत म्हणून!’’ तसेच विज्ञानाचा अभ्यास हा निसर्गाचे रहस्य आपल्याला कळावे या ज्ञानपिपासू वृत्तीतून करावा लागतो. आपली म्हणजेच मानव जातीची किंवा त्याहूनही मागे जात पृथ्वीची किंवा विश्वाची निर्मिती कशा परिस्थितीत झाली या अभ्यासाने भले आजच्या तंत्रज्ञानात भर पडत नसेल मात्र मानवाच्या ज्ञानासाठय़ाच्या दृष्टीने या प्रश्नांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
या पाश्र्वभूमीवर विचार करता, भारतात अशी परिस्थिती दिसते की, भारतीय वैज्ञानिक आणि जनसामान्य यांमध्ये एक अदृश्य पडदा आहे. वैज्ञानिक काय करतात हे सामान्यांना माहिती नसते आणि सामान्यांच्या जिज्ञासेची पूर्ती करावी असे वैज्ञानिकांस वाटत नाही. अनेक प्रगत देशांमध्ये वैज्ञानिक संस्था आपले दरवाजे सामान्य करदात्यांसाठी नेहमी उघडे ठेवतात. एखादा वैज्ञानिक प्रश्न घेऊन साध्यातला साधा माणूसही एखाद्या शास्त्रज्ञाची भेट घेऊ शकतो. ज्या करदात्यांच्या पैशावर वैज्ञानिक संस्था चालतात त्या करदात्यांना आपल्या कामाची माहिती देणे हे वैज्ञानिकांना त्यांचे उत्तरदायित्व वाटते. अनेक प्रतितयश वैज्ञानिक आपल्या संशोधनाच्या बरोबरीने विद्यापीठात जाऊन शिकवतात किंवा लोकांसाठी सोप्या भाषेतील व्याख्याने देतात. ज्या प्रमाणात हे सारे प्रगत देशात होते त्या प्रमाणात भारतात होत नाही. कदाचित अनेक भारतीय वैज्ञानिक हे उत्तम संशोधक असले तरी शिकवण्याच्या अनुभवात मागे पडतात. काही दिवसांपूर्वी नवीन सरकारने प्रत्येक वैज्ञानिकास वर्षांला किमान २० तास शिकवण्याचा आदेश दिला. मात्र याचा उलटाच परिणाम होण्याचा धोका आहे कारण अनेक वैज्ञानिकांचा विद्यार्थ्यांशी वा सामान्यांशी संपर्क नसल्याने आपले व्याख्यान कशा पद्धतीने दिल्यास ते रंजक होईल याची त्यांना कल्पनाच नाही. अर्थात भारतातील सर्वच वैज्ञानिक या गटात मोडत नाहीत. अनेक वैज्ञानिक विज्ञान लोकांपर्यंत नेण्यासाठी मोलाचे कार्य करत आहेत; परंतु ते अल्पमतात आहेत.
16भारतातील वैज्ञानिक संस्थांचे व्यवस्थापन व सरकारची धोरणे हीदेखील या परिस्थितीस कारणीभूत आहेत. वैज्ञानिकांनी लोकांसाठी व्याख्यान देणे, वा वृत्तपत्रात लेखन करणे याकडे फावल्या वेळेचा उद्योग या दृष्टीने पाहिले जाते. वैज्ञानिकाच्या करिअरमध्ये किंवा त्याच्या बढतीमध्ये अशा कामांना महत्त्व दिले जात नाही. त्यामुळेच बहुतांश वैज्ञानिक हे संशोधन सोडून इतर सर्व कामे दुय्यम मानतात. परदेशात अनेक संस्थांमध्ये विज्ञान संचार अधिकारी नेमलेले असतात. त्यांचे काम केवळ त्या त्या संस्थेमधले संशोधन सामान्यांपर्यंत पोहचविणे हे असते. काही-काही संशोधकांचे गट आपल्या संशोधनावर आधारित चित्रे वा व्हिडीओ बनवण्यासाठी खास वेळ राखून ठेवतात. गेल्या काही वर्षांत पुण्याची आयुका किंवा मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान संस्था इथे या दृष्टीने विचार सुरू झाला आहे. पण बहुतांश संस्थांमध्ये याबाबत उदासीनताच आहे.
