राजकारणातील चाणक्य, जनता पक्षाचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या नानाजी देशमुख यांनी ६० व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सदाचार या चार सूत्रांवर आधारित निरलसपणे काम करण्याचा वसा घेतला होता. त्यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व यांची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. याचे एकंदर तीन भाग असून पहिल्या भागात नानाजी यांचे चरित्र, दुसऱ्या भागात त्यांनी दीनदयाल शोध संस्थान (दिल्ली), सिंहभूम (बिरसाग्राम), सुंदरगढ (ओरिसा), दीनदयाल शोध संस्थान (अहमदाबाद), बालजगत (नागपूर), गोंडा प्रकल्प, बीड प्रकल्प, चित्रकूट प्रकल्प उभारलेल्या संस्थांची माहिती आणि तिसऱ्या भागात नानाजींची अनुवादित पत्रे, यांचा समावेश आहे. संस्थांची उभारणी करून त्याद्वारे समाजकार्य करत राहण्याने एकंदर समाजाचा स्तर उंचावण्यास मदत होते. त्याग, सेवाव्रती, विनम्रता, देशभक्ती, लोकसेवा या सद्गुणांची वाढ होते. नानाजी यांचे काम याच वैशिष्टय़ांच्या जोरावर उभे राहिले, वाढले आणि इतरांसाठी प्रेरक ठरले आहे. अशा या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख या संपादित पुस्तकातून होते.
‘कर्मयोगी नानाजी देशमुख’ : संपादक- कमलाकर अंबेकर, रेणुका प्रकाशन, परभणी, पृष्ठे – ४१६, मूल्य – ४०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोरम मनगोष्टी
हे पुस्तक मानसशास्त्रीय प्रश्नांचा आणि संशोधनाचा आढावा घेणारे आहे. शक्य तेवढय़ा सोप्या आणि सुगम भाषेत लेखक निरंजन घाटे यांनी मानवी मनासारखा गुंतागुंतीचा विषय उलगडण्याचा यात प्रयत्न केला आहे आणि पुस्तक वाचल्यावर तो यशस्वी झाला आहे असे म्हणावे लागते. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’, ‘मन केवढं केवढं जसा खसकाचा दाणा, मन केवढं केवढं त्यात आभाय मायना’ अशा काव्यमय सुभाषितांनी मनाचं गूढ अधोरेखित केलं असलं तरी मानसशास्त्रज्ञांनी मात्र मनाच्या तळाशी जाऊन ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नांची ही तपशीलवार कहाणी मनोरम आहे. आपलं मन ज्यांना आपल्या काबूत ठेवता येतं आणि ज्यांना ते ठेवता येत नाही अशा सर्वासाठीच हे पुस्तक आहे.
‘मन’ – निरंजन घाटे, मनोविकास प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २३८, मूल्य- २३० रुपये.

विचारपरिलुप्त मुक्तके
लेखिका कवयित्री अरुणा ढेरे यांचं हे नवं पुस्तक दृष्टांत-कथेसारखं आहे. फरक इतकाच की, यातले प्रसंग, घटना या प्रत्यक्षात घडलेल्या आहेत आणि त्या घटनांमधून श्रेष्ठतम मानल्या गेलेल्या मानवी मूल्यांची ओळख होते. त्याआधीचा प्रश्न म्हणजे, ही मूल्य नेमकी कोणती, याचीही जाणीव होते. या पुस्तकातील सर्वच लेख हे सदररूपाने प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे त्यांना शब्दमर्यादेचं बंधन आहे. ढेरे या सिद्धहस्त लेखिका असल्याने त्यांनी थोडक्या शब्दांतही आपल्याला सांगायचे आहे ते नेमकेपणाने सांगितले आहे. संगीतकार, अभिनेते, नाटककार, लेखक-कवी, नेते, कार्यकर्ते, संशोधक यांच्या जीवनातील आठवणी आणि त्यांच्या गुणवैशिष्टय़ांचं ओझरतं दर्शन, असा या पुस्तकाचा एकंदर आवाका आहे.
‘अंधारातले दिवे’ – अरुणा ढेरे, सुरेश एजन्सी, पुणे, पृष्ठे – ११२, मूल्य – १३० रुपये.

आसामचा शिवाजी
आसाममध्ये अनेक महान योद्धे, राजनीतिज्ञ, सुधारक झाले, पण आसामबद्दल एरवीही आपल्याला फारशी माहिती नसते. लाचित बरफुकन हा आसामचा सेनापती. त्याचा आणि शिवाजी महाराजांचा कालखंडही एकच. दोघांनाही मुघलांचा बीमोड करण्याचा प्रयत्न केला. म्हणून बरफुकन यांचा कौतुकाने ‘आसामचा शिवाजी’ असा उल्लेख केला जातो. शिवाजी महाराज हेच बरफुकन यांचे प्रेरणास्थान होते. हे पुस्तक वाचताना शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक प्रसंग आठवतात. डावपेच आणि शौर्य, राष्ट्रप्रेम आणि निष्ठा यांचा मिलाफ पाहायला मिळतो. ‘हिंदवी स्वराज्य’ हे शिवाजी महाराजांचे तर ‘आसामींचा विजय’ हे बारफुकनचे ध्येय होते. त्या ध्येयाच्या यशस्वीतेची ही कहाणी आहे. औरंगजेबाने राजा रामसिंगाला शिवाजी महाराजांना मदत केल्याच्या संशयावरून आसामच्या मोहिमेवर पाठवले. तिथे त्याला बारफुकनकडून हार पत्करावी लागली. असे असले तरी बारफुकनविषयी खुद्द आसामी जनतेलाही फारशी माहिती नाही. भुयां यांनी परिश्रमपूर्वक हे पुस्तक लिहून आसामी आणि भारतीय वाचकांची मोठी सोय केली आहे.
‘लााचित बरफुकन : आसामचा शिवाजी’ – डॉ. सुज्जकुमार भुयां, अनुवाद- विजय लोणकर, चिनार पब्लिशर्स, पुणे, पृष्ठे-१४८, मूल्य-१५० रु.

