श्याम पाखरे
काही दिवसांपूर्वी ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाधारित लेखामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळाच्या सुरुवातीलाच फेडरल प्रशासकीय व्यवहारातून जाणीवपूर्वक अदृश्य होऊ घातलेल्या दोनशेच्या वर शब्दांची लांबलचक यादी देण्यात आली होती. ती यादी केवळ प्राथमिक सर्वेक्षणावर आधारित आहे, त्यामुळे गाळण्यात येणाऱ्या शब्दांची संख्या वास्तवात यापेक्षा फार मोठी असू शकते. हे शब्द मुख्यत: सामाजिक आणि वांशिक न्यायाशी संबंधित आहेत. उदा. Activism, activists, advocacy, affirming care, all- inclusive, anti- racist, bias, barriers, clean energy, climate crisis, community diversity, disparity, discrimination, equality, gender identity, gender diversity, identity, injustice, inequality, immigrants, inclusive, indigenous community, intersectional, LGBTQ, marginalized, multicultural, race, racial diversity, racial ethnicity, sex, sexual preferences, socioeconomic, sociocultural, social justice, transgender, transsexual, tribal, vulnerable populations, women underrepresented. फेडरल शासन आणि शासकीय तसेच अशासकीय एजन्सीजच्या वेबसाइट्समधील मजकुरातून हे शब्द गाळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच शासननिर्णयासंबंधी कागदपत्रांमध्ये या शब्दांचा समावेश करताना काळजी घेण्याची सूचना उच्चस्तरावरून देण्यात आली आहे. शालेय अभ्यासक्रमामध्येदेखील ते टाळावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांचे प्रतिबिंब शासकीय स्तरावरील या शब्दांच्या अदृश्यतेवर पडलेले दिसते. ट्रम्प यांची मनोवृत्ती आणि चरित्र काय आहे, याची पूर्ण कल्पना असतानादेखील अमेरिकन जनतेने त्यांना अध्यक्षपदी पुन्हा निवडून दिले. त्यावरून तेथील बहुसंख्य लोकांनादेखील शब्दांच्या या हत्येला मूक संमती असावी का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे अमेरिकन जनमानसाची आजची स्थिती लक्षात येते.
भारताच्या संदर्भातदेखील वरील प्रकारचे संशोधन व्हायला हवे. आपण येथे भारताच्या संदर्भात गहाळ झालेल्या मूल्यात्मक शब्दांवर लक्ष केंद्रित करू या. गेल्या दहा वर्षांचा विचार केला तर काही शब्द गहाळ झाले आहेत, तर काही शब्द अस्तित्वात असूनही आपला अर्थ गमावून बसले आहेत. किंवा समाजासाठी अर्थहीन झाले आहेत. अशा शब्दांचा शोध घेण्यास सुरुवात केली तर प्राथमिकदृष्ट्या पुढील यादी तयार होते. आणखी खोलात जाऊन विचार केला तर ही यादी बरीच मोठी होऊ शकते- अध्यात्मिकता, अहिंसा, आत्मसन्मान, आत्मचिंतन, आत्मचैतन्य, आत्मनिर्भरता, अनाक्रमकता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, अक्रोध, आदर, औदार्य, दिलदारपणा, आत्मशुद्धी, औचित्य, आदर्शवाद, बांधिलकी, बुद्धिनिष्ठा, करुणा, कर्तव्यपरायणता, खिलाडूवृत्ती, दया, धर्मनिरपेक्षता, धार्मिक स्वातंत्र्य, धैर्य, वैज्ञानिकता, जागरूकता, विवेक, तर्कनिष्ठा, व्यासंग, नि:स्वार्थता, निर्भयता, निर्वैरता, नि:पक्षपातीपणा, नीतिमत्ता, नम्रता, न्याय, निष्ठा, निरागसता, त्याग, प्रेम, पावित्र्य, प्रामाणिकता, परोपकरिता, मानवता, मार्दवता, मैत्रीभाव, मोकळेपणा, ऋजुता, जबाबदारपणा, उत्कृष्टता, चारित्र्य, विनयशीलता, विविधता, स्पष्टता, स्वातंत्र्य, स्वराज्य, सहिष्णुता, संवेदना, सहवेदना, समजूतदारपणा, संयम, समानता, सजगता, सहनशीलता, सत्यनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, सम्यकता, समग्रता, सर्जनशीलता, संशोधकता, सभ्यता, सद्भाव, स्थितप्रज्ञता, सहजता, सहकार्य, समाधान, स्वाध्याय, सेवाभाव, साधेपणा, सर्वसमावेशकता, शालीनता, शांती, शुद्धता, शिष्टाचार आणि क्षमा. या शब्दांमध्ये काही वैयक्तिक, सामाजिक, नागरिक नीतिमूल्ये आणि सद्गुणांचा समावेश होतो.