विज्ञान संशोधनाच्या बरोबरच विज्ञान शिक्षण हे देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलते. शाळेत शिकलेले विज्ञान आणि आपल्या आजूबाजूचे जग या दोन सर्वथा वेगळ्या गोष्टी आहेत असा आपल्या विद्यार्थ्यांचा ठाम समज असतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे. मूलभूत वैज्ञानिक तत्त्वे शिकवण्याबरोबरच परिसर अभ्यासातून त्या तत्त्वांची आपल्या जगण्याशी सांगड घालून दिल्यास मुलांना विज्ञानात रस तर वाटेलच आणि त्याबरोबरीने त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनही वाढीस लागेल. याच विचाराने आमच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने गेल्या दहा वर्षांपासून होमी भाभा अभ्यासक्रमाचा विकास सुरू केला. या अभ्यासक्रमाची पाठय़पुस्तके आज आदर्श पुस्तके म्हणून अनेक पाठय़पुस्तक मंडळे वापरतात. मात्र प्रत्यक्ष वापरात या कल्पनेचे भ्रष्टीकरण झालेले आपल्याला दिसून येते. ‘प्रकल्पातून शिक्षण’ ही संकल्पना दहा वर्षांपूर्वी याच उद्देशातून आणली गेली होती. पण आज शाळेतील प्रकल्प हे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिघांनाही डोकेदुखी वाटते. दुकानांमधून तयार प्रकल्प विकत घेणे किंवा आई-वडिलांनी रात्रभर जागून रंगीबेरंगी चार्ट बनवणे किंवा इंटरनेटवरून पानेच्या पाने प्रिंट करणे म्हणजेच प्रकल्प असा समज रूढ होत आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर पानांचे प्रकार या विषयावरील प्रकल्प प्रत्येक विद्यार्थ्यांने एकेका झाडाचे एकेक पान आणणे आणि त्याविषयी दोन वाक्ये वर्गासमोर बोलणे असाही असू शकतो पण, बाजारातून विविध प्रकारच्या पानांची चित्रे विकत घेणे आणि ती रंगीत कागदावर चिकटवून वर्गात पोहचवणे यालाच आज प्रकल्प म्हटले जाते. यातून दूर जात आनंददायी विज्ञान शिक्षणाकडे आपण वाटचाल केली, तर विद्यार्थ्यांची विज्ञानातील रुची वाढवण्यास नक्कीच मदत होईल.
शाळेबाहेरील विज्ञान शिक्षणामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. अवैज्ञानिक गोष्टींना थारा न देता विज्ञानाशी संबंधित बातम्या अथवा लेख लोकांपर्यंत पोहचवणे यात आपली प्रसारमाध्यमे मागे पडतात. अनेक टी.व्ही.वाहिन्या आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी उडत्या तबकडय़ा, परग्रहावरील जीव, तीन डोक्यांची गाय इत्यादी फुटकळ अफवांवर तासनतास चर्वितचर्वण करत असतात. मात्र राष्ट्रीय विज्ञान दिवस किंवा राष्ट्रीय गणित दिवस किंवा विज्ञानाधारित कार्यक्रम यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. प्रसारमाध्यमातून मिळणारे भविष्यकथन किंवा बुवाबाजीस उत्तेजन हा वेगळाच विषय आहे. भारताची वैज्ञानिक शास्त्राची प्रगती लोकांपर्यंत नेणे ही जशी वैज्ञानिक संस्थांची जबाबदारी आहे तशीच ती प्रसारमाध्यमांचीही जबाबदारी आहे. योग्य माहितीच्या अभावी सामान्य माणसे अफवांवर विसंबून राहू लागली तर तो दोष पूर्णत: त्यांचा म्हणता येणार नाही.

