अभिजीत ताम्हणे

भावनांचा सच्चेपणा शाबूत ठेवून जर आपल्या नेहमीच्या चर्चेत नसलेल्या विषयांनाही आपल्या अनुभवविश्वात स्थान दिलं तर त्यातून घडणारा विचार हा पुरोगामीच ठरेल. या अर्थानं इस्तंबूलची यंदाची बिएनाले हे एक पुरोगामी विधान आहे.

इस्तंबूल शहर हे संस्कृतीसंगमाचा इतिहास सांगणारं. कधीकाळी या कॉन्स्टॅटिनोपल नामक नगरावर तुर्कानी कब्जा केला. त्यामुळे पाश्चात्त्यांचा आशियातील देशांमध्ये येण्याचा रस्ता बंद झाला आणि म्हणून सुवेझ कालव्याची कल्पना सुचू शकली असा इतिहास बहुतेक जण शाळेत शिकले असतील. केमाल अतातुर्क यांच्या द्रष्टय़ा राजवटीत पूर्णत: आधुनिकतावादी झालेलं हे शहर आता त्याच आधुनिकतावादातल्या मोकळेपणाला मूठमाती देणार की काय, अशी शंका तुर्कस्तानातल्या एर्दोगन राजवटीमुळे प्रस्तुत लेखकासह अनेकांना येत असेल, यायला हवी. असं वातावरण असताना आज हे इस्तंबूल पुन्हा एका पुरोगामी विधानाचं केंद्रस्थान बनलं आहे.

इस्तंबूल बिएनाले हे ते पुरोगामी विधान. म्हटलं तर बिगरराजकीय. जगात ज्या २०० शहरांमध्ये बिएनाले (म्हणजे दर दोन वर्षांनीच होणारी दृश्यकलेची महाप्रदर्शनं) भरवली जातात, तिथं प्रत्येक खेपेला एक गुंफणकार किंवा नियोजक (क्युरेटर) असतोच. ती किंवा तो गुंफणकार आपापले राजकीय विचार या प्रदर्शनांची गुंफण करताना प्रेक्षकांपुढे मांडत असतात. कारण बिएनाले ही कलेतून जगाचा विचार पुढे नेण्याची एक महत्त्वाची संधी असते. यंदा इस्तंबूलच्या बिएनालेत क्युरेटर आहेत निकोलस बुरिओ. (हे फ्रेंच असल्यानं आडनावाचा उच्चार स्पेलिंगबरहुकूम करू गेल्यास ‘बौरिऑड’ असा होईल. पण फ्रेंचमंदी स्पेलिंगापर्मानं उत्चार करायचं आसं कुटं आसतं व्हय!) तर या बुरिओ यांनी जगभरातून इथं आलेल्या पत्रकार व कलासमीक्षकांपुढे त्यांचा या बिएनालेमागचा विचार बोलून दाखवला. त्याआधी त्यांनी एका फिल्मचा तुकडा दाखवला. ही होती जर्मन चित्रपटकार वॉर्नर हरझॉगची ‘फिट्झ्कराल्डो’ची फिल्म. या फिल्ममध्ये एक मोठं जहाज अ‍ॅमेझॉनच्या जंगलामधून मोठा रस्ता काढत,  दगड-मातीतून पुढे चालते आहे, असा तो तुकडा होता. या १९८२ सालच्या फिल्ममुळे ब्राझीलमध्ये बराच संताप झाला होता तेव्हाच्या उच्चपदस्थांचा. अ‍ॅमेझॉन खोऱ्याच्या विकासाचं विकृत चित्रण करणारा युरोपीय दीडशहाणा अशी हरझॉग यांची ब्राझीलमध्ये बदनामी करण्यात आली. तेव्हा हरझॉग म्हणाले होते की, ‘माझे हे विधान आहे. ते आज काही जणांना खोटं वाटतंय. पण तीस वर्षांनी माझं हे विधान खरं होतं हे लक्षात येईल!’ एवढं सांगून बुरिओ म्हणाले : अ‍ॅमेझॉनची आज काय अवस्था आहे आपण सारे पाहतोच आहोत. हरझॉग एकटे नाहीत. चित्रकार किंवा कोणत्याही प्रकारचा कलावंत हा जगाच्या पुढला विचार करत असतो. तसा तो अनेक कलावंत करताहेत. त्यापैकी काहींच्या कलाकृती तुम्हाला इथं दिसतील. यंदाच्या इस्तंबूल बिएनालेची मध्यवर्ती कल्पना आहे : सेव्हन्थ कॉन्टिनेंट- सातवा खंड. पॅसिफिक महासागरातल्या प्लास्टिक कचऱ्याची लांबी-रुंदी आणि घनाकार आता जगातल्या एखाद्या खंडाएवढाच झालेला आहे, हे तर तुम्हाला माहीत आहेच. त्यामागचं खरं कारण एवढंच, की आपण जितक्या गांभीर्यानं पर्यावरणाचा विचार करायला हवा तितका करत नाही. इस्तंबूल बिएनालेसाठी निवडलेले यंदाचे दृश्यकलावंत त्या विचाराचं खरं गांभीर्य ओळखताहेत आणि सृजनशीलपणे ते असा प्रयत्न करताहेत की हे गांभीर्य लोकांनीही ओळखावं. जग जिंकण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा, उत्पादन आणि भक्षण यांचा वाढलेला वेग, मानवकेंद्री वृत्तीचं आताशा स्वकेंद्री वृत्तीत झालेलं रूपांतर अशी त्यामागची कारणं ओळखून हे नवसर्जन सुरू आहे. आणि त्यात विचारांचा भाग अर्थातच मोठा आहे. हा विचार मानवकेंद्री नाही; पण म्हणून तो  केवळ निसर्गकेंद्रीच आहे असंही नाही. या दुविधेच्या पुढला विचार आजचे कलावंत करताहेत. त्या विचाराला आपण ‘मॉलेक्युलर अँथ्रोपॉलॉजी’ म्हणू. मराठीत- ‘रेण्वीय मानववंशशास्त्र.’ पिढय़ान् पिढय़ांचं आदिम काळापासूनचं मानवी जगणं बदलतंय. त्यामागे कोणते संकल्पनात्मक रेणू आहेत, हे शोधून काढणारा आणि त्याहीपुढे या संकल्पनात्मक प्रक्रिया बदलू पाहणारा हा विचार आहे.