एकंदरीतच नैतिक मूल्यांचा हा ऱ्हास अमेरिका किंवा भारतापर्यंत मर्यादित नसून जागतिक पातळीवर सर्वत्र होताना दिसतो. भारताच्या संदर्भात पुरोगामी पक्षांचा त्यांच्या नैतिक दिवाळखोरीमुळे झालेला ऱ्हास, विकृत स्वरूपातील जागतिकीकरणामुळे नातेसंबंध आणि सामाजिक संबंधांची उसवलेली वीण आणि माणसाला आलेली अगतिकता आणि स्वकेंद्रितता अशी काही कारणे सांगता येतील.
भारतीय इतिहासातील ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात वि. दा. सावरकरांनी मुसलमानांच्या हाती पराभूत होण्यास हिंदूंच्या सद्गुणांना कारणीभूत ठरवले. परोपकार, दया, अहिंसा, परधर्मसहिष्णुता, शरणागताला अभय देणे, शत्रूवर उपकार करणे, परस्त्री-अपहार न करणे, शत्रूस्त्री-दाक्षिण्य या सद्गुणांना त्यांनी ‘सद्गुण विकृती’ म्हटले आहे. एखादा गुण सद्गुण की दुर्गुण हे ठरविण्यासाठी ते त्यास देशकाळपात्र ही कसोटी लावतात. तसे करणे अगदी चुकीचेही नाही. परंतु राक्षसाला मारण्यासाठी प्रतिराक्षस व्हावे लागते, हा सावरकरांचा सिद्धांत. त्यास नैतिक मूल्य म्हणून स्वीकारणे शक्य आहे काय? आणि सावरकर काहीही म्हणाले तरी चिरंतन अशी नैतिक मूल्येही असतातच. भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सावरकरांना गुरुस्थानी मानतात. त्यामुळे हिंदूंमधील ‘सद्गुण विकृती’ दूर करण्याचा कार्यक्रम सर्वोच्च पातळीवरून पुरस्कृत केला जात आहे, असे दिसून येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सावरकरांचे विचार आणि त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधीही पूर्णत: पटला नाही. परंतु संघाची ही भूमिका म्हणजे ताकाला जाताना भांडे लपवण्यासारखी आहे. आजपर्यंतचा संघाचा इतिहास पाहिल्यास वरकरणी सुसंस्कृतपणाचा आव आणायचा आणि कृती मात्र त्याच्या अगदी विरुद्ध करायची, हे त्यांचे तंत्र लक्षात येते. संघाने गेली शंभर वर्षे समाजात हळूहळू जे पेरले आहे, तेदेखील वरील शब्द हरवत जाण्यास कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत आणि त्याची परिणती अंतत: कशात होऊ शकते, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही.
व्हिक्टर क्लेम्पेरर (१८८१-१९६०) हे एक जर्मन ज्यू होते. ते जर्मनीतील सॅक्सनी प्रांताची राजधानी ड्रेस्डेनमध्ये राहत. ते नाझी जर्मनीमध्ये छळछावणीत जाण्यापासून वाचले कारण त्यांची पत्नी ‘आर्यवंशीय’ जर्मन होती. तिने त्यांना कसेबसे वाचवले. १९३३ मध्ये हिटलर सत्तेवर येण्यापूर्वी क्लेम्पेरर ड्रेस्डेनमधील एका विद्यापीठात रोमान्स भाषांचे प्राध्यापक होते. (रोमान्स भाषा म्हणजे ऐतिहासिक काळात सामान्य माणसे बोलायची त्या असंस्कृत लॅटिन भाषेमधून निर्माण झालेल्या इंडो-युरोपियन भाषासमूहातील इटालिक भाषेचा एक उपसमूह.) त्यामुळे ते शब्दांचा वापर, त्यांचे बारकावे आणि शब्दांच्या विविध संदर्भातील अर्थांशी विशेषत: परिचित होते. हिटलरच्या पराभवानंतर काही वर्षांनी, क्लेम्पेररने द लँग्वेज ऑफ द थर्ड राईश (१९५७) नावाचे एक पुस्तक लिहिले. पुस्तकात क्लेम्पेरर यांनी असा युक्तिवाद केला आहे की, हिटलरच्या जर्मनीतील जवळजवळ प्रत्येकजण नाझी झाला होता – मग तो स्वत:ला नाझी मानत असो वा नसो. ते नाझी राजवटीला बळी पडलेल्या जर्मन ज्यूंचादेखील त्यात समावेश करतात. कारण त्या सर्वांनी त्यांच्या विचारांमध्ये आणि श्रद्धांमध्ये त्यांच्या नाझी सत्ताधीशांनी प्रसारित केलेल्या वंशवादी कल्पना आणि विचारसरणी कळत नकळत स्वीकारल्या होत्या. क्लेम्पेरर सुचवतात की, ती माणसे आपले वैयक्तिक स्वातंत्र्य गमावून बसली होती. ते त्या राजवटीचे गुलाम झाले होते, कारण ते हिटलरच्या नाझी पक्षाच्या शब्दकोश आणि तर्कशास्त्राच्या दृष्टीने विचार आणि कृती करू लागले होते.