सागरीयुद्धाची थरारक कहाणी
हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गोव्यात घडलेल्या एका सत्य घटनेची माहिती देणारे पुस्तक आहे. १९८० साली या घटनेवर ‘सी वूल्व्हस’ हा हॉलीवूडपट आला, गाजला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असलेला गोवा हा तटस्थ होता. त्यामुळे येथील बंदरात काही जर्मन आणि इटालियन मालवाहू जहाजांनी आश्रय घेतला. यातल्या एका जहाजावरून ब्रिटिश मालवाहू जहाजांचे तपशील जर्मन पाणबुडय़ांना पोहचवले जात होते. त्यामुळे जर्मनीला ब्रिटिश जहाजांचा ठावठिकाणा लागून त्यांना जलसमाधी दिली जात होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागला तेव्हा कलकत्त्यातल्या नागरी संरक्षण संघटनेकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली. काहीशा वयस्कर, युद्धाचा अनुभव नसलेल्या या संघटनेच्या सभासदांनी या जहाजांविरुद्ध कारवाई करून ती नष्ट केली. त्याची ही थरारक कहाणी आहे.
‘बोर्डिग पार्टी’- जेम्स लीझर, अनुवाद- वर्षां गजेंद्रगडकर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे, पृष्ठे – २४१, मूल्य – २५० रुपये.

ग्रामजीवन उभं करणाऱ्या कविता
इंद्रजित भालेराव यांच्या ‘गावाकडं’ या खास मुलांसाठीच्या कविता म्हणजे ग्रामजीवनांचा मनोहारी प्रवास!
माझ्या आजीच्या मळ्यात
डबडबली विहीर
पाणी पिण्याला थांबती
साधू गोसावी फकीर
अशा सहजसुंदर शब्दांमध्ये गावाकडचं जिणं भालेरावांनी अधोरेखित केलं आहे.
माझी एक गाय होती तिला होते वासरू
तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू
ग्रामीण भागातील जीवन शब्दांकित करताना कवी तिथला निसर्ग, प्राणी-पक्षी यांचं मानवाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं किती गहिरं आहे, हे सांगतात.  
दादा गेला शाळेसाठी दूरदूर गावा
रानातला रानमेवा त्याला कुणी द्यावा
हे दोन भावंडांतील दृढ नातं अधोरेखित करणारी कविता आणि बहिणीविषयीची माया वाचकाच्या डोळ्यांत पाणी आणते.
शाळेची खडतर वाट चालतानाही शाळेविषयी मनात असलेली ओढ, रविवारच्या सुट्टीच्या दिवसातील गमती, दिवाळीच्या सणाची गंमत, गायरान, पाऊस असा गावाकडील जीवनपट उलगडणाऱ्या या कविता शहरीमनालाही स्पर्शून जातात. निसर्गरम्य गावाची सहल घडवून आणणारं हे पुस्तक आहे.
 या सहजसुंदर शब्दांना चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या सुरेख चित्रांची साथ लाभली आहे. हे पुस्तक हातात घेणं, ते हाताळणं हाही एक आनंददायी अनुभव आहे. शब्द आणि चित्रांची एकरूपता वाचकाचा वाचनानुभव आनंददायी करतो.
‘गावाकडं’ – इंद्रजित भालेराव, मनोविकास प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १४ , मूल्य –  ८० रुपये.

गदिमांच्या बालगीतांचा खजिना
 ग. दि. माडगूळकरांच्या अनेक बालगीतांनी मराठी बालमने संस्कारी झाली. या बालगीतांचं बोट धरूनच लहानाची मोठी झाली. ‘नाच रे मोरा’, ‘गोरी गोरी पान’, ‘झुक झुक अगीनगाडी’ ही बालगीतं माहीत नसणारा मराठी माणूस सापडणे अशक्यच! गदिमांच्या या आणि अशा अनेक सुंदर बालगीतांचे संकलन म्हणजे ‘नाच रे मोरा’ हे पुस्तक. गदिमांच्या बालगीतांचे संकलन या पुस्तकात केले असून हे पुस्तक म्हणजे मराठी लहान-मोठय़ा वाचकांसाठी एक पर्वणीच!  या बालगीतांना गिरीश सहस्रबुद्धे यांच्या सुरेख चित्रांची साथ लाभली आहे. हे पुस्तक वाचताना मोठय़ा मंडळींनाही त्यांच्या बालआठवणी जाग्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. इतका पुनर्प्रत्ययाचा आनंद हे पुस्तक देतं. गदिमांची सगळी बालगीतं एकत्रित असल्याने हे पुस्तक आपल्या संग्रही हवंच- लहानग्यांसाठी आणि मोठय़ांसाठीही.
‘नाच रे मोरा’ – ग. दि. माडगूळकर, संपादक – शीतल माडगूळकर, लीनता आंबेकर, अनुबंध प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ८०, मूल्य – १०० रुपये.    ठ

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review in short
First published on: 08-09-2013 at 12:01 IST