एवढं सांगून निकोलस बुरिओ थांबले. त्यांनी सांगितलेला हा विचार नवा नाही. रेण्वीय मानववंशशास्त्र अशी विद्याशाखा आहेच. पण संकल्पनांच्या पातळीवर हा विचार आणू पाहणं हे पुरोगामी आहे. पण मग पुरोगामी विचार आणि ते अंगिकारणाऱ्यांचं (म्हणजे मराठीत ‘पुरोगाम्यांचं’) प्रत्यक्ष वागणं यांमधलं अंतर दाखवून देऊन पुरोगामी लोक कसे चांगले नसतात, कसे अप्रामाणिक असतात.. म्हणजेच त्यांनी मांडलेले किंवा त्यांना पटत असलेले विचारसुद्धा नक्कीच वाईट असणार- असं जे ठसवण्याची खटपट जगात चालू असते, तो न्याय इथं लावला तर..?

तर दोन प्रश्न मुद्दाम उकरून काढावे लागतील. एक : या बिएनालेमागचा विचार पर्यावरणवादी म्हणता येतो. पण इथल्या कलाकृतींमधून तो दिसतो का? दुसरा प्रश्न : ही बिएनाले एवढा मानवी संबंधांचा आणि संकल्पनांचा वगैरे विचार करतेय. पण खरं तर हे महाप्रदर्शन फक्त पैसेवाल्या, इंग्लिशमध्येच बोलणाऱ्या हायफाय लोकांसाठीच असणार की काय?

या दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भरपूर वेळ घालवावा लागला. इस्तंबूल बिएनालेत यंदा ५६ दृश्यकलावंतांच्या कलाकृती आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांनी मोठमोठय़ा खोल्या भरून कलाकृती मांडल्या आहेत. त्या पाहाव्याच लागतात, नाहीतर उत्तर चुकीचं ठरेल. काही कलाकृती व्हिडिओ स्वरूपात असल्यानं अर्धा तास किंवा दीड ताससुद्धा घालवावा लागतो. ते सारं केलं. कलाकृती पाहिल्या. नीट पाहिल्या. त्यातून दोन्ही प्रश्नांची उत्तरं उमगली. इथल्या कलाकृतींमधून जो पर्यावरणवादी विचार दिसतो, तो पर्यावरणाइतकाच मानवी इतिहास, मानवी वृत्ती याबद्दलचा आहे. आणि मुख्य म्हणजे माणसाची स्व-कल्पना बदलू पाहणारा हा विचार आहे. म्हणजे काय, हे नंतर सांगेनच. पण आधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर : इस्तंबूल बिएनालेचा एकंदर माहौल अजिबात इंग्रजीप्रचुर नाही. प्रत्येक पाटी तुर्की भाषेत आहेच; पण प्रत्येक व्हिडीओ कलाकृतीचे उच्चारित शब्दानुवाद किंवा तळभाषिकं (इंग्रजी शब्द : सबटायटल्स) तुर्की भाषेत आहेत! कोणाही स्थानिक रहिवाशाला कलाकृती समजून घेण्यासाठी पुरेशी साधनं उपलब्ध आहेत.

ही अनुभवांती उमगलेली, पण थोडक्यात दिलेली उत्तरं वाचून या उत्तरांच्या खरे-खोटेपणाबद्दलही जर कुणाला प्रश्न पडले असतील तर अनुभवांची जंत्री देणं, काही उदाहरणं देणं आवश्यक आहे. ‘फेरल अ‍ॅटलास कलेक्टिव्ह’ नावाचा १०० हून अधिक वैज्ञानिक, कलावंत आणि अभ्यासकांचा एक समूह इथं सहभागी आहे. त्यापैकी एका कलाकृतीत बंगाल आणि आसामच्या रेल्वेचा ब्रिटिशकालीन नकाशा दिसतो. वसाहतवाद हा पर्यावरणऱ्हासाला चालना देणारा प्रमुख घटक असल्याचा इतिहास उगाळण्यावर न थांबता आजच्या विकासामागची वृत्तीसुद्धा अखेर  वसाहतवादीच ठरते, हे कडू सत्य सांगणाऱ्या अनेक कलाकृती इथं आहेत. इस्तंबूलमध्येच राहणाऱ्या एल्नास डेनिझ या दृश्यकलावतीनं या शहराच्या वस्तीवाढीपूर्वीचा उठावनकाशा (टोपोग्राफिक मॅप) मांडला आहे. तस्किम चौक हा इस्तंबूलचा पर्यटकप्रिय भाग. इथपर्यंत एकेकाळी नद्या वाहत होत्या. आजचे अनेक रस्ते या मूळच्या नद्या आहेत, हे तिनं दाखवून दिलं आहे. क्रोएशियात जन्मलेल्या, पण आता न्यूयॉर्कवासी असलेल्या डोरा बुदोर हिनं इस्तंबूलच्या मोठ्ठय़ा बॉस्फोरस खाडीपाशीच जी काही तथाकथित विकासकामं आत्ता सुरू आहेत, त्या कामांमुळे होणारे आवाज प्रदर्शनस्थळापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून, या आवाजांमुळे किती क्षमतेचे स्फोट घडू शकतात, हे कलात्मकरीत्या दाखवलं आहे. प्रेक्षकांना आवाज नाही येत; पण काचेचे मोठमोठे पेटारे दिसतात आणि त्यात रंगीत पावडर दिसते. हे सारे रंग जे. एम. डब्ल्यू. टर्नर (१७७५-१८५१) या लंडनमधल्या आगीसह तेव्हाच्या परिस्थितीतल्या घडामोडींची चित्रं रंगवणाऱ्या चित्रकाराच्या चित्रांमधल्या छटांचेच आहेत, हे सांगायला ती विसरली नाही. तर या काचपेटाऱ्यांमध्ये पसरलेली रंगपूड पलीकडल्या तथाकथित विकासकामांच्या घरघराटानं, त्या आवाजाच्या कमी-जास्त कंपनांनुसार हलू लागते. मधूनच एखाद्या रंगाची पूड जोरानं उसळते. ‘स्फोट’ हा शब्द अपुरा पडेल इतक्या जोरानं. ज्वालामुखीसारखी. ती विशिष्ट पूड इतकी पसरते, की मिनिटभरात त्या काचपेटाऱ्यातलं काहीही दिसेनासं होतं. मग अगदी हळूहळू ते काचबंद पेटाऱ्यातलं वातावरण निवळतं. आपण आवाज ऐकलेला नसतो. पण त्याचं राक्षसी बळ काचेच्या पेटाऱ्यामधून आपल्याला दिसलेलं असतं. मॅक्स श्नायडर हा तिशीतला तरुण दृश्यकलावंत. त्यानं नेहमीच्या, नैसर्गिक गोल गरगरीत किलगडासह काही चौकोनी आकाराची किलगडंही मांडली आहेत- कलाकृती म्हणून. खाण्याच्या किलगडाचा हा आकार काही जनुकीय बदल करून, निसर्गाशी खिलवाड करून मगच मिळतो. पण तसं करायचं  कशाला? तर- पॅकेजिंगसाठी चौकोनी आकार बरा पडतो म्हणून! हे पाहून ज्यांना फळफळावळ पाहून देवाची करणी आठवते, त्यांच्या अंगावर शहारेच येतील. हासुद्धा विकासाच्या, पुढे जाण्याच्या नावाखाली घडवलेला निसर्गसंहारच आहे एक प्रकारचा.