क्लेम्पेरर लिहितात, ‘‘एकेक शब्द, वाक्प्रचार आणि वाक्यरचना लाखो पुनरावृत्तींद्वारे लोकांवर लादले गेल्यामुळे नाझीवाद जर्मन लोकांच्या शरीरात भिनला आणि यांत्रिक व अजाणतेपणे स्वीकारला गेला.’’
ते पुढे लिहितात, ‘‘भाषा माझ्यासाठी फक्त लिहिण्याचे आणि विचार करण्याचे काम करत नाही, तर ती माझ्या भावनांवर आणि माझ्या संपूर्ण आध्यात्मिक अस्तित्वावर नियंत्रण ठेवत असते आणि मी कोणतेही प्रश्न उपस्थित न करता आणि अजाणतेपणे स्वत:ला तिच्या स्वाधीन करत असतो… शब्द आर्सेनिकच्या लहान मात्रेसारखे असू शकतात; ते लक्ष न देता गिळले जातात, सुरुवातीला त्यांचा कोणताही परिणाम होत नाहीये असा भास होतो आणि नंतर काही काळाने त्याची विषारी प्रतिक्रिया निर्माण होते.’’
क्लेम्पेरर म्हणतात की, नाझींनी खूप नवीन शब्द निर्माण केले नाहीत. त्यांनी हेतुपूर्वक नियोजनबद्धपणे काही ठरावीक शब्द विकसित केले. परंतु त्यांनी धूर्तपणे जर्मन भाषेतील अनेक शब्दांचे अर्थ प्रचारतंत्राद्वारे आपल्या सोयीनुसार वाकवले. शब्दांच्या अनेक अर्थांना काट मारून त्यांना हवा तो एकच अर्थ रूढ केला. त्यांनी शब्द आणि भाषेची सर्जनशीलता संपवून टाकली. त्यांनी जे शब्द आणि भाषेसोबत केले तेच जर्मन नागरिकांसोबतदेखील केले. त्यांचे स्वतंत्र व्यक्तित्व संपवून टाकून राष्ट्राचा एक घटक इतकेच त्यांचे अस्तित्व ठेवले. जे नाझींनी केले तेच लेनिन, स्टॅलीन आणि बोल्शेव्हिक पक्षाने सोविएत रशियामध्ये केले. भारतातदेखील एक काळ असा होता जेव्हा डावे पक्ष आणि संघटना ‘बुर्ज्वा’ शब्दाचा उपयोग आपल्या विरोधकांसाठी शिवीसारखा करत.