आज शाळेतील प्रकल्प हे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिघांनाही डोकेदुखी वाटते. तयार प्रकल्प विकत घेणे किंवा आई-वडिलांनी रंगीबेरंगी चार्ट बनवणे किंवा इंटरनेटवरून  प्रिंट करणे म्हणजेच प्रकल्प असा समज रूढ होत आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाची जबाबदारी ही सामान्य माणसांवर नक्कीच आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ‘५१-अ’ मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. त्यातील ‘ह’ उपकलम भारतीय नागरिकांस वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करण्याचे आवाहन करते. आपण भारतीय असण्याचा अभिमान पदोपदी व्यक्त करणारी नवी पिढी या मूलभूत कर्तव्याचे पालन मात्र करताना दिसत नाही. आज ई-मेल किंवा व्हॉटस्अ‍ॅप वर अनेक चित्रविचित्र अफवा प्रसृत होत असतात. मग त्यात मानवाच्या शरीरातील चुंबकीय क्षेत्रापासून ते ठरावीक दिवशी सूर्य विझण्यापासून ते चुकीच्या वैद्यकीय सल्ल्यांचा समावेश असतो. यातील बहुतांशी संदेश इतके मूर्खपणाचे असतात की आपण शाळेत शिकलेल्या विज्ञानाच्या आधारावरच त्यातील फोलपणा समजून घेऊ शकतो. मात्र इतका सोपा विचारही करण्याची इच्छा नवीन पिढीची नाही. उद्या जर कोणी येऊन त्यांना सांगितले की, शनीवर पनीरचे डोंगर आहेत तर तो संदेशही ते पन्नास लोकांना फॉरवर्ड करतील. जशी सांपत्तिक स्थिती समृद्ध होत जाते तशी लोकांची विचार करायची शक्ती कमी होत जाते की काय, अशी शंका यावी असे उच्चमध्यमवर्गीयांचे वर्तन असते. भविष्य कथनावर विश्वास ठेवणे, बाबा/बुवा/ बापूंच्या नादी लागणे, परीक्षेआधी अभ्यासात वेळ न घालवता तासन् तास मंदिरांच्या रांगेत वाया घालवणे यात हेच लोक पुढे असतात. आचार्य अत्रेंनी ‘बुवा तिथे बाया’ हे नाटक लिहिले त्याला आज पंचाहत्तर वर्षे होऊन गेली, पण त्या नाटकात वर्णन केलेल्या घटना आजही तशाच चालू आहेत. प्रत्येक बाबा उघडा पडल्यावर बाकी बाबांचे भक्त त्यातून काही न शिकता ‘आमचा बाबा नाही तसा!’ असा सोयिस्कर युक्तिवाद करून डोळ्यावर कातडे ओढून स्वस्थ बसतात. जगातील सामाजिक क्रांत्यांचा इतिहास पाहता असे दिसते की, क्रांती जरी ‘नाही रे’ वर्गाकडून होत असली तरी नवसमाजाची वैचारिक बैठक घालून देण्याचे काम हा सुशिक्षित मध्यमवर्ग करत असतो. आज भारतात मध्यमवर्गच अवैज्ञानिक गोष्टींच्या आहारी गेल्यास भारतातील परिस्थितीचा कायापालट होण्याची अपेक्षा कशी ठेवणार?
आपले नवीन सरकार, त्यातील मंत्री व त्यांचे अनुयायी तर भारतातील वैज्ञानिक दृष्टिकोन कसा खच्ची होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जगातील सर्व तंत्रज्ञान आमच्या प्राचीन ग्रंथात होते हे दाखवण्याच्या अट्टहासात हास्यास्पद दावे करून भारतीय प्राचीन ज्ञानाचे आपण अवमूल्यन करत आहोत याचेही त्यांना भान नाही. वेदांमध्ये खरोखर विमाने असती, तर विमानांच्या रचनेबरोबरच आपल्याला इंधनाचे रसायनशास्त्र किंवा बरनॉलीचे सूत्र अशा गोष्टीही त्या गं्रथात आढळायला हव्यात. यातील काहीच माहीत नसताना आपल्या पूर्वजांनी विमाननिर्मिती मात्र केली, असे म्हणणे सयुक्तिक होत नाही. भविष्यकथन हे शास्त्राच्या कसोटीवर उतरत नाही, राशी आणि ग्रह या कल्पना मुळात भारतीय नाहीत आणि ‘वैदिक गणित’ हे गणित नसून फक्त शंभर वर्षांपूर्वी एका धर्मगुरूने तयार केलेली सोप्या आकडेमोडीची काही सूत्रे आहेत. तरीदेखील आपले सरकार फलज्योतिष्य आणि वैदिक गणित विद्यापीठात विषयशाखा म्हणून आणू पाहत आहे आणि त्यास विरोध करण्याऐवजी सुशिक्षित समाज अशा महत्त्वाच्या मुद्दय़ाबाबत पूर्णत: उदासीन आहे. हेच भारताचे दुर्दैव आहे. नजीकच्या भविष्यात हे चित्र पालटेल ही अपेक्षा!