पुरोगामी असणं म्हणजे हे असल्या विचित्र, अनैसर्गिक, संहारक प्रकारांनी डोळ्यांत धूळफेक करून नुसतं पुढे पुढे जाणं नव्हे. हे असलं पुढे जाणं थांबवलं पाहिजे, इतपत भावना या कलाकृती पाहून आपल्या अनुभवाचा भाग बनलेली असते.

अर्न्‍स्ट हॅकेल (१८३८-१९१९) या जीवशास्त्र अभ्यासकानं त्या काळात अनेक जीवशास्त्रीय घटकांच्या आकृती काढल्या. त्याही यंदाच्या इस्तंबूल बिएनालेत मुद्दामहून कलाकृती म्हणून मांडल्या आहेत. तिथं किलगडांच्या आकाराशी हल्ली चाललेलं खिलवाड आणि मॅक्स श्नायडरनं धीटपणे कलाविषयक चर्चाविश्वात आणलेला चौकोनी किलगड पुन्हा आठवतो! मूळचा थायलंडचा कोराक्रित अरुणानंदोनचाइ याची एक व्हिडीओ कलाकृती आहे. ‘अखेर प्रजाती म्हणजे तरी काय?’ असा प्रश्न विचारून ही चित्रफीत प्रजातिभेद मिटवू पाहते. प्राणी आणि मानव यांचं एकत्रीकरण ही इथल्या इतरही अनेक कलाकृतींची मध्यवर्ती कल्पना आहे. आणि त्यादेखील माणसाचा अहंकार कमी करू पाहतात.

या द्वैवार्षकिीला जोडूनच ‘सीआय’ म्हणजेच ‘कन्टेम्पररी इस्तंबूल’ नावाचा कलाव्यापार मेळाही १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान इथं भरला होता. जिथं कलादालनं आपापले ठेले मांडून गिऱ्हाईक गटवतात अशी जागा- इतकंच धंदेवाईक स्वरूप कलाव्यापार मेळ्याला येऊ नये अशी काळजी नेहमीच आणि जगातल्या कुठल्याही कलामेळ्याच्या आयोजनात घेतली जातेच; पण त्या व्यापार मेळ्यांपेक्षा इस्तंबूल बिएनाले निराळी आहे. पर्यावरणवादी मध्यवर्ती कल्पना निवडून प्रचारचित्रांऐवजी कलात्म अनुभवातून भावनिक आवाहनामार्फत पुन्हा विचारशीलतेकडे नेण्याचा प्रयत्न त्यात आहे.

भावनांचा सच्चेपणा शाबूत ठेवून जर आपल्या नेहमीच्या चर्चेत नसलेल्या विषयांनाही आपल्या अनुभवविश्वात स्थान दिलं तर त्यातून घडणारा विचार हा पुरोगामीच ठरेल. त्या अर्थानंदेखील इस्तंबूलची यंदाची बिएनाले हे एक पुरोगामी  विधान आहे.

abhijeet.tamhane@expressindia.com