आता गेल्या दहा वर्षांत हिंदुत्ववाद्यांनी कोणते नवीन शब्द रूढ केले किंवा जुन्याच शब्दांना नवीन धार चढवली ते पाहू या – हिंदुत्व, हिंदुराष्ट्र, लव्ह जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद, अर्बन नक्सल, देशद्रोही, औरंगझेबकी औलाद, खान मार्केट गँग, घुसखोर, बांग्लादेशी, रोहिंग्या, जय श्रीराम (सियाराम आता इतिहासजमा करण्यात आले आहे), रामराज्य, सनातन धर्म, बुलडोझर न्याय, गोरक्षक. विशेष म्हणजे यापैकी एकही शब्द प्रेम सौहार्द या भावना व्यक्त करत नाही. त्यातून केवळ द्वेष, तिरस्कार आणि शत्रुत्व व्यक्त होते. त्यामध्ये सत्य, शिव आणि सुंदर नाही. रामाचे नावदेखील रणभेरीसारखे उच्चारले जाते. गांधींनी सनातन धर्म, रामराज्य आणि इतर अनेक शब्दांना परंपरा आणि नवतेच्या संगमातून प्रवाही अर्थ दिला होता, तो खोडून त्याला पुन्हा मध्ययुगीन साज चढविण्यात आला आहे. येथेदेखील शब्दांच्या विविध छटा पुसून त्यांना एकरंगी करण्याचा प्रयत्न चालू आहे. शब्दांची तरलता संपवून त्यांच्यात काठिण्य आणले जात आहे. कारण शब्दाच्या अर्थाच्या विविध छटा अभिव्यक्तीला ‘सेन्सॉर’ करण्यामध्ये अडचणीच्या ठरतात. येथेही हे विषारी शब्द लोकांच्या मानसिकतेत झिरपत जाऊन त्यांच्या अंतर्मनाला व्यापून टाकत आहेत. सतत मुसलमानविरोधी प्रचारतंत्र राबवून मुसलमानांच्या मनात न्यूनगंड आणि अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे. शब्द, भाषा हे संवाद, संभाषण, आत्मचिंतन, प्रार्थना, विनवणी, आज्ञा किंवा आवाहन करण्याचे माध्यम बनू शकतात. ते तर्काची तसेच भावनेची देखील अभिव्यक्ती करू शकतात. परंतु हिंदुत्ववाद्यांचे शब्द, भाषा हे केवळ भावनिक आवाहन करणारे असतात. स्वत:च्या बुद्धीला, तर्काला तिलांजली देऊन, स्वत:चे व्यक्तित्व विसरून केवळ अंधभक्तीने आदेश पालन करण्याचे आवाहन करणारे.
आपल्या देशात निवडणुकीच्या काळात द्वेषपूर्ण शब्द, भाषणांना उधाण येते. २०२४ हे लोकसभा निवडणुकांचे वर्ष होते. ‘इंडिया हेट लॅब’ या वॉशिंग्टन स्थित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात २०२३ साली ६६८ द्वेषपूर्ण भाषणांच्या घटना घडल्या, तर २०२४ साली त्यात ७४.४ इतकी वाढ होऊन ११६५ घटना घडल्या. अशी भाषणे देण्यामध्ये भाजपचे नेते, तथाकथित धर्मगुरू, विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलशी संबंधित व्यक्ती आघाडीवर होत्या. फेसबुक, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब आणि एक्स या समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करून द्वेषाचे विष सर्वत्र पसरवले गेले.
आज वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या प्रत्येक आघाडीवर होत असलेले नैतिक अध:पतन सहज लक्षात येते. परंतु या प्रक्रियेत आपण आपले सांस्कृतिक संचित गमावून बसत आहोत. शब्दांना भूगोल असतो तसाच इतिहासही असतो. शब्द, त्यांचे अर्थ, त्यातून सूचित होणारी मूल्ये ही आपली ओळख असतात. आज आपण स्वत:ला ओळखू शकणार नाही, इतका आपला चेहरा विकृत झाला आहे. ‘पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’ या ऑस्कर वाईल्डच्या कादंबरीतील डोरियन ग्रेच्या भेसूर झालेल्या व्यक्तिचित्राप्रमाणे!
वर उल्लेख केलेली नैतिक मूल्ये ही एकमेकांशी जोडलेली आहेत. ती जगातील सर्व धर्म आणि संस्कृतींमध्ये अभिव्यक्त झालेली आहेत. त्यांच्यातील काही निवडायची आणि काही वगळायची असे आपण करू शकत नाही. उदा., आता सावरकरांनी ज्या सद्गुणांना विकृती समजले त्यांची वजाबाकी केली तर त्यांना प्रिय असलेल्या विज्ञानवाद आणि तर्कवादाचादेखील बळी जातो. सत्ताधाऱ्यांच्या प्रचारतंत्राला बळी पडून आपण आपला नैतिक आणि सांस्कृतिक वारसा गमावू शकत नाही. याबाबतीत आज प्रत्येक व्यक्तीला फार गांभीर्याने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. ‘भाषा ही आपले विचार लपवण्याचे माध्यम असते’ हे फ्रेंच मुत्सद्दी टॅलेरँडचे प्रसिद्ध वाक्य आहे. परंतु क्लेम्पेरर या विधानाशी सहमत नव्हते. त्यांच्या मते, लोक स्वत:पासून किंवा इतरांपासून जे काही लपवण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्या शब्दांमधून नकळत व्यक्त होतेच. त्यामुळे आपल्यावर लादल्या जाणाऱ्या शब्दांवर, आपल्या संग्रहातून गाळल्या जाणाऱ्या शब्दांवर जागृत राहून चौकसपणे लक्ष ठेवणे आणि त्यामागचा अजेंडा समजून घेणे आवश्यक आहे.
(लेखक इतिहास विषयाचे अभ्यासक आहेत.)
shyam.pakhare111@